Mp Imtaiz Jalil
Mp Imtaiz Jalil Sarkarnama
मराठवाडा

इम्तियाज जलील यांनीच सांगितलं, 'त्या' मशिदींवर कारवाई करा!

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अल्टीमेटम दिल्यानंतर राज्यात मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा तापला आहे. येत्या तीन तारखेची मुदत ठाकरेंनी दिली असून त्याआधी रविवारी (ता. 1) ते औरंगाबादमध्ये सभा घेत आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सभेकडं लागलं असताना खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी भोंग्यांबाबत पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जलील यांनी मुस्लिम समाज बदल स्वीकारत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, मी भोंग्यांच्या मुद्दावर शांत नाही. पण अजानसाठी भोंग्याचा वापर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) घालून दिलेल्या नियमांचे पालन करायला हवे. पण दुर्देवाने हा मुद्दा राजकीय बनवण्यात आला. काही राजकीय पक्षांच्या दबावाखाली काम न करता पोलीस व प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांची अंमलबजावणी करावी.

एखाद्या मशिदीकडून सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन केले जात नसेल, तर पोलिसांनी त्यावर कारवाई करावी, असं जलील यांनी स्पष्ट केलं. मुस्लिम समाज आता बदल स्वीकारत आहे. पण राजकीय पक्षांनी पोलीस किंवा प्रशासनासारखे वागू नये. पोलिसांनी मशिदींमध्ये जाऊन भोंग्यांच्या आवाजाची पातळी तपासावी. तिथे नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करायला हवी. तसेच मशिदींनी भोंग्यांसाठी परवानगी घेतली आहे की नाही, याचीही पोलिसांनी खात्री करावी, असंही जलील यांनी सांगितलं.

देशातील कायदे आणि नियम आम्हालाही लागू आहेत. त्यामुळे भोंग्यांचा मुद्दा आमच्यासाठी मोठा नाही. कायद्याला त्याचं काम करू द्या. जर काही राजकीय पक्ष याचा मोठा मुद्दा करत असतील तर तो त्यांची समस्या आहे. त्यांच्या स्वार्थासाठी हे लादण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याला रोखायला हवे, असं सांगत जलील यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता टीका केली. तसेच महाराष्ट्रीय राजकीय खेळ सुरू असल्याचे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

मनसे (MNS) आणि राष्ट्रवादीचा (NCP) हात हातात असल्याचे सांगत जलील म्हणाले, शिवसेनेला ताकद कमी करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यांना मोठा पक्ष बनायचे आहे. राष्ट्रवादीकडे गृहमंत्रीपद आहे. ते राज ठाकरेंना सभेसाठी दुसरे ठिकाणावर परवानगी देऊ शकत होते. पण राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक मनसेच्या सोयीचे ठिकाण दिले. तर दुसरीकडे भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांनी देशात जातीचं राजकारण आणलं. त्यांनी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं. आजही तेच सुरू आहे. दोन्ही पक्ष पाच वर्षे सत्तेत होते. मग भाजपने त्यावेळी भोंग्याचा मुद्दा का उपस्थित केला नाही, असा सवाल जलील यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT