Manoj Jarange Patil-Devendra Fadnavis-Dhananjay Munde-Ajit Pawar Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange On Munde Resign : फडणवीस-अजितदादांचे आभार मानत जरांगे मुंडेंवर बरसले; म्हणाले ‘त्यांची मग्रुरी, मस्ती अजूनही कायम’

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येमुळे सरकारला नामुष्कीला तोंड द्यावे लागले. त्यामुळे मी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे, असे ते म्हणत नाहीत. आताही त्यांची तीच मग्रुरीची भाषा आहे की, माझा हात दुखत आहे आणि त्यामुळे मी राजीनामा देत आहे.

Vijaykumar Dudhale

Beed, 04 March : अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.

संतोष देशमुख यांच्या मारहाणीची फोटो समाज माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर काल आपण त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, आज त्यांनी मुंडेंचा राजीनामा घेतला. त्यांना नैतिकता, संस्कार शब्द शोभतात. पण, धनंजय मुंडेंनी राजीनामा देताना जे कारण दिले आहे, त्यावरून त्यांची मग्रुरी आणि मस्ती दिसून येते, अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी मुंडेंवर शरसंधान साधले आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला किंवा नाही दिला, त्याने काही फरक पडत नाही. पण, त्यांनी राजीनामा देताना जे कारण दिले आहे, त्यातून मुंडे यांची मग्रुरी, मजोरडेपणा आणि मस्ती पुन्हा एकदा दिसली.

संस्कार काय असतात, नैतिकता काय असते, हे राज्याला त्यातून दिसलं नाही. पण, बरं झालं. जे होतंय, ते चांगल्यासाठीच होतंय. राज्यातील लोकांनाही हे कळणं गरजेचे होते. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मुंडे यांची नियत कळणं फार गरजेचे होतं. एवढी मोठी घटना घडूनही त्यांच्या अंगात मग्रुरी कायम आहे.

संतोष देशमुख यांना ज्या क्रूरपणे मारले आहे, त्याबाबत पश्चाताप झाला, असं धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना म्हणता येईना. मराठ्यांनी आणि सरकारने हे लक्षात घ्यावं की धनंजय मुंडे यांच्या अंगात किती मग्रुरी आहे.

असं वागून ते सर्वांच्या नजरेतून उतरणार आहेत. मुंडे यांच्या मग्रुरीमुळे आणि मस्तीखोर वागणुकीमुळे एके दिवशी मुंडेंची लंका पाण्यात बुडाल्याशिवाय राहणार नाही. हे सर्व जण लयाला जाणार आहेत. लोकच त्यांना बुडवणार आहेत, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येमुळे सरकारला नामुष्कीला तोंड द्यावे लागले. त्यामुळे मी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे, असे ते म्हणत नाहीत. आताही त्यांची तीच मग्रुरीची भाषा आहे की, माझा हात दुखत आहे आणि त्यामुळे मी राजीनामा देत आहे. पदाचा आणि उपचाराचा काय संबंध आहे.

धनंजय मुंडे किती मग्रूर आहेत, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यातील सर्व जनतेला कळलं आहे. हे कळणं गरजेचं होतं. यापुढे मराठे सावध राहून त्यांना मोठे करणार नाहीत. त्यांना मराठ्यांचा किती तिरस्कार होता, हेही सर्वांच्या लक्षात आलं.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा चार्जशीट दाखल होण्याच्या अगोदरच मुंडेंचा राजीनामा घ्यायला पाहिजे होते. आतापर्यंत या प्रकरणात दीडशे ते दोनशे सहआरोपी झाले असते. धनंजय मुंडे हे खूनप्रकरणात आरोपी आहेत. राजकीय गुंड मित्र वाचविण्याचे काम धनंजय मुंडे यांनी केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले पाहिजे. काल आपण मागणी करताच त्यांनी आज राजीनामा घेतला, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT