मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. पुढच्या दोन महिन्यांत जर मुंडेंना सहआरोपी न केल्यास राज्यभर आंदोलन उभारणार असल्याचा इशाराही जरांगेंनी दिला आहे.
राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी स्वतंत्र विदर्भ हा आमच्या पक्षासाठी कायमच प्राधान्याचा विषय असल्याचं विधान केलं. या त्यांच्या विधानानंतर आता वेगळ्या विदर्भाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये, महाराष्ट्राचे तुकडे करायला तो काय केक वाटला का,असा संतप्त सवाल या व्हिडिओत केला आहे.
कोल्हापुरातील सायबर चौकात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना पुन्हा एकदा घडली आहे. भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने तीन ते चार वाहनांना उडवले.सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी नाही.सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे.सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना ट्रक येऊन धडकला.यानंतर आता घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी याचठिकाणी अपघात झाला होता.
भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांचं आमदार आदित्य ठाकरे यांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील 22 आमदार भाजपमध्ये सामील होतील, या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, आमदार भाजपमध्ये जातात असे सांगून ते स्वतःच्या पक्षाचा अवमान करतात. त्यांचे आमदार त्यांच्याकडेच राहायला हवेत. जर आमदार इतर पक्षात जात असतील, तर त्याचा अर्थ तुमच्या पक्षात त्यांना टिकवून ठेवण्याचं आकर्षण संपलं आहे, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला.
सध्या ठाकरेंच्या शिवसेना पक्षात मोठ्या घडामोडी घडत असल्याचे दिसत असून विरोधी पक्षनेतेपदावरून पुन्हा एखदा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. कोकणातील बडे नेते आमदार भास्कर जाधव यांची पुन्हा नाराजी समोर आली असून याला कारण ‘मातोश्री’ आहे. ‘मातोश्री’वरून ऐनवेळी आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढे करण्यात आले आहे. यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेत बंड होणार असून तो भास्कर जाधव करतील आणि ते १० आमदारांसह भाजपमध्ये जातील अशा चर्चा रंगल्या आहेत. यावर भास्कर जाधव यांनी आपण नाराज नसून आदित्य ठाकरेंना हे सरकार विरोधी पक्षनेतेपद देणार असेल तर आपण बाजूला होवू, मागे हटू असे म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस हे सावजी सारखे तिखट आणि संत्र्यासारखे गोड आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, अशा शब्दात एकानाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे.
शिंदे गटाचे 22 नाही 35 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आणि तेही उदय सामंत यांच्या नेतृत्वात असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यांनी, मला शिंदे सेनेतील काही आमदार भेटले होते तेच मला म्हणाले होते की आम्ही 22 नाही आम्ही 35 जण तयार आहोत, सामंत यांच्या नेतृत्वात आम्ही जाणार आहोत, सामंत यांचे नाव त्याच दोन आमदारांनी मला सांगितल्याचा उल्लेखही खैरे यांनी केला आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी ऐन हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच एक खळबळजनक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. दानवे यांनी 'कॅश बॉम्ब' टाकून खळबळ उडवून दिली. त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत पैशांनी भरलेली बॅग आणि नोटांचे बंडल दिसली होती. यानंतर आता राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत असतानाच दानवे यांच्या विरोधात रायगडमध्ये उद्रेक झालाय. अलिबाग, रोहा, मुरुड, माणगावमध्ये आंबदास दानवे यांचा शिवसैनिकांकडून निषेध करण्यात आला आहे. दानवे यांच्या पुतळ्याच दहन, फोटोला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करीत आंबादास दानवे यांचा रायगडमध्ये निषेध केला आहे.
सुनील तटकरे आणि मातोश्रीचं साटलोटं असून विरोधकांना हाताशी घेऊन आमदारांच्या बदनामीचा प्रयत्न केला जातोय असा गंभीर आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार थोरवेंनी तटकरेंवर केला होता. ज्याला आता तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं असून आपला आणि दानवेंचा दोन वर्षांपासून कोणत्याही प्रकारचा संपर्क नसल्याचा दावा तटकरेंनी केलाय.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून स्पीडब्रेकरचा अंदाज न आल्याने भरधाव वेगात आलेली कार थेट हवेत उडून डिव्हायडरला धडकली. यानंतर कारने पेट घेतला. पण दैव बलवत्तर म्हणून कारमधील 5 जणांनी बाहेर पडत स्वत: चा जीव वाचला. ही धक्कादायक घटना संभाजीनगर जिल्ह्यातील बनगाव लाहुकी फाट्यावर घडली असून यात काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र कार आगीत जळून खाक झाली आहे.
अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात खालची आळी येथे भरदिवसा बिबट्याने दोन युवकांवर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर नागावसह अलिबागमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याची माहिती मिळताच वन अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत.
आमदार महेंद्र दळवींनी केलेल्या आरोपावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आम्हा दोघांना एकत्र चर्चेला बोलवा, अशी मागणी केली. मी तर तो व्हिडिओ महेंद्र दळवींचा नाही, असं मी म्हटलं आहे. मी तर राष्ट्रवादीचा आमदार आहे. रायगडमधील राजकारण सर्वांना माहिती आहे. आमच्यात तिथं मतभेद आहेत. याचा अर्थ राष्ट्रवादीवर आरोप करताना तुमच्याकडे तसे पुरावे असतील तर त्यांनी ते मुख्यमंत्र्यांकडे सादर करून तो सिद्ध करावा. राष्ट्रवादीचा आमचा कधीच मित्रपक्ष असू शकत नाही, हे विधान दळवींनी रायगडपुरतं केलं आहे की संपूर्ण राज्यासाठी केले आहे, हे पाहून त्याबाबत उत्तर देऊ, असे मिटकरी यांनी सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक झाली. त्या बैठकीत महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात अहवाल देण्याचे आदेश जिल्हाप्रमुखांना देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती गट आणि गटात आपले उमेदवार मजबूत आहेत का? महाविकास आघाडी म्हणून तो सर्वांना पसंत आहे का? गट आणि गणात ताकद किती आहे. मनसेची ताकद किती आहे? आदी गोष्टींचा आढावा घ्या, अशी सूचना उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना केली आहे.
नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आणि भाजपचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडत कपडे फाडले होते. पण हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात आलेल्या या दोन्ही आमदारांनी विधान भवन परिसरात फोटोसेशन केले आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हमाल भवनात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यांच्या दर्शनासाठी सकाळपासून रिघ लागली होती. वयाच्या ९४ व्या वर्षीही त्यांनी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन केले होते.
विरोधी पक्षनेतेपदासाठी आम्ही एकच नाव दिलेले आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही. आतापर्यंतचे हे चौथे अधिवेशने आहे. विरोधी पक्षनेतेपदाशिवाय आपण अधिवेशन चालवू शकतो, असे विधानसभा अध्यक्षांना वाटत असेल तर त्यांनी विरोधी पक्षनेत्याची का गरज नाही ते सांगावं. एवढे बहुमत असूनही विरोधी पक्षनेता नसावा, असं सरकारला का वाटत असेल. त्यांना विरोधी पक्षनेत्याची एवढी भीती का वाटते. विरोधी पक्षनेतेपदाबाबत आमच्यात कोणतेही रुसवे फुगवे नाहीत. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट होऊ नये, यासाठीच विरोधी पक्षनेतेपदाबाबत इतर नावांचा विचार सुरू असल्याची बातमी सोडण्यात आली होती, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
नगरपरिषद निवडणुकीत पैसे वाटपाचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत. हे सर्व पैसे भाजपच्या लोकांजवळ आढळून आले आहेत. ते सर्व पैसे सुटकेसमधून आले आहेत. शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी केलेल्या कामाचे मी स्वागत करते. त्यांनी केलेले काम देशभक्तीचे आहे. ते टिव्हीचे कॅमरे घेऊन त्या ठिकाणी गेले होते. पैसे वाटण्याच्या दहा घटना घडलेल्या आहेत. नगरपरिषद निवडणुकीत पिस्तूल दाखविण्यात आले. आरक्षणाचा घोळ झाला. ईव्हीएमचे लॉकही तोडले. भाजपचे २५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ते सर्व परिवारवादी आहेत, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी नगरपरिषद निवडणुकीतील गैरप्रकार लोकसभेत मांडले आहेत.
विधिमंडळात आज भटक्या कुत्र्यांबाबत सर्वपक्षीय आमदार आक्रमक झाले. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या विषयावर लक्षवेधी मांडली. सुनिल प्रभू यांच्यासह अन्य काही आमदारांनीही चर्चेत सहभागी घेत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. त्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संयुक्त समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत महाराष्ट्रातील नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीचा मुद्दा मांडला. नेत्यांचेच नातेवाईक बिनविरोध कसे निवडून येतात, नगरपरिषदेत २५ जागा बिनविरोध कशा, भाजपकडे इतके पैेसे कुठून आले, असे सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. सिंधुदुर्गातील पैसे वाटपाचा मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला.
राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांसाठी मतदारयाद्यांवर हरकती मागविण्यात आल्या आहेत. अंतिम मतदारयाद्या २२ डिसेंबरला प्रसिध्द होणार होत्या. मात्र, निवडणूक आयोगाने त्यास मुदतवाढ दिली आहे.
मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बदनामी प्रकरणात कोर्टाने रोहित पवारांना आपली बाजू मांडण्यासाठी १६ डिसेंबरपर्यंत वेळ दिली आहे. स्वतः हजर राहण्याचा आदेश असूनही त्यांनी वकिलांमार्फत भूमिका मांडली. रम्मी खेळत असल्याचा कोकाटे यांचा व्हिडिओ कुणी काढला आणि तो पवारांना कसा मिळाला, याबाबत अधिक तपासाची मागणी करण्यात आली.
तुकाराम मुंडेंविरोधात आमदार कृष्णा खोपडे आक्रमक, फोनवरून धमकी दिल्याची माहिती, मुख्यमंत्री, अध्यक्ष, पोलिस आयुक्त आणि सीताबर्डी मध्ये तक्रार.
मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील आज मसाजोग येथे दाखल झाले आहेत. आज संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व आहे. संतोष देशमुख यांच्या दुःखद निधनाने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. संतोष देशमुख यांची पवनचक्कीच्या वादातून अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागला होता. या प्रकरणातील एका आरोपीचा शोध सुरु आहे.
नागपुरातील हिवाळी अधिवेशनात साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा मुद्दा मांडण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. महिला डॉक्टर फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होती. डॉक्टरने 23 ऑक्टोबर रोजी फलटणमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. हातावर लिहिलेल्या एका सुसाईड नोटमध्ये तिने पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नावं लिहिली होती. तरुणीच्या हातावर नेमकं हस्ताक्षर कोणाचं होतं? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बदनामी प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा आदेश काढला आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे यांचे आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे सेनेच्या आमदार महेंद्र थोरवे यांचा व्हिडिओ व्हारयल करुन हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या हातात आयेत कोलीत दिले आहे. दळवींकडे इतक्या नोटांचे बंडल आले कसे, असा प्रश्न विचारला जात आहे. दळवीनी आरोप फेटाळले आहेत. आरोप सिद्ध झाले तर आमदारकीची राजीनामा देईल, असे दळवींनी सांगितले आहे.
कणकवली नगरपंचायत निवडणूक मतपेट्या कणकवली तहसील कार्यालयामधील स्ट्राँगरूम मध्ये सीसीटीव्हीच्या नजर कैदेत ठेवण्यात आल्या आहेत. या स्ट्राँगरूमच्या बाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कणकवली शहर विकास आघाडीच्या नेत्यांकडून स्ट्राँगरूमच्या बाहेर मतमोजणी होईपर्यंत एक व्यक्ती ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शहर विकास आघाडीकडून ईव्हीएम स्ट्राँगरूमच्या बाहेर दिवस रात्र पहारा असल्याचे दिसून येत आहे.
विरोधी पक्षनेतेपदाबाबत महाविकास आघाडीचे नेते आज विधानसभाध्यक्ष, सभापतींना भेटणार आहेत. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी करणार आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टवर आता आता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महेंद्र दळवी म्हणाले, आमदारांना आणि पक्षाला बदमान करणं हे दानेवेंचं काम आहे. त्यांनी पुरावे असतील तर ते सादर करावे त्याच्याशी माझा काही संबंध आढळला तर मी राजीनामा देईन. शिवाय विधीमंडळात मी हा प्रश्न उपस्थित करणार आहे.'
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं की, 'या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे. जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?' दानवेंनी आपल्या ट्विटमुशे आता हे आमदार कोण आहेत? या चर्चांना आता उधाण आलं आहे.
पुणे शहरांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे पुणे दौऱ्यावर येणार असून या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावणार असल्याचं सांगितल्या जात आहे. दरम्यान शरद पवारांच्या सूचनेनंतर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष पुणे दौऱ्यावर येणार असून १९ आणि २० दोन दिवस प्रदेशाध्यक्ष पुण्यामध्ये ठाण मांडून असणार आहे. या दौऱ्या दरम्यान ते पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतील तसेच पक्षातील स्थानिक नेत्यांचं मत देखील जाणून घेणार आहेत.
पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नी काँग्रेस नेत्या नवज्योत कौर सिद्धू यांनी, 'काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी 500 कोटींची गरज असते', असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर आता नवज्योत कौर सिद्धू यांच्यावर काँग्रेस पक्षाने मोठी कारवाई केली आहे. त्यांचं काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) 21 डिसेंबर रोजी नियोजित असलेली ‘महाराष्ट्र गट ‘ब’ (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. आता ही परीक्षा 4 जानेवारी 2026 रोजी घेण्यात येणार आहे. राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदानाची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.