भिवंडीच्या कोनगावमधून TET चा पेपर 1.5 कोटीला विक्रीसाठी आला होता. पोलिसांनी सापळा रचून बिहारचे राजू शाव, आकाश कुमार 30 आणि हरियानाचे धीरज सिंग 28 या तिघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून 4 प्रश्नपत्रिका संच जप्त करण्यात आले होते. या तिघांविरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांची रात्रभर केलेल्या चौकशी काय निष्पन्न होतो हे पाहणं गरजेचं असून कोर्ट त्यांच्या पोलिस कोठडीबाबत काय निर्णय देणार आहे हे पाहणं गरजेचं आहे.
नंदुरबार जिल्ह्यात मोटारसायकल चोरणाऱ्या सराईत टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे 30 लाख 30 हजार रुपये किमतीच्या 32 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, तीन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी ही कारवाई केली.
अमरावतीत नीट परीक्षेतील गैरव्यवहाराच्या वादानंतर आता टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून युवक काँग्रेस आणि एनएसयूआय आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी करत कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात आंदोलन केले. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जून महिना संपत आला तरी सोलापूरसह राज्यातील अनेक भागांत पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले असून पावसाअभावी शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. पाण्याच्या साठ्यात झपाट्याने घट होत असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील मुस्लिम समाजबांधवांनी रविवारी अल्लाहकडे पावसासाठी विशेष प्रार्थना करत ‘सलातुल इस्तिस्का’ ही पावसासाठीची विशेष नमाज अदा केली.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी 'विठू माऊली तू माऊली जगाची' हे अजरामर भक्तीगीत स्वतःच्या आवाजात गायले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी हे गाणे गातानाचा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत 'Gulabrao Patil Official' या युट्युब चॅनेलवर शेअर केला आहे. त्यांच्या या गाण्याची सध्या सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
पाकिस्तानातील सर्वात मोठे शहर असलेल्या कराचीमध्ये शनिवार संध्याकाळी एका भीषण आत्मघाती हल्ल्याने आणि अंदाधुंद गोळीबाराने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. कराचीच्या गुलिस्तान-ए-जौहर भागातील 'पाकिस्तान रेंजर्स'च्या मुख्यालयाला लक्ष्य करत हा दहशतवादी हल्ला करण्यात आला. सुरुवातीला एकापाठोपाठ झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटांच्या आवाजाने परिसर हादरला, ज्यानंतर सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू झाली. या हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी आहेत.
जळगाव जिल्ह्यातील वाढत्या वाहनचोरींना आळा घालण्यासाठी मुक्ताईनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत 30 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत दोन आरोपी आणि दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 25 लाख 80 हजार रुपये आहे.
बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले खून प्रकरणात आता आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. मृत विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी आज बीडचे पोलीस अधीक्षकांची भेट घेत महत्त्वाच्या मागण्या केल्या. खुनाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या एसआयटी पथकात काही विशिष्ट अधिकाऱ्यांचा समावेश करावा. तसेच मुख्य आरोपी रामेश्वर गायकवाड यांनीच हे खुनाचं षडयंत्र रचलं, त्यामुळे त्यालाही अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच स्वतःवर आणि फिर्यादी उमेश माने यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सिया गोयलने पोलिसांना खोटी माहिती सांगितल्याचं आता समोर आलं आहे.पोलीस चौकशीत सिया गोयलने तिला केतन अग्रवालसोबत लग्न करायचं नव्हतं आणि हे तिने तिच्या घरच्यांना सांगितल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता सियाचे वडील प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांनी 'केतनशी लग्न करायचं नाही, हे सियानं कुणालाही सांगितलं नव्हतं असं म्हटलं आहे. त्यामुळे आता सियाचा खोटारडेपणा समोर आला आहे.
भारताच्या शेजारील देश अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. हा भूंकप संध्याकाळी 7 वाजता झाला असून या भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल होती. दरम्यान, या भूकंपाचे हादरे भारतातील काही राज्यांना बसल्याचं सांगितलं जात आहे.
परभणीतील पाथरी शहरातील सेलू कॉर्नर येथील नियोजित पुतळ्याच्या जागेमध्ये रात्री शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार सईद खान यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंगेंच्या शिवसेनेत गेलेले खासदार संजय जाधव यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आज परभणी आणि धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी 11 वाजता परभणी येथे उद्धव ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आली आहे. तर दुपारी धाराशिवमधील शिवसैनिकांना ठाकरे संबोधित करणार आहेत. परभणी आणि धाराशिवमधील खासदार फुटल्यानंतर ठाकरेंनी या मतदारसंघात आपला दौरा काढत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सुरूवात केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.