बुटीबोरी नगरपरिषदेत भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. बुटीबोरीत प्रभाग क्रमांक सहामध्ये भाजपचे अरविंद जैस्वाल आणि सविता खंते बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग सहामधून अरविंद जैस्वाल आणि सविता खंते विरोधात कुणीही अर्ज दाखल न केल्याने बिनविरोध निवडून आले आहेत. बुटीबेरीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून निंद्य दुधे मैदानात, तर ठाकरे गटाकडून आकाश वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली होती.
कल्याणातील अर्णव खैरे आत्महत्येप्रकरणी महत्त्वाची घडामोड झाली आहे. प्रथमदर्शी पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता. पण आता लोकल ट्रेनमध्ये मारहाण करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध कल्याण पोलिसांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे पोलीस व स्थानिक पोलिसांच्या दोन स्वतंत्र तपास पथकांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना दरिंदा म्हटल्यानंतर परभणीतील भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. सेलूमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी सपकाळ यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दुसरीकडे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही हर्षवर्धन सपकाळ यांच्या या बोलण्याचा निषेध केला आहे. केवळ नैराशेतून सपकाळ यांनी असे स्टेटमेंट केल्याचे पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या आहेत.
जिल्हा नियोजन समितीचा निधी केवळ टक्केवारी मिळत नाही म्हणून दिला जात नसल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी जयकुमार गोरे यांच्यावर केला होता. त्यानंतर त्याला उत्तर देताना जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर पलटवार केला. त्यांनी, ज्यांनी आयुष्यभर फक्त टक्केवारी गोळा केली त्यांना उठता बसता फक्त टक्केवारीच दिसते, त्यांनी सांगितलेली कामं न झाल्याने बहुतेक त्यांची टक्केवारी बुडाली असेल अशा शब्दात टीका केलीय.
मुंबईतील अंधेरी भागात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. याचवेळी, भाजप कार्यकर्तेही जमले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. एका भाजप कार्यकर्त्याने काँग्रेस आमदार असलम शेख यांच्यावर गंभीर आरोप केले. 'असलम शेख आपल्यासारख्या पाकिस्तानच्या औलादीला आम्ही अजिबात भीक घालत नाही,' असे म्हणत भाजप कार्यकर्त्याने मंत्री मंगलप्रभात लोढा आणि त्यांच्या कुटुंबीयांना संपवण्याची धमकी दिल्याचा दावा केला. या घटनेमुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे.
भाजप नेते इतके नाजूक आहेत की एखादा शब्द वापरला की त्यांना फार दु:ख होतं, टोचल्यासारखं वाटतं पण त्यांनी त्या शब्दाचा अर्थ तरी पाहून घ्यावा. एखाद्या शब्दाचा अर्थ एखाद्या संदर्भासाठी लागू होत आहे का हे ही पहावे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात जातीय संघर्ष निर्माण झाला आहे. एका जातीचा माणूस दुसऱ्या जातीच्या माणसाच्या घरासमोरून जात नाही. मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष उभा केला. हिंदू मुस्लीम रोज खेळले जात आहे. हे विखारी वातावरण निर्माण केले त्याला जबाबदार असल्याबद्दल आता दरिंदा म्हटले तर कसली जीभ घसरली?
ट्विटर आणि चैनल वर पक्ष चालत नाही पक्ष चालवायला लोकांमध्ये जावं लागतं त्यांचा विश्वास जिंकावा लागतो अशी टीका मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यांच्या चिन्हावर उमेदवार नाही ते त्यांनी पहावे असा सल्ला गोरे यांनी रोहित पवारांना दिला आहे. भाजपचे बिनविरोध उमेदवार निवडून आलेल्या वर रोहित पवार यांनी टीका केली होती त्या टीकेला आज धाराशिव मध्ये गोरे यांनी प्रत्युत्तर दिले.
डोंबिवलीत भाजपला धक्का, भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचे निकटवर्तीयाचा शिवसेनेत प्रवेश
उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीत भाजपला धक्का दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेल्या योगेंद्र भोईर यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. योगेंद्र भोईर हे डोंबिवलीतील भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष होते. योगेंद्र यांनी आज पत्नी ट्विंकल भोईर यांच्यासह आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
फोडाफोडीच्या नाराजीनाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नाव न घेता पहिल्यांदाच टीका केल्याचं दिसून आलं. डहाणूत आपण अहंकाराविरोधात एकत्र आलोय, रावणाची लंकाही अहंकारामुळे जळून खाक झाली होती असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे आता भाजपकडून त्याला काय उत्तर मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पालघरच्या डहाणू नगरपरिषदेमध्ये भाजपविरोधात सर्वपक्षीयांनी मोट बांधली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर ठाकरेसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारानं माघार घेतल्यानं भाजप विरुद्ध शिंदेंची सेना असा थेट सामना होणार आहे.
भाजपने राज्यात कार्यकर्त्यांना बाजूला ठेवले आणि त्यांच्या नेत्यांच्या नातेवाईकांना निवडणुकीत उतरवल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. कोयता गँग, मॉब लिंचिंग, ड्रग्स विक्रेते गुंडागर्दी करणाऱ्यांना भाजपने तिकीट दिल्याचा आरोप देखील सपकाळांनी केलाय. रावणालाही एवढा अहंकार नव्हता एवढा भारतीय जनता पार्टी दाखवत असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. तसेच अजित पवारांचे निधी देण्यासंदर्भातील विधान म्हणजे दादागिरी आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आमदार-खासदार मैदानात उतरणार आहेत. निवडणुका होईपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे निर्देश संपर्क प्रमुखांना पक्ष नेतृत्वाने दिले आहेत. खासदार नरेश म्हस्के यांना ठाणे, नवी मुंबई आणि पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून एकूण 40 ठिकाणी जिल्हा संपर्क प्रमुख पदांची घोषणा करण्यात आली आहे.
भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आणि प्रचार सभा गडचिरोलीत पार पडली. यावेळी काहीजण उन्हामध्ये बसल्याचं दिसताच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्षांचे कान टोचत मंडप पूर्ण का नाही टाकला? याबाबत विचारणा केली. निवडणूक आयोगाला आपण हिशोब देऊ, तुम्ही घाबरू नका. तुम्ही एक पडदा टाकला तर आपण तो 50 रुपयाचा असल्याचं सांगू. मी स्टार प्रचारक आहे. कशाला हिशोब लागतो? मी राज्यावर आहे, राज्यात आम्ही हिशेब देऊ. मात्र आमच्या लाडक्या बहिणी उन्हात बसवू नका, असे बावनकुळे म्हणाले.
सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी सक्तीची करण्यात आली आहे. सुरुवातील केवायसीसाठी 18 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती, त्यानंतर आता यामध्ये वाढ करण्यात आली असून, केवायसीसाठी आता 31 डिसेंबरपर्यंत मुदत असणार आहे.
अर्णव खैरे याचा मृत्यू भाषेमुळे झालेल्या वादातून झाला, असे त्यांचे वडील सांगतात. मी त्यांचा दावा नाकारत नाही. पण अद्याप या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही. ज्या मुलांनी अर्णवला मारहाण केली, ते अद्याप पकडले गेले नाहीत. आपण अर्णवला भाषिक वादावरुनच मारहाण केली, अशी कबुली अद्याप त्यांनी दिलेली नाही. त्यामुळे अर्णव खैरे याने त्यावरुनच आत्महत्या केली की आणखी दुसरे कारण होते, याबाबत स्पष्टता नाही. या सगळ्याचा तपास होणे अद्याप बाकी आहे. हे सगळं बाहेर येण्यापूर्वी भाजपला आणि अमित साटम यांना इतक्या घाईने आंदोलन करण्याची गरज काय होती? तुम्ही अर्णव खैरेच्या मृत्यूचं राजकारण करण्याचा नीचपणा करताय, हे लक्षात ठेवा, असे मनसेचे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
शिवसेना आणि मनसे हे आधीपासूनच एकत्र आले आहेत, ही लोकांची इच्छा असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला सोबत घेणार नाही हा काँग्रेसचा निर्णय वैयक्तिक असल्याचंही ते म्हणाले. शिवसेना आणि मनसे एकत्रच असून त्यासाठी आम्हाला कुणाचा आदेश किंवा कुणाच्या परवानगीची गरज नाही. शरद पवार आणि डावे पक्षसोबत मुंबई वाचवण्यासाठी आमच्यासोबत आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.
पालघर नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे. नगराध्यक्षपदासाठी दोन्ही राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे.
अमरावती महापालिकेच्या अग्निश्यामक दलाचे कर्मचारी राजेश मोहन यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून विषप्रशान करून आत्महत्या केली आहे. मोहन यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच संबंघितांवर ॲस्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी नातेवाईक हे शुक्रवारपासून अमरावतीच्या शवविच्छदेन गृहासमोर ठिय्या देऊन बसले आहेत.
महाविकास आघाडीसोबत येण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अजून प्रस्तावही आलेला नाही. त्यामुळे त्याबाबत चर्चाही नाही. ठाकरे बंधू एकत्र येत असताना महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र येऊन मुंबई महापालिका निवडणूक लढवावी, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मांडली आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेसोबत युती करण्यास काँग्रेस पक्षाने नकार दिला आहे. मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी युती करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मनसेचे काय होणार, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
आम्ही आंदोलन नाही तर प्रार्थना करत आहोत. काही राजकीय पक्ष आणि नेते संपलेले आपले राजकारण पुन्हा जीवंत करण्यासाठी समाजात तेढ निर्माण करत आहेत. प्रक्षोभक विधानं करून लोकांची माथी फडकाविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळेच एक मराठी युवक अर्णव खैरे याला मारहाण झाली. त्यामुळे खचलेल्या अर्णवने आत्महत्या केली. त्यांच्या राजकारणामुळे एका मराठी तरुणाला जीव गमावावा लागला. त्यामुळे अशा राजकीय नेत्यांना सदबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना आम्ही शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन करणार आहोत, असे मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार आमदार चंद्रकांत रंघुवंशी भाजप उमेदवाराला धमकी देत असल्याचा आरोप भाजप माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी केला. भाजप उमेदवाराला फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख आणि विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून साम-दाम दंड भेदाचा वापर करत आहेत. नंदुरबार नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार अविनाश माळी यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचं डॉ. हिना गावित यांनी आरोप केला.
महापालिकेसाठी महायुती कशी होईल, यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. त्या-त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती पाहून, त्या ठिकाणचे पदाधिकारी युतीचा निर्णय घेऊन वरिष्ठांना कळवतील आणि त्यानंतर वरिष्ठ महापालिका निवडणूक युतीचा शेवटचा निर्णय घेतील, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं.
सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर अणदूर जवळ क्रुझर गाडीचे टायर फुटून अपघात झाला असून, पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या अपघातात सात ते आठ जण गंभीर जखमी असून, त्यांना सोलापूर इथं उपचारासाठी हलवलं आहे. क्रुझरचा टायर फुटल्यानंतर पलटी होत जात ट्रॅक्टरला जाऊन धडक मारली.
शिर्डीत नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्याना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष उमेदवाराला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. माजी उपनगराध्यक्षाच्या कुटुंबाने मारहाण केल्याचा आरोप असून शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी खैरे कुटुंबाची भेट घेतली असून, अर्णव हा भाषा वादाचा बळी आहे. तुमच्या मुलांच्या राजकीय भविष्य घडवण्यासाठी मराठी मुलाचा बळी घेणार का? असा सवाल चित्रा वाघ यांनी ठाकरे बंधूंना केला आहे. अर्णवचा बळी घेतला, काय मिळवलं हे करून, त्या मुलाची काय अवस्था केली, त्याची काय चूक होती, कोण जबाबदारी घेणार, असे प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केले आहेत.
वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अमरावती महापालिकेच्या फायर ब्रिगेड कर्मचाऱ्याची आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बडनेरा झोनमध्ये कार्यरत असलेले राजेश मोहन, असे विष प्राशन करून आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. राजेश मोहन यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे मनपा कर्मचारी संतोष केंद्रे व लक्ष्मण पावडे या दोन कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हे दाखल करून अटकेची मागणी करण्यात येत आहे. मृत्यूपूर्वी कर्मचाऱ्यांचा संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काल रात्रीपासून अमरावतीच्या शव विच्छेदन गृहाबाहेर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातुश्री कमलताई गवई यांच्यासह नातेवाईक आणि आझाद समाज पार्टीच ठिय्या आंदोलन सुरू आहे.
काही दिवसापूर्वी सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. त्यानंतर सुरज चव्हाण यांचं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पद काढून घेण्यात आलं. मात्र पुन्हा त्यांना राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्तेपदावर नियुक्ती केल्यामुळे छावा संघटनाक्रम झाली आहे. आज लातूर जिल्ह्यातील औसा इथं होणाऱ्या सभेत छावा संघटनेचे कार्यकर्ते अजित पवारांना याचा जाब विचारणार होते. सभेत गोंधळ होण्याची देखील शक्यता असल्याने, विजयकुमार घाडगे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बस स्थानकावरील सार्वजनिक स्वच्छतागृह, हॉटेलचे किचन तसेच पाणपोईची पाहणी केली. सार्वजनिक स्वच्छतागृह तसेच पाणपोईवर अस्वच्छता असल्याने डेपो मॅनेजरला नोटीस काढण्याचा आदेश दिला. अस्वच्छतेवरून मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. पाणपोईवरील अस्वच्छता पाहून अधिकाऱ्याला पाणी पिऊन दाखवा अशा शब्दात झापले. प्रवाशांना सुविधा देणं हे आमचं काम आहे मात्र त्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाई करणार, असे मंत्री प्रतास सरनाईक यांनी म्हटले आहे.
नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिंदे यांच्या चार जाहीर सभा होणार आहेत. डहाणू, जव्हार, पालघर आणि वाडा अशा चार ठिकाणी शिंदे जाहीर सभा घेणार आहेत.
दबाबतंत्र, गुंड वापरुन भाजपने 100 नगरसेवक बिनविरोध निवडून आणले आहेत. पोलीस बळाचा वापर करुन भाजपने हे काम केले आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
मुंढवा जमीन व्यवहारप्रकरणी आज महसूल विभागाची चौकशी पुणे आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. यातील अनेक कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यांनी बनवले आहेत. त्या संदर्भाने तपास होणार.
पुण्यातील नवले पुलावर नुकताच भीषण अपघात झाला होता, यात 8 जणांचा मृत्यू झाला होता. याला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आज या पुलावर दशक्रिया विधी आंदोलन करण्यात आले. ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच ठिकाणी स्थानिक नागरिक प्रशासनाचा दशक्रिया विधी करीत आहेत.
भाजपचे तथाकथित संकटमोच गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात दडपशाहीने वंचितसह समविचारी पक्षाच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गाने बळजबरी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडले गेलं, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. दडपशाही आणि गुंडगिरी करून लोकशाहीची हत्या करू पाहणाऱ्या, लोकशाहीला घातक असणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासारख्या बेफाम मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घेऊन, त्यांचे असले चाळे खपवून घेतले जाणार नाहीत असा स्पष्ट संदेश द्यावा, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे.
आगामी माहपालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत आनंदराज आंबेडकर यांच्या रिपल्बिकन सेनेची युती झाली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, आनंदराज आंबेकर यांनीकुठल्याही अटीशर्ती न ठेवता शिवसेनेशी युती केली. माझ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे हीच त्यांची एकमेव मागणी होती. ही युती सत्तेसाठी नाही, तर दलित, वंचित, शोषित आणि अन्यायग्रस्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झाली आहे.
माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी माजी मंत्री, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्याला ठाकूर यांनी प्रत्युत्तर देत काळ्या दगळावरची पांढरी रेष आहे, आम्ही काँग्रेस सोडणार नाही. पण रवि राणा आणि नवनीत राणा यांना भाजप फेकून देईल हे मात्र निश्चित आहे, असे म्हटले आहे.
भाजपमुळे जळगाव शहराची दुरवस्था झाल्याची टीका सुरेश जैन यांनी केली आहे. ते म्हणाले, जळगावला सिंगापूर करायचे होते. जळगावचे पॅरिस करण्याचे स्वप्न पाहिले जात होते. मात्र आजही शहर कुठे पोहोचले आहे? त्याची काय अवस्था आहे? सिंगापूर आणि पॅरिस झाले नाही मात्र जळगाव हे आता एक खेडे झाले आहे.
अमित शाहांना भेटून आलेले एकनाथ शिंदे हे अस्वस्थ आहेत.त्यांचे 35 आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र 'सामना'मधून करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढणाऱ्या महिलेच्या कारचा अंबरनाथमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढणाऱ्या महिला उमेदवार किरण चौबे या गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघातात अंबरनाथ महानगरपालिकेचे दोन कर्मचारी आणि एका पादचारी नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. किरण चौबे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.