Zilla Parishad Elections: 12 Districts in Maharashtra Explained Sarkarnama
महाराष्ट्र

ZP Election : जिल्हा परिषद निवडणूक होणारे 12 जिल्हे कोणते? कुठे, कुठे धुरळा उडणार?

Zilla Parishad Election : महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणूक होणारे 12 जिल्हे कोणते? कुठे चुरशीची लढत होणार? सविस्तर माहिती वाचा.

Rashmi Mane

नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांनंतर आता राज्यभराचं लक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे लागलं होतं. अखेर या निवडणुकांचा बिगुल वाजला असून गावपातळीवरील राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये राजकीय धुरळा उडताना दिसणार आहे.

निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. कार्यक्रम जाहीर होताच संबंधित जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

या 12 जिल्हांमध्ये होणार प्रचार

पहिल्या टप्प्यात ज्या 12 जिल्ह्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्यांसह पंचायत समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा या तिन्ही भागांमध्ये एकाच वेळी निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार असल्याने राजकीय समीकरणे अधिक रंजक ठरण्याची शक्यता आहे.

Zilla Parishad Election

दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णयही महत्त्वाचा ठरला आहे. राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका घेण्यासाठी अधिक वेळ देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार न्यायालयाने आयोगाला मर्यादित मुदतवाढ दिली असून ठरलेल्या वेळेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे, त्या जिल्ह्यांमधील निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यानंतर उर्वरित जिल्ह्यांमध्येही निवडणूक रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. एकीकडे महानगरांमधील निवडणुका पार पडत असतानाच दुसरीकडे ग्रामीण महाराष्ट्रातही राजकीय वातावरण तापणार आहे.

संपूर्ण निवडणूक कार्यक्रमानुसार

  • 16 ते 21 जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

  • 22 जानेवारीला अर्जांची छाननी होईल.

  • 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेता येणार असून त्याच दिवशी दुपारी 3.30 नंतर अंतिम उमेदवार यादी आणि चिन्हवाटप जाहीर केले जाईल.

  • 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल, तर 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होतील.

  • त्यामुळे येत्या काळात ग्रामीण राजकारणात मोठी चुरस आणि जोरदार प्रचार पाहायला मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT