Anil Deshmukh Sarkarnama
महाराष्ट्र

Anil Deshmukh : "आमचं ठरलंय! राज्याचा मुख्यमंत्री शरद पवार, उद्धव ठाकरे अन्..."; अनिल देशमुख नेमकं काय म्हणाले?

Jagdish Patil

Anil Deshmukh : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळेच आता इच्छूकांची संख्या वाढली आहे. आमचं ठरलंय, आमची सत्ता येणार आणि आमचाच मुख्यमंत्री होणार आहे.

मात्र, राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहूल गांधी हे नेते एकत्र बसून ठरवणार, असा दावा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना देशमुख यांनी शरद पवारांच्या आजच्या दौऱ्याबाबतची माहिती दिली. तसंच यावेळी त्यांनी राज्यात आमचीच सत्ता येणार असल्याचा दावा केला.

शरद पवारसाहेब आज नागपूर आणि वर्धा दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं. ते म्हणाले, "राज्याची निवडणूक ॲाक्टोबरमध्ये व्हायला पाहिजे होती. मात्र, भाजप सरकार निवडणूक घेण्यासाठी का घाबरत आहे? निवडणुका आणखी पुढे ढकलण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे सरकार पराभवाच्या भितीने निवडणुका घ्यायला घाबरत आहे.

भाजप सरकार महानगरपालिका, नगर पंचायत निवडणुका घेत नाहीच शिवाय आता ते विधानसभेच्या निवडणुका देखील घ्यायला घाबरत आहेत. त्यांचा मोठा पराभव होणार आहे म्हणून ते निवडणुका पुढे ढकलत आहेत. या निवडणुका अजून किती पुढे जातात हे सांगता येत नाही", असं म्हणत देशमुख यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजप दंगली घडवू शकतं

दरम्यान, यावेळी त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. शरद पवारसाहेबांनी मागेच वक्तव्य केलं होतं की, भाजप सरकार केव्हाही दंगली घडवू शकतं. काल नाशिक, संभाजीनगर आणि काही शहरांमध्ये तशाच प्रकारच्या दंगली घडवण्याचा कट कारस्थान आहे का? हा प्रश्न निर्माण झाला असल्याचंही ते म्हणाले.

सरकारचं धाकधूक व्हायला लागलंय

दरम्यान, निवडणुका पुढे ढकलण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, "जी निवडणूक ऑक्टोबरमध्ये व्हायची, ती नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

15 वर्ष हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक बरोबर व्हायची, यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्राची निवडणूक हरियाणाबरोबर होत नाही. माननीय निवडणूक आयोगानं पाऊस, गणेशोत्सव, दिवाळी कितीही कारणं दिली असली, तरी महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे की, सरकारचं धाकधूक धाकधूक व्हायला लागलंय आणि म्हणूनच निवडणूक पुढे ढकलली आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT