Mp Imtiaz Jalil- Abdul Sattar News, Aurangabad
Mp Imtiaz Jalil- Abdul Sattar News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aimim : सत्तार अडचणीत असतांना देसाईंवर घोटाळ्याचे आरोप ? काय टायमिंग आहे..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad Political : नागपूर अधिवेशनाचा दुसरा आठवडा गाजला तो कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर नागपूर खंडपीठाने गायरान जमीन प्रकरणात ओढलेले ताशेरे आणि कृषी महोत्सवाच्या महावसुलीमुळे. टीईटी, सुप्रिया सुळे यांना केलेली शिवीगाळ, जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का? या वादग्रस्त प्रकरणातून सहीसलामत सुटलेल्या सत्तारांना खंडपीठाने ओढलेले ताशेरे आणि कृषी महोत्सवाच्या वसुलीने खिंडीत गाठले.

महाविकास आघाडीतील तीन्ही पक्ष सत्तारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले, सभागृहात आणि बाहेर देखील ते दिसून आले. आज सत्तारांनी नागपूर खंडपीठाने ताशेरे ओढलेल्या गायरान जमीन प्रकरणावर सभागृहात स्पष्टीकरण दिले. त्यानंतर काही तासांतच (Aimim) एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी महाविकास आघाडी काळातील एका मंत्र्यांवर कोट्यावधींच्या घोटाळ्याचे आरोप करत बाॅम्ब फोडला.

माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर एमआयडीसीतील भुखंडांच्या वापराचे निकष बदलून कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप इम्तियाज यांनी पत्रकार परिषद घेवून केला. हे टायमिंग पाहता आपले राजकीय मित्र कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे अडचणीत असल्यामुळे त्यांना मदत व्हावी म्हणून हे प्रकरण बाहेर काढण्यात आले का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

तसं पाहिलं तर सुभाष देसाई जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना इम्तियाज यांचे त्यांच्याशी चांगले संबंध होते. डीपीडीसीतून निधी देतांना देखील देसाई यांनी कायम इम्तियाज यांना झुकते माप दिल्याचे बोलले जाते. असे असतांना ऐन हिवाळी अधिवेशन सुरू असतांना इम्तियाज यांनी हा घोटाळा बाहेर कसा काढला? याबद्दल शंका उपस्थितीत केली जात आहे. अब्दुल सत्तार आणि इम्तियाज जलील यांचे राजकीय संबंध मुधर आहेत. याबद्दल हे दोन्ही नेते जेव्हा जेव्हा एकत्र आले आहेत, तेव्हा तेव्हा भरभरून बोलले आहेत.

इम्तियाज जलील यांना खासदार करण्यात माझा देखील खारीचा वाटा आहे, असे जाहीर विधान सत्तार यांनी अनेकदा केले व अजूनही ते करतात. तर इम्तियाज जलील हे देखील सत्तार साहेब मला कधी आऊट करणार नाही, ते मला कायम पाठिंबाच देणार असे सांगत या राजकीय मैत्रीची कबुलीच देतात. मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखील एमआयएमने जेव्हा नागपूरात मोर्चा काढला, तेव्हा देखील या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे पहायला मिळाले.

एमआयडीसीतील भूखंडाच्या वापराचे निकष बदलून भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी निश्चित व्हायला पाहिजे. शुद्ध हेतून इम्तियाज यांनी हा घोटाळा बाहेर काढला असेल तर त्यांचे देखील अभिनंदन व्हायला पाहिजे. परंतु घोटाळा उघडकीस आणण्यासाठी साधलेले टायमिंग पाहता यात राजकीय वास येतो, एवढे मात्र निश्चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT