विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यात होणाऱ्या ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमाला अखेर पोलिसांची परवानगी मिळाली आहे. २२ ऑगस्ट रोजी त्यांचा पुण्यात कार्यक्रम होणार असून, पोलिसांनी काही अटी आणि शर्ती घातल्या आहेत. त्यामुळे राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, कार्यक्रमात ते कोणता मुद्दा मांडणार याची उत्सुकता आहे.
पुण्यातील नवले पुलाजवळ आज पुन्हा भीषण अपघात झाला आहे. कात्रजकडून वले पुलाच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर ५ ते ६ वाहनांची धडक झाली. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे नवले पूल पुन्हा एकदा अपघातांचा सापळा ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
रिक्षा परवान्यासाठी मराठी बंधनकारक करण्यास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोध केला आहे. आपल्या भाषेचा सन्मान आणि प्रसार करणे आवश्यक आहेच. पण त्यासाठी रोजगाच्या अटीची शिक्षा नको. एखाद्या गरिबाला भाषा येत नाही, म्हणून त्याचा रोजगार हिसकावून घेणे, हे योग्य नसल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.
मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षा व टॅक्सी चालकांवर गुरूवारपासून कारवाई केली जाणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. गुरूवारपासून संबंधित चालकांना एक महिन्याची नोटीस दिली जाईल. या कालावधी त्याने मराठी शिक्षणे आवश्यक आहे. एक महिन्यानंतरही मराठी बोलता न आल्यास तीन महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
आमदार आदित्य ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, भाजप किती निर्दयी आहे, किती GenZ विरोधी आहे आणि कशी मुंबई लुटत आहे, याचे खुले प्रदर्शन BMC मध्ये सुरू आहे. लहान मुलांपासून अगदी देशासाठी खेळणाऱ्या फुटबॉलपटूंचे 'नेव्हिल डिसोझा फुटबॉल टर्फ', सत्तेचे बळ वापरून कसं चोरता येतं याचं देखील प्रदर्शन! नेव्हिल डिसोझा टर्फ घेऊन प्रदर्शन केंद्र करणार. बाजूला SRA येत आहे. तिथेच बांद्रा बे रिडेव्हलपमेंट होत आहे. तिथेच अदानीने MSRDC ची जागा घेतली आहे… बांद्रामध्ये किती ट्रॅफिक होईल, किती गळचेपी होईल... याचा विचार न करता जागा ढापायची असं भाजपने ठरवलं आहे.
भुसावळ तालुका पोलिसांनी प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ८ लाख ४५ हजार ३०० रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल आणि ५ लाख रुपये किमतीची इनोव्हा कार असा एकूण १३ लाख ४५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. साकेगाव शिवारातील ग्रामीण रुग्णालयाजवळील सर्व्हिस रोडवर सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
मराठवाड्यात आज आणि उद्या काही भागात पावसाची शक्यता असली, तरी त्यानंतर पावसाची मोठी उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमिवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने शेतकऱ्यांना विशेष कृषी सल्ला दिला आहे. पिकांना पाण्याचा ताण येऊ नये यासाठी पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्यासोबतच आवश्यकतेनुसार कीड-रोग नियंत्रणासाठी फवारणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पिकाची काळजी घेण्याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ कैलास डाखोरे यांनी केले आहे.
चिमुकलीवर अत्याचार करुन निघृन खुन केल्यानंतर जुन्नर हादरलंय असून या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर आज ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, तर या चिमुकलीला न्याय मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या रास्ता रोकोमुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, प्रशासनासमोर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं आव्हान निर्माण झालं आहे.
पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल बालवडकर यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी मंजूर केलेला निधीचा ठराव रद्द करण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार संघर्ष झाला. सभागृह नेते गणेश बीडकर यांनी युती आता फक्त राज्यात असल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादीला थेट इशारा दिला. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत.
पुणे महापालिका निवडणुकीनंतर शहरातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. अनेक नेत्यांचे पक्षांतर झाले असून, विविध पक्षांकडून संघटन मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुणे शहराची जबाबदारी दोन भागांत विभागून नव्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. आता विशाल तांबे आणि श्रीकांत पाटील हे पुण्यात पक्षाला किती बळ देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाण्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात राजकीय रस्सीखेच सुरू असतानाच वनमंत्री गणेश नाईक यांचा गडकरी रंगायतन येथे पुन्हा जनता दरबार होणार आहे. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नाईकांचा वारंवार होणारा जनता दरबार हा राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरत आहे.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेला आता विद्यापीठ म्हणून मान्यता मिळाली आहे.. बाळासाहेब थोरात या विद्यापीठाचे कुलपती झाले असून, विद्यापीठाचा शुभारंभ सोहळा थोरात यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
ठाणे शहरातील रखडलेल्या क्लस्टर पुनर्विकासाला गती देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून स्वतंत्र ‘ठाणे क्लस्टर विकास कंपनी’ स्थापन करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला. मात्र, याच प्रस्तावावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्येच जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. भाजपचा तीव्र विरोध झुगारून सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव बहुमताने मंजूर केल्यामुळे ठाण्यातील सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
भाडेकरूंची माहिती पोलिसांकडे नोंदवून न देणाऱ्या घरमालक आणि पीजी चालकांविरोधात पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील विविध भागांत केलेल्या कारवाईत 150 हून अधिक घरमालक आणि पीजी चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मनोज जरांगे २५ आमदार पाडण्याची धमकी देत आहेत. ते जर 25 आमदार पाडणार असतील तर आम्ही त्यांचे १०० आमदार पाडू, असे खुले आव्हान ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दिले.
जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. 25 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस, हृदय आदी अवयव निकामी झाल्यानंतर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच रुग्णांसाठी शेवटचा पर्याय ठरतो. मात्र या उपचारांसाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च अनेक कुटुंबांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे करतो. या अशा परिस्थितीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी राज्यातील गरजू रुग्णांसाठी आधारवड ठरत असून १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी 798 रुग्णांना 15 कोटी 79 लाख 66 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.