Khotkar-Sattar
Khotkar-Sattar Sarkarnama
मराठवाडा

अब्दुल सत्तार म्हणतात, खोतकरांचा व्यवहार पारदर्शक, कागदोपत्री चूक झाली असेल..

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः शिवसेनेचे माजी मंत्री अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर ईडीने केलेली कारवाई आणि त्यात खोतकरांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर केलेले आरोप, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतांनाच राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे आपल्या मित्राच्या म्हणजेच खोतकरांच्या मदतीला धावून आले आहेत. प्रसार माध्यमांनी खोतकरांवरील कारवाई संदर्भात विचारले तेव्हा, खोतकरांचा व्यवहार पारदर्शक आहे, ते व्यवहारी आहेत, कागदोपत्री कुठे काही चूक झाली असेल, असे म्हणत सत्तार यांनी खोतकरांची पाठराखण केली आहे.

खोतकर जर थेट रावसाहेब दानवे यांचे नाव घेत असतील तर निश्चितच त्याच काही तथ्य असेल, असेही सत्तार म्हणाले. अर्जून खोतकर सभापती असलेल्या जालना कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जालना रामनगर सहकारी साखर कारखान्यातील घोटाळ्याच्या तक्रारीवरून ईडीने काही दिवसांपुर्वी कारवाई केली. कृषी उत्पन्न बाजार समितीसह खोतकरांच्या घरावर ईडीने छापा टाकत झाडाझडती घेतली.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर आठवडाभरातच ईडीने ही कारवाई केली असली तरी सोमय्या हे प्यादे आहेत, त्यांचा बोलवता धनी हे रावसाहेब दानवे असल्याचा आरोप खोतकरांनी केला होता. या प्रकरणावरून राजकारण तापले असतांनाच आता ग्रामविकास व महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील या वादात उडी घेतली आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अर्जून खोतकर यांना रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जालना लोकसभा मतदारसंघातून काॅंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास राजी करण्याचे प्रयत्न सत्तार यांनी केले होते. खोतकर यांनी देखील तशी तयारी सुरू केली, पण दानवेंनी उद्धव ठाकरे यांना सांगून खोतकरांना माघार घ्यायला लावली होती. पण या माघारीमुळे खोतकर हे राजकारणातून दूर गेल्यासारखी काहीशी परिस्थीती निर्माण झाली.

पुनर्वसन रखडल्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या खोतकरांच्या अडचणीत ईडीच्या कारवाईने भर पडली. अब्दुल सत्तार यांनी मात्र पुन्हा एकदा खोतकरांची बाजू घेत त्यांच्या व्यवहार पारदर्शक असून ते व्यवहारी असल्याचे सांगत त्यांची पाठराखण केली आहे. कागदोपत्री काही चूक झाली असले, पण त्या कागदी घोड्याचा आधार घेऊन त्यांना बदनाम करणे, त्यांच्या मागे ईडीचा ससेमीरा लावणे चुकीचे आहे.

एखाद्या व्यक्तीवर साधा एफआयआर नोंदवावा, अशा प्रकारे ईडीच्या कारवाया केवळ विरोधकांना त्रास देण्यासाठी सुरू आहेत. यामागे दानवे आहेत की नाही याची माहिती मला नाही, पण ज्या अर्थी खोतकर थेट त्यांचे नाव घेत आहेत, त्या अर्थी तथ्य दिसते. ईडी कारवाईच्या माध्यमातून २०२४ ची लोकसभा निवडणूक काढण्याचा त्यांच्या प्रयत्न असेल तर तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही सत्तार यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT