MICE हबचे काम थांबवले आहे, एकही झाड काढावे लागणार नाही, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्याचबरोबर कोकाटेंबाबत मला आत्ताच कळालं त्यासंदर्भात कोकाटेच सांगू शकतील, हायकोर्टात दाद मागायला जाऊ शकतील असंही त्यांनी सांगितलं.
त्याचबरोबर पार्थ पवार यांचा हेतू काय हे सिध्य होत नाही. पत्राबाबत सांगता येत नाही.. मुख्यमंत्र्यांनी सखल चौकशी आदेश दिले आहेत. शीतल तेजवाणी यांचीही चौकशी होत आहे, पारदर्शी चौकशी होतं आहे. शिंदे गटाला 52 जागांबाबत कल्पना नाही. मुंबईत वाटाघाटींबाबत माहिती नाही. ही सूत्रांची माहिती असावी, असंही महाजन यांनी म्हटलं आहे.
मुंबई महापालिकेसाठी नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करणार असतील तर भाजप-राष्ट्रवादीसोबत मुंबईत युती करणार नाही अशी स्पष्ट भूमिका भाजपने घेतली आहे. याबाबत प्रवक्ते नवनाथ बन, आशिष शेलार आणि अमित साठम यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला स्वतंत्र लढावं लागणार आहे.
तुळजापूरचे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे निवडणूक लढवलेले उमेदवार विनोद पिटु गंगणे व महाविकास आघाडी कडून निवडणूक लढवलेले अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर यांच्यात तुळजापुरातील गोलाई चौकातील पंचायत समिती येथील रस्त्याच्या कामावरून वाद झाला. यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडल्याने येथे तणावाची परिस्थिती आहे.
जिल्हा बँकेवर पोस्ट करून आमदार निलेश राणे यांनी राजन तेलींना फटकारले आहे. त्यांनी, वैयक्तिक अजेंडा यामध्ये येता कामा नये, बसून चर्चेमधून मार्ग निघू शकतो पण टीका करायची काही गरज नाही असे म्हटले आहे. यामुळे राजन तेलींची गोची झाल्याची चर्चा रंगली असतानाच राजन तेली यांनी पलटवार केला आहे. त्यांनी, त्यांनी माझ्या वैयक्तिक जीवनात कोणीही ढवळाढवळ करू नये, नाईक यांच्याशी झालेली भेट राजकीय नसून वैयक्तिक होती. पण मी माझ्या भूमिकेवर ठाम असून या सर्व प्रकरणावर आणि आपल्या भूमिकेबद्दल आमदार निलेश राणेंशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी सिंधुदुर्ग बँकेचे हित जपणे हे आमचे देखील काम आहे. बँकेच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
चंद्रपुरात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आलीय मिंथुरी गावातील एका शेतकऱ्याला कर्जापायी त्याची किडनी विकावी लागलीय. या शेतकऱ्यानं दोन सावकारांकडून 50 - 50 हजारांचं कर्ज घेतलं होतं. दिवसाला व्याजापोटी 5 हजार रुपये द्यावे लागत होते. या सावकारांनी व्याज वाढवत वाढवत तब्बल 74 लाखांचं कर्ज या शेतकऱ्याचा माथी मारलं. यातून बाहेर पडण्यासाठी त्यातीलच एका सावकारानं शेतकऱ्याला चक्क किडनी विकण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने गेल्या काही वर्षांत राज्यातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचं नमूद करत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत आमदार निलेश राणे यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून व्यक्त केले. तर दुसरीकडे राजन तेली यांना चांगलेच फटकारले आहे. काल शिंदे शिवसेनेचे स्थानिक नेते माजी आमदार राजन तेली यांनी जिल्हाबँकेचे अध्यक्ष व नितेश राणेंचे निकटवर्तीय असलेल्या मनीष दळवी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली होती. तर स्वपक्षातील नेते माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यावरही टीका केली होती या मुद्द्यावरून आमदार निलेश राणे हे राजन तेलींवर चांगलेच संतापलेले या एक्स पोस्ट वरून दिसून येत आहे.
मुंबईत महायुतीचा 150+ जागा जिंकण्याचा फॉर्म्युला ठरला आहे. 150 पेक्षा जास्त नगरसेवक जिंकणार असा दावा आशिष शेलारांनी केला आहे. तर मराठी माणसाने ठाकरेंच्या पराभवाचा शुभमुहूर्त ठरवलाय असं म्हणत ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. राज्यात शक्य तिथे युती करण्याच्या सूचना शाहांनी दिल्या आहेत. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे...या बैठकीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल,,,
मंत्री गिरीश महाजन यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या '१९ डिसेंबरला मराठी माणूस पंतप्रधान होईल' या दाव्याची खिल्ली उडवली आहे. 'चव्हाणांना स्वप्न पडलंय का?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, नाशिक महापालिकेत महायुती म्हणूनच लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महाजनांनी एका बड्या नेत्यावर श्रीलंकेत जाऊन बेकायदेशीरपणे किडनी विकत घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू-महंतांच्या नाराजीवरही त्यांनी भाष्य केले.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागावाटपात महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १२५ जागांचा आग्रह धरला आहे. मात्र, भाजपकडून त्यांना केवळ ७० ते ८० जागा देण्याचा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे. भाजप १५० जागांवर लढण्याची तयारी करत असल्याचे समजते.
मुंबईला महाराष्ट्रापासून कुणीही वेगळं करणार नाही. मुंबईचा महापौर महायुतीचा आणि मराठीच असेल. मुंबई मराठी माणसांचीच असल्याचे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे. महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून शेलारांनी मुंबईत महायुतीचच सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
सरकारी सदनिका गैरव्यवहार प्रकरणात क्रिडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. गैरव्यवहारप्रकरणी सत्र न्यायालयाने दिलेली दोन वर्षांची शिक्षा जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली आहे. सत्र न्यायालयाच्या निकालाला कोकाटेंनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते. पण तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. आता ते मुंबई हायकोर्टात निकालाला आव्हान देण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेे नवाब मल्लिक यांच्यासोबत इशान सिद्दीकी, व सना मलिक आज संवाद साधणार आहे. आगामी महापालिक निवडणु बाबत दोघे चर्चा करणार आहेत.
ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी पोहचले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीबाबत ते चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
महापालिका निवडणूक जाहीर होताच मनसे आणि ठाकरे सेना यांच्या बैठकांचा सपाटा पुन्हा सुरु झाला आहे. येत्या दोन दिवस स्थानिक नेत्यांच्या बैठका होणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे आज मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेेटीसाठी जाणार आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार या मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर अजित पवारांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. पिंपरीमधील भाजपचे नगरसेवक अश्विनी जाधव, शिवसेनेच्या शहरप्रमुख रूपाली आल्हाट, शिवसेना उपशहर प्रमुख नेताजी काशीद यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. तर भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भाजपला पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे.
भाजपने बिहारमधील मंत्री नितीन नबीन यांची पक्षाचे नवीन कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषणा केली. भाजपच्या याच पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपला डिवचलं आहे. 'पैसा, मतचोरी, निवडणूक आयोगाची मदत यामुळे लोकसभा- विधानसभा निवडणुका जिंकायच्या व जिंकल्यावर त्या विजयाचे सर्व श्रेय भाजप मुख्यालयाच्या विजय सोहळ्यात मोदी यांना देऊन मोकळे व्हायचे हेच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे काम झाले आहे. लोकशाही देशात उरलीच नाही. त्यामुळे ती भाजपमध्ये तरी कशी असेल? त्यामुळे चार ओळींचा एक आदेश काढून भाजपने नवीन कार्यकारी अध्यक्ष नेमला. मोदी म्हणतात, कार्यकर्त्याचा सन्मान झाला. आता मोदी म्हणतात म्हणजे ते मानायलाच हवे, पण भाजप अंतर्गत त्यास मान्यता आहे काय? अर्धा भाजप नबीन यांच्या नेमणुकीच्या धक्क्यातून सावरलेला दिसत नाही. भाजपमधील अल्बर्ट आईन्स्टाईनचा हा नवा शोध, नवा प्रयोग आहे, असं सामनामध्ये लिहिलं आहे.
मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झाल्या आहेत. अशातच आता आज आदित्य ठाकरे मुंबई शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. आज सायंकाळी सहा वाजता वरळी येथील एनएससीआय डोम इथे आदित्य ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आजच मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे.
महायुतीच्या जागावाटपासंदर्भात आज महत्त्वपूर्ण बैठक होणार असून भाजप मुंबई महानगरपालिसेसाठी 150 जागा मागणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर शिंदेंची शिवसेना देखील 100 जागांची मागणी करणार असल्याचं सुत्रांनी सांगिंतलं.
कोल्हापूरकरांच्या लढ्याला अखेर यश आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण अखेर माधुरी हत्तीणीला नांदणीत आणण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती समोर आली आहे. मठाच्या जागेत पुनर्वसन केंद्र उभारण्यास परवानगी मिळाली असून उच्चाधिकार समितीसमोर मुंबईत झालेल्या सुनावणीत पुनर्वसन केंद्राच्या बांधकामास 7 टप्प्यात मंजुरी देण्यात आली आहे. माधुरी आणि माहूत यांच्या नातेसंबंधाबद्दलही चर्चा सुनावणी दरम्यान झाली. तसेच, माधुरीच्या आरोग्याबाबत सुनावणीत सकारात्मक माहिती देण्यात आली.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक 900 मतदारांना एक मतदान केंद्र असणार आहे. यानुसार संपूर्ण शहरातील 3946 मतदान केंद्रांची निर्मिती केली जात आहे. यासाठी शाळा शासकीय नेम शासकीय इमारती सोसायटीमधील जागांचा शोध सुरू असून आवश्यकता भासल्यास पत्र्याच्या शेडमध्ये तात्पुरते मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.