बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. करमोडा गावचे लोकनियुक्त सरपंच दीपक उगले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ तयार केला असून, या व्हिडिओमध्ये राजकीय विरोधकांकडून होत असलेल्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू आहेत. त्यांचा हा दौरा सांगली जिल्ह्यात आला असता त्यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सांगलीतील कडेगाव येथून विटा शहराकडे त्यांचा ताफा निघाला असताना ही अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये मनोज जरांगे यांचे समर्थक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात जखमी झालेल्यांना मनोज जरांगे यांनी स्वत: आपल्या कारमध्ये बसवून रुग्णालयात दाखल केलं आहे.
गडचिरोलीतील साप-विंचू चावल्याने झालेल्या मृत्यूंच्या घटनांवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “मंत्र्यांच्या घरात साप-विंचू सोडा, मग मृत्यूचं भय कळेल,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. आदिवासींच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही केली. दरम्यान, काँग्रेस संस्थाचालकांच्या आश्रमशाळांवर प्रश्न उपस्थित करत भाजपने राऊतांवर पलटवार केला.
TET पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे. भिवंडी पोलिसांनी सोलापूरमधील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण संस्थेचा चालक प्रकाश पवार याला अटक केली. तपासात त्याने यापूर्वी अटक केलेल्या आरोपींना विद्यार्थ्यांची कागदपत्रे दिल्याचे समोर आले. ही कागदपत्रे का पुरवली, याचा शोध पोलीस घेत आहेत. प्रकरणातील अटकसंख्या 16 झाली आहे.
पुण्यातील औद्योगिक विकासावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. चाकणमधून उद्योग बाहेर जाण्याच्या चर्चेवर त्यांनी प्रश्न सोडवण्यासाठी बैठका सुरू असल्याचे सांगितले. चाकणमधील रस्त्यांसाठी 100 ते 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज पुन्हा गदारोळ पाहायला मिळाला. विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून जोरदार घोषणाबाजी करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकसभेतील कामकाजात अडथळा निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात न आल्याने अध्यक्षांनी लोकसभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब केलं. त्यामुळे सभागृहातील कामकाज पुन्हा ठप्प झालं.
गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू, तर तीन विद्यार्थिनी जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेवरून शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात आदिवासींचा मृत्यू इतका स्वस्त झाला आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी महायुती सरकारवर कडाडून टीका केली आहे. "नक्षलवाद कोणासाठी संपवला? तर या उद्योगपतींसाठी संपवला, आदिवासींसाठी नाही. आदिवासींचा मृत्यू या मार्गाने सुरूच आहे. यातूनच एखादा नक्षलवादी परत निर्माण झाला तर त्याला गोळ्या घातल्या जातात," अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली.
अकोल्यात एकनाथ शिंदे शिवसेनेकडून मोठा राजकीय मासा गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 2024 मध्ये काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार असलेल्या डॉ. अभय पाटील यांनी नुकतीच मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोघांच्यात तासभर चर्चा झाली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. अभय पाटील हे तब्बल 4 लाख 16 हजार मते घेत दुसऱ्या स्थानावर राहिले होते. काँग्रेसच्या कार्यपद्धतीला कंटाळून वर्षभरापूर्वी डॉ. पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश केलेला नव्हता.
नवी मुंबई शहरात सध्या धोकादायक इमारतीच्या पुनर्वसनाचे वारे वाहू लागले आहे. सर्वसामान्य लोकांना मोठी घरे मिळावीत, यासाठी सरकारने क्लस्टरसारख्या योजना लागू केल्या. मात्र क्लस्टर योजनेचा खरा फायदा बिल्डरांना होत असून सर्वसामान्य जनतेच्या माथी परत एकदा लहान घरे मारली जात आहे. त्यामुळे बिल्डरांच्या घशात जाणारी नवी मुंबई वाचविण्यासाठी क्लस्टर योजनेत बदल करणारा प्रस्ताव आणला असल्याचा दावा भाजप सभागृह नेते सागर नाईक यांनी केला.
अकोल्यातल्या महान गांवात आदिवासी दिनानिमित्त आयोजित भव्य मिरवणुकीच्या वादादरम्यान एका PSIसह एका पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण झाली होती. या प्रकरणात अकोला पोलिसांनी 20 जणांना अटक केली. महान येथे मिरवणुकीतील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या एका PSI आणि पोलिस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. पोलिसांना मारहाण करताना त्यांच्या मागे मिरवणुकीतील लोकांनी पाठलाग केला. याचेच हे VIDEO आणि CCTV समोर आले होते. या प्रकरणात अकोला पोलिसांनी आता 20 जणांना ताब्यात घेतले आहे.
गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील आश्रमशाळेत झालेल्या सर्पदंश घटनेनंतर आता आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन एसओपी निश्चित करण्यात येणार आहे. सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आज घटनास्थळाला भेट देत मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
बीडच्या नगरपालिकेमध्ये अजित पवार राष्ट्रवादीच्या गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता मिळाली. मात्र आता या सत्तेला सुरुंग लागताना पाहायला मिळत आहे. 11 नगरसेवकांचा एक गट आमदार विजयसिंह पंडित यांच्या विरोधात गेल्याचे चर्चा आहे. अशातच बीड नगरपालिकेत सत्ता स्थापन होऊन अवघे सात महिने उलटत नाहीत, तोच सत्ताधारी अजित पवार राष्ट्रवादी अंतर्गत गटबाजीचा मोठा भडका उडाला आहे. ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पालिकेवर झेंडा फडकवला, त्या विजयसिंह पंडित यांचेच फोटो 11 नगरसेवकांनी आपापल्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून हटवल्याने बीडच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीवर केवळ अमेरिकेच्या नौसेनेचेच नियंत्रण आहे. तसेच या युद्धात झालेले नुकसान आम्ही इराणकडून वसूल करू. इराणला कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही. त्याऐवजी या युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई इराणने अमेरिकेला द्यावी, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.
ठाण्यातील मुंब्रा रेल्वे ब्रिजजवळ रेल्वेतून पडून 27 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. साईराज बेणारे असे मृत युवकाचे नाव असून, रेल्वेतून पडल्यानंतर तो मुंब्रा खाडीतील लोखंडी रॉडला अडकला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रेल्वे पोलीस आणि मुंब्रा पोलस घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधर मेट्रो 1 मार्गिकेचा विस्तार बेलापूर ते सागर संगम मेट्रो 1 अ व पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो २ मार्गिके अंतर्गत केला जाईल. या मार्गिकेच्या अंमलबजावणीसह संपूर्ण जबाबदारी मुंबई मेट्रो रेल कॉपेरिशनवर (एमएमआरसी) असेल. त्यानुसार आता मेट्रो 1 अ व मेट्रो 2 अशा एकूण 17.09 किमीच्या मेट्रो मार्गिकेचा प्रस्ताव एमएमआरसीकडून तयार केला जात आहे.
नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्नावरुन राजकारण तापलं आहे. खड्ड्यांच्या मुद्द्यावरून पालिका आयुक्त आक्रमक झाले आहेत. महापालिकेच्या 13 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसला सात दिवसात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहे.
पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. भरधाव कार आयशर ट्रकला धडकल्यामुळे हा अपघात झाला. वेदांत वारिंगे, सोनलिंग ठाकूर, आदित्य गरुड आणि निखिल राऊत अशी मृत तरुणांची नावे आहेत
जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात तृतीयपंथीयांच्या वतीने दशामाता आगमन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दशामातेच्या मूर्तीचे मुखदर्शन आणि आरती करण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.