Sharad Pawar- Prashant Navgire  Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Politics: शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, 'बीआरएस' अन् पुन्हा राष्ट्रवादीत फिरणारे प्रशांत नवगिरे कोण ?

अय्यूब कादरी

News: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाला (बीआरएस) पहिला धक्का बसला आहे. शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, पुन्हा मनसे आणि त्यानंतर के. चंद्रशेखर राव यांच्या 'बीआरएस'मध्ये प्रवेश केलेले प्रशांत नवगिरे हे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गावर आहेत.

प्रशांत नवगिरे यांनी शुक्रवारी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे नवगिरे लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काही महिन्यांपूर्वी 'बीआरएस'ने मोठा गाजावाजा करत महाराष्ट्रात प्रवेश केला. महाराष्ट्रातील अनेक नेते 'बीआरएस'च्या गळाला लागले. यामध्ये नवगिरे यांचाही समावेश होता. 'बीआरएस'कडून त्यांची राज्याच्या मीडिया समन्वयकपदी निवड करण्यात आली होती. मात्र, संघटनेतील महत्त्वाचे पद न मिळाल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.

'बीआरएस'चे सर्वेसर्वा के.चंद्रशेखर राव हे त्यांच्या सर्व मंत्र्यांसह आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला आले होते. या माध्यमातून त्यांनी सोलापूरसह पंढरपूरमध्ये मोठं शक्तिप्रदर्शन केलं. याचवेळी पंढरपूर येथील भगीरथ भालके यांनी 'बीआरएस'मध्ये प्रवेश केला होता.

या दौऱ्यावेळी सोलापूरला जाताना आष्टामोड (ता. उमरगा, जि. धाराशिव) येथे 'केसीआर' यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या भोजनाच्या व्यवस्थेची जबाबदारी नवगिरे यांनी सांभाळली होती.

दरम्यान, तेलंगणा राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच काही दिवसांपूर्वी तेलंगणात राहुल गांधी यांची सभा झाली होती. या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे 'केसीआर' यांचे महाराष्ट्राकडे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जाते.

या कारणातूनच नवगिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा रस्ता धरला असल्याची चर्चा आहे. "बीआरएस'कडून भ्रमनिरास झाला असून, आणखी काहीजण 'बीआरएस'मधून बाहेर पडतील, असा इशारा नवगिरे यांनी दिला आहे.

प्रशांत नवगिरे यांची अनेक वेळा पक्षांतरे ?

प्रशांत नवगिरे हे राज ठाकरे यांचे खंदे समर्थक मानले जात होते. शिवसेनेतून ते राज ठाकरे यांच्यासोबत बाहेर पडले. अनेक वर्षे मनसेत राहिल्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले. तेथून पुन्हा मनसेत आणि मग 'बीआरएस'मध्ये गेले होते. मनसेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष असताना नागरी समस्यांवर, विशेषतः राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात अनेक आंदोलने केली होती.

रस्त्याचे काम अपूर्ण असतानाही टोलवसुली सुरू केल्यामुळे त्यांनी सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी (ता. तुळजापूर) येथील टोल नाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून गेल्यावेळी मनसेच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT