संसदेत ऑपरेशन सिंदूरवरुन सुरू असलेल्या चर्चेदरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष करताना, पाकव्याप्त काश्मीर घेण्याची संधी भारताला असतानाही मोदींनी बिनशर्त युद्धबंदी जाहीर केली. हे का केलं? युद्धावेळी एक देखील देश भारताबरोबर आला नाही, मग कशाला मोदी ढोल बडवतात? अशा शब्दात अरविंद सावंत यांनी टीका केली.
बीडमध्ये मारहाणीचा नवा व्हिडीओ व्हायरल झाला असून एका तरुणाला कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. यामुळे खळबळ उडाली असून ही घटना बीड शहरातील बार्शी नाका परिसरातील असल्याचे बोलले जात आहे. पण या प्रकरणात पोलिसांकडून अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
जॉर्जियाच्या बटुमी येथे झालेल्या एफआयडीई महिला विश्वचषक स्पर्धेत, नागपूरची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीचा पराभव केला. 19 वर्षीय दिव्या देशमुखने टायब्रेकरमध्ये हम्पीवर विजय मिळवत विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचे कौतुक केले असून राज्य सरकार तिचा सन्मान करेल असे म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचं मोठं विधान केलं आहे. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीतत लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिथे शक्य, तिथे महायुतीत लढू, जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढू. मैत्रीपूर्ण लढत हा नियम नाही, महायुती हा नियम आहे. पण महायुतीतील घटक पक्षांवर टीका करायची नाही असंही फडणवीस यांनी सांगितलं.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांना घेरल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज ठाकरेंनी गायकवाड यांचं कौतुक केलं आहे.
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्ज पडताळणीमध्ये 2 कोटी 52 लाख लाभार्थ्यांपैकी तब्बल 26 लाख 34 हजार लाभार्थी हे विविध कारणांमुळे अपात्र ठरले आहेत. यात तब्बल 14 हजार 298 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
सिंधुदुर्गमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पक्षप्रवेशासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रलोभने दाखवली जात आहेत, असा आरोप भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केला आहे. त्याबाबतची तक्रार आपण प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडे केली आहे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही दिले आहे. त्यामुळे कोकणात महायुतीत वाद रंगण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, तशा काही तक्रार आमच्याकडे आल्या आहेत, हे आम्ही शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विधीमंडळात रमी खेळत असल्याचा आरोप असलेले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट होण्याची शक्यता आहे. मुंबईत ही भेट होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी अजितदादा हे कोकाटेंना त्या व्हिडिओबाबत, सरकारला भिकारी म्हटल्याबाबत जाब विचारण्याची शक्यता आहे. अजित पवार हे कोकाटेंचे खात बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आमच्या पक्षात किती गट असावेत, हे आमचं आम्ही बघू. घड्याळ चिन्ह आम्हाला आणि धनुष्यबाण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळेल, असेही रोहित पवारांनी म्हटले होते. त्यावर चाद्यापासून बांदापर्यंत कोणी उपटसुंभ काहीही म्हणेल, त्यावर उत्तर द्यायला मी बांधील नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यावर उपटसुंभ शब्दाचा अर्थ मला माहिती नाही. अजितदादांनी तो मला सांगावा, असे प्रत्युत्तरही रोहित पवारांनी अजित पवारांना दिले.
वर्धा येथील भाजपच्या मंथन शिबिराकडे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पाठ फिरवली आहे, त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, त्याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, कोणी नाराज नाही. काही लोकांचे कार्यक्रम होते. काहींनी आमचा नियोजित दौरा असल्याचे कळविले होते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पुण्यातील रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आलेले रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांचा वैद्यकीय अहवाल आम्हाला ससून रुग्णालयाकडून मिळालेली नाही. खेवलकर यांचा अहवाल आल्याच्या बातम्या माध्यमांमधून येत आहेत, त्यामुळे आम्ही तो अहवाल मिळावा, यासाठी पोलिसांकडे मागणी केली आहे. मात्र, तो आम्ही थेट कोर्टात सादर करणार असल्याचे सांगितले जात आहे. असे ही रोहिणी खडसे यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
काश्मीरमध्ये भारतीय सैन्य दलाने ‘ऑपरेशन महादेव’ मोहीम राबवली आहे. त्यात दोन अतिरेकी ठार झाले आहेत. हे दोन अतिरेकी पहलगाम हल्ल्यातील हल्लेखोर असल्याचे सांगितले जात आहे. सुमारे वीस लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या मुसा सुलेमानी याचाही त्यात समावेश आहे, त्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी पाच वाजता भारतीय सैन्य दलाची पत्रकार परिषद होणार आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. ऑपरेशन महादेव अंतर्गत, सोमवारी (28 जुलै) पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले. तीन दहशतवाद्यांमध्ये सुलेमान शाहची ओळख पटली आहे. पहलगाम हल्ल्यात सुलेमानचा सहभाग होता. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करून 26 जणांना ठार मारले होते. यात एक काश्मिरी नागरिक सहभागी होता. तेव्हापासून दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. दरम्यान, सोमवारी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना ठार मारले.
एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीदरम्यान अटक केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. नाथाभाऊंच्या जावयाला रेव्ह पार्टीदरम्यान रंगेहात पकडल्याने राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकनाथ खडसे हे पुण्यात असून त्यांनी मोठी शंका व्यक्त केलीये. या रेव्ह पार्टी प्रकरणात बोलताना खडसे म्हणाले की, मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही. अल्कहोल घेतल्याचा पुरवा आला आहे. काय काळबेर सुरू आहे, एकदंरीत प्रकरण पाहता काही तरी काळबेरं दिसत आहे. माझ्या जावयाने ड्रग्ज आयुष्यात पाहिला नाही. पोलिस या प्रकरणात जेवढी तत्परता दाखवत आहेत तेवढीच तत्परता लोढा प्रकरणात का दाखवत नाहीत, असाही प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला.
वर्धा येथील भाजपच्या मंथन मेळाव्यात महायुती सरकारने केलेल्या कामांचा पाढा देवेंद्र फडणवीस यांनी वाचला. राज्यात भाजपसाठी अनुकूल वातावरण असल्याचा दावा करीत येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत एकत्र लढायच्या, पण भाजपचे निर्विवाद वर्चस्व दाखवून द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले. .
उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दिल्लीत हा पुरस्कार सोहळा होणार आहे. गडकरींना हा पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते दिला जाणार आहे. या कार्यक्रमाला उद्योग मंत्री उदय सामंत यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे.
पुण्यातील खराडी मधील रेव्ह पार्टी प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. याप्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यावर "ही हाऊस पार्टी होती, तिला मुद्दाम रेव्ह पार्टीचा बनाव करण्यात आला" असा गंभीर आरोप अंधारे यांनी केला आहे.
श्रावण सोमवार निमित्ताने परळी येथील प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत. माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी उपस्थित राहत भाविकांना फराळ वाटप केले. नाथ प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात येत आहे.
संरसंघचालक मोहन भागवत यांनी भारताच्या नावाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भारताची ओळख अबाधित राहावी म्हणून त्याचं भाषांतर होऊ नये, असं भागवत म्हणाले. अन्यथा भारत संपूर्ण जगात आपला आदर गमावू शकतो, असंही त्यांनी नमूद केलं. केरळमधील कोची येथील एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं.
भागवत म्हणाले की इंडिया 'भारत' आहे पण जेव्हा आपण त्याबद्दल बोलतो, लिहितो किंवा बोलतो तेव्हा ते सार्वजनिकरित्या असो किंवा वैयक्तिकरित्या आपण 'भारत' ला 'भारत' च म्हटलं पाहीजे.
कांग्रेस खासदार शशी थरूर यांनी ॲापरेशन सिंदूर वरील चर्चेत सहभाग घेण्यास नकार, सूत्रांची माहिती. कांग्रेस कडून शशी थरूर यांना चर्चेत सहभाग घेण्याबाबात विचारणा करण्यात आली होती. शशी थरूर यांनी ॲापरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यावर बोलण्यास नकार दिला.शशी थरूर ॲापरेशन सिंदूर मधील परदेशात पाठवलेल्या प्रतिनिधी मंडळांचे प्रमुख होते
शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचार आणि भाविकांची फसवणूक प्रकरणी तपास सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा देखील झाला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच शनी शिंगणापूर संस्थेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शेटेंची आत्महत्या केली आहे. शेटे यांनी आत्महत्या कोणत्या कारणाने केला हे अजून स्पष्ट झाले नाही.
तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत नाना पटोलेंच्या पॅनलचा धुव्वा उडाला. नाना पटोले यांचे पॅनल पराभूत झाले असून खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पॅनेलने विजय मिळवला आहे.
अहिल्यानगर शहरात लवकरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावेला साजेसे, असे संविधान भवन उभारले जाईल. यासाठी जिल्हा नियोजन निधीतून 5 कोटी रूपये व राज्य सरकारकडून 10 कोटी रूपये निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी दिली.
राज्यात काँग्रेसला अजून एक धक्का बसणार आहे. परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश वरपूडकर भाजप प्रवेश करणार आहेत. उद्या मंगळवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आपण प्रवेश करत असल्याचं वरपूडकर यांनी सांगितले.
संभाजी ब्रिगेडचा अजेंडा ठरला असून, पुढील काळात राज्यात कोणत्या मुद्यावरून भाजप महायुती सरकारविरोधात संघर्ष करायचा याची दिशा ठरली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जावी, शेतमालाला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांच्या बेरोजगार मुलांना काम मिळावे, महिलांना रोजगारांच्या नवनव्या संधी दिल्या गेल्या पाहिजेत. विचारांची लढाई आम्ही लढत आहोत. संभाजी ब्रिगेड ही लढाई निकराने लढेल, असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी सांगितले. पाथर्डी इथल्या सरकारी विश्रामगृहावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार झाली.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देशाच्या नेतृत्वावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची पुन्हा एकदा स्तुती केली आहे. 'देशात नरेंद्र मोदी उत्तम काम करत आहेत. महिला पासून, युवकापासून, गरिबापर्यंचे चांगले काम करण्याची भूमिका पंतप्रधान मोदी यांची आहे. मी मोदी साहेबांना हॅट्स ऑफ करतो, देशाला चांगलं नेतृत्व मिळालंय', असं वक्तव्य भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी केले.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका अमेरिकन नागरिकासह एका सज्ञान व्यक्ती आणि एका अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी कॅम्प मध्ये लोकांना सुख-शांती आणि संपत्तीचा आमिष दाखवून स्चाफर जॅवीण जॅकॉब (वय 41), स्टीवन विजय कदम (वय 46) आणि एक अल्पवयीन मुलगा ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करत होते, अशी तक्रार पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर याच्या पुण्यातील (Pune) खराडी इथल्या रेव्ह पार्टीवरून राज्यातील राजकारण तापलं आहे. प्रांजल खेवलकर याची अशीच पार्टी शुक्रवारी देखील झाली होती, असा पोलिसांचा दावा आहे. प्रांजल खेवलकर यांनी चार दिवसांसाठी तो फ्लॅट बुक केला होता. त्यामुळे पुणे पोलिस शुक्रवारी झालेल्या पार्टीची देखील चौकशी करणार आहेत. त्यासाठी ज्या फ्लॅटमधे पार्टी झाली, तिथले सीसीटीव्ही फुटेज देखील तपासणार आहेत.
रेव्ह पार्टी प्रकरणात रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर रोहिणी खडसे या आज पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहेत. दरम्यान, या भेटीच्या आधी त्यांनी ट्विट करत कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल ! जय महाराष्ट्र! असे म्हटले आहे.
खराडी पोलिसांनी रेव्ह पार्टी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रांजल खेवलकर यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, प्रांजल यांचे वकीलांनी न्यालायलात दावा केला की प्रांजल यांनी कोणतेही ड्रग्ज घेतले नव्हते. पोलिसांनी प्लॅन करून त्यांना अटक केली आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज (सोमवारी) लोकसभेत पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर तब्बल १६ तासांची चर्चा होणार आहे. विरोधी पक्षाकडून विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सपा प्रमुख अखिलेश यादव आणि इतर पक्षाचे खासदार सरकारला प्रश्न विचारतील. या चर्चावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर देण्याची शक्यता आहे.
ठाकरे बंधूच्या भेटीनंतर बाळा नांदगावकर यांनी फेसबूकवर पोस्ट करत म्हटले आहे की, 'दोन पक्ष एकत्र येऊन लढतात तेव्हा त्यांची ताकद 1+1=2 अशी होते. पण जेव्हा 2 ठाकरे एकत्र येतात तेव्हा हीच ताकद 1+1=11 होते.'
उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील हैदरगड परिसरात असलेल्या प्रसिद्ध अवसानेश्वर महादेव मंदिरात करंट पसरल्याने चेंगराचेंगरी झाली. या घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला असून सुमारे ४० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लोनीकटरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतल्या मुबारकपुरा गावातील २२ वर्षीय प्रशांत आणि आणखी एक भाविकाचा समावेश असल्याची माहिती आहे. आज पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये २ पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत, असे देखील तटकरे यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.