निवडणूक आयोगाकडून १२ राज्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील SIR होणार आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप, गोवा, पुद्दचेरी, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमधील मतदारयाद्या आज रात्री गोठवल्या जातील, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी जाहीर केले.
भारतीय निवडणूक आयोगाने आज मतदारयाद्यांच्या पुनर्पडताळणीबाबत मोठी घोषणा केली. SIR चा पहिला टप्पा बिहारमध्ये पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात देशातील १२ राज्यांमध्ये ही प्रक्रिया होणार आहे. २०२६ मध्ये विधानसभेची निवडणूक असलेल्या सर्व राज्यांचा यामध्ये समावेश असेल, असे मुख्य निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार यांनी सांगितले.
भारतीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद थोड्याच वेळात सुरू होईल. या निवडणुकीत मतदारयाद्यांच्या पुनर्पडताळणीबाबत मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रबाबत आयोग काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
परिवारवादी पक्षांचे राजकारण या देशात चालणार नाही. ‘पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स’च देशाचे नेतृत्व पुढे सांभाळणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. एका चहावाल्याच्या घरात जन्माला आलेला बालक त्याग, समर्पण, सेवा आणि देशभक्तीच्या आधारावर या देशाचे पंतप्रधान एकदा नव्हे तर तीन वेळा बनतो. लोकशाहीवादी पार्टीवर आमचा विश्वास किती मोठा हे यातून दिसून येते, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत भाजप कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात सांगितले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उद्या (ता. २८ ऑक्टोबर) नागपूरमध्ये भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात एकट्या अमरावतीमधून एक हजारपर्यंत ट्रॅक्टर सहभागी होणार आहेत. या मोर्चासाठी बच्चू कडू आजच नागपूरकडे रवाना होत आहेत. माजी खासदार राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे अजित नवले यांच्यासह लाखो शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत.
आता आपल्याला ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी सगळी ताकद पणाला लावा. विरोधकांचा सुपडा साफ करून टाका, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. शाह यांच्या हस्ते मुंबईत प्रदेश भाजप कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते मुंबईत प्रदेश भाजप कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. चर्चगेट परिसरात भाजपचे नवीन दिमाखदार कार्यालयात उभारण्यात येणार आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे राज्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दोन महिन्यांपूर्वी नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्या कार्यालयात शहराध्यक्षांनी दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला पदाधिकाऱ्याने लावणीवर नृत्य सादर केले आहे. या कार्यक्रमाला शहराध्यक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पक्ष कार्यालयात नृत्य सादर करणं कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
फलटणमधील डॉक्टर युवतीच्या आत्महत्येप्रकरणी शिवसेना उपनेत्यांनी कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त महासंचालक यांची भेट घेतली. किशोरी पडणेकर आणि इतरांनी निखील गुप्ता यांना याप्रकरणी निवेदन दिले आहे. राज्यातील महिलांना पंधराशे रुपये दिल्याचे बोंबलून बोंबलून लोकांना सांगता. त्याच्या बळावर मतं घेऊन सत्ता मिळवता. मग, महाराष्ट्रातील आया, बहिणी, मुली यांच्या संरक्षणाबाबत काय? त्यामुळे राज्यातील महायुती सरकारवरील महिलांचा विश्वास कमी होत चालला आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला.
प्रकाश आंबेडकरांनी जैन मुनींची भेट घेतली आहे. यावेळी जैन बोर्डिंग जमीन प्रकरणाविषयी जैन मुनींशी चर्चा करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल जैन समाजाने पुण्यातील जमिनीच्या बेकायदेशीर विक्री व्यवहाराविरोधात भव्य मूक मोर्चा काढला. राजा बाजार जैन मंदिरापासून निघालेला मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला आहे. जैन समाजाकडून निवेदन सादर करण्यात आले असून व्यवहार रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
फलटनमधीस डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणाकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. या प्रकरणी चौकशी सुरु आहे. आता महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांची उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली आहे.
कुणाला खुमखुमी असेल तर मैदान मोकळं आहे.
जैन बोर्डिंग हाऊसची वीटही हलू देणार नाही.
१ तारखेला आंदोलनात सहभागी होणार,
जैन मंदीर ताब्यात मिळे पर्यंत लढणार- रवींद्र धंगेकर
माजी आमदार रवींद्र धंगेकर हे पुण्यातील जैन बोर्डिंगमध्ये दाखल झाले आहे. ते जैन मुनी यांचे आशीर्वाद घेणार आहेत. आजपासून रवींद्र धंगेकर हे जैन बोर्डिंग येथेच आंदोवन करणार आहेत. दोन दिवस याविषयी काही बोलणार नसल्याची रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.
कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना आता 24 तास दर्शन मिळणार आहे. 9 नोव्हेंबरपर्यंत ही सुविधा असेल, असे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणी नाशिकमध्ये जैन समाजाचा मोर्चास सुरवात झाली आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल जैन समाजाने हा मोर्चा काढला आहे. नाशिकच्या अशोक स्तंभावरून मोर्चाला सुरुवात
नाशिक येथील सातपूर गोळीबार प्रकरणातील लोंढे टोळीचा फरार सराईत गुन्हेगार शुभम चंद्रकांत निकम याला अटक करण्यात आली आहे. गुन्हा घडल्यापासून संशयित फरार होता. वरिष्ठ निरीक्षक यांच्या पथकाचे गस्त करत असताना फरार संशयित गौळाणेरोड येथे आल्याचे समजले. पथकाने सापळा रचत संशयिताला घराजवळून ताब्यात घेतले.
ओबीसी समाजाचा प्रचंड मोठा महामोर्चा नागपुरात झाला, तरी सरकार झुकण्यास तयार नाही. बावनकुळे साहेब म्हणतात जीआर फक्त मराठवाड्यासाठी आहे. पण एकदा ओबीसी प्रमाणपत्र मिळाले तर देशात कुठेही लागू होते, वापरले जाऊ शकते. मंत्री महोदय दिशाभूल करत आहेत, या जीआरने ओबीसींचे नुकसान होत आहे. केवळ खुर्चीसाठी ओबीसींच्या हिताकडे दुर्लक्ष करू नका, मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. महायुती सरकारने आणलेला जीआर रद्द करण्यासाठी १ नोव्हेंबरला विदर्भातील ओबीसी नेत्यांसोबत बैठक होणार आहे. जीआर रद्द करण्यासाठी आणि ओबीसींचे नुकसान टाळण्यासाठी पुढील रणनीती ठरवणार आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
बलात्कार प्रकरणात नाशिक मध्यवर्ती कारगृहात बंदी असलेल्या कैद्याने गळफास घेत आत्महत्या केली. तो बलात्काराच्या गुन्ह्यात येथे 2024 पासून कैद होता. आत्महत्येचं कारण समजू शकले नाही. नाशिकरोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुळच्या बीड जिल्ह्यातील असलेल्या आणि फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डाॅक्टरने आत्महत्या केली. तिने सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. दरम्यान, महिला डाॅक्टरच्या कुटुंबीयांनी माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांनी भेट घेतली, या भेटीनंतर या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली.
जैन बोर्डिंग व्यवहार रद्द करण्यासाठी बिल्डर गोखले यांनी ट्रस्टींना पत्र पाठवले आहे. या व्यवहारातून आपण माघार घेत असल्याचे सांगत त्यांनी दिलेली रक्कम परत देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे हा व्यवहार रद्द होण्याचे सांगितले जात आहे.
परदेशात पळून गेलेला कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीतील सदस्य, खंडणी प्रकरणात फरार आरोपी अमोल उर्फ गोरख बबन बंडगर या गुन्हे शाखेने अटक केली आहे. भिगवण येथे पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यावर भिगवण, वालचंद नगर, बारामती पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल. वारजे पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.