Mp Imtiaz Jalil-Cm Eknath Shinde News, Aurangabad
Mp Imtiaz Jalil-Cm Eknath Shinde News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aimim : काळे झेंडे न दाखवता इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून दिले निवेदन..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा ठराव शिंदे-फडणवीस सरकारने घेतला. याला एमआयएम (Aimim) व नामांतर विरोधी कृती समितीने विरोध दर्शवला होता. औरंगाबाद दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा काल खासदार इम्तियाज जलील यांनी दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात गोंधळ होतो की काय ? अशी भिती व्यक्त केली जात होती.

परंतु पोलिस प्रशासन आणि मुख्यमंत्री कार्यालयाने खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांना भेटून आपले म्हणणे मांडण्याचे आवाहन केले, त्याला त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत आज विभागीय आयुक्त कार्यालयातील आढावा बैठकी दरम्यान, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शहराच्या नामांतरासह विविध मुद्यांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. याशिवाय मराठवाडा व जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या विषयांचे निवेदन देखील इम्तियाज जलील यांनी एकनाथ शिंदे यांना दिले.

इम्तियाज जलील यांनी निवेदनात म्हटले आहे की, फक्त महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष व राजकीय व्देषापोटी विशेष म्हणजे औरंगाबादकरांना विकासाच्या मुख्य मुद्दयावरुन भरकटविण्यासाठी शहराचे नामकरण करण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आम्हाला खुप अभिमान व आदर आहे, फक्त राजकारणासाठी त्यांच्या नावाचा वापर करणे हि बाब दुर्भाग्यपूर्ण व निंदनिय आहे. आपणास नम्र विनंती की, सर्वसामान्य नागरीकांचे भावना लक्षात घेता जनमत आधारे मतदान घेवुन नामांतराचा निर्णय घेण्यात यावा.

मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधार ठरलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) खाजगीकरण करण्याचे जनविरोधातील निर्णय घेण्याचे काम शासनस्तरावर सुरु असल्याचे समजते. सबब निर्णय हा गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याची चेष्टा करणारा असुन त्यास आमचा प्रखरतेने विरोध आहे. सर्वसामान्य जनतेच्या विरोधातील निर्णय घेणे आपल्या सरकारला अशोभणीय आहे. घाटी खाजगीकरण प्रस्ताव व निर्णयास त्वरीत स्थगती देण्यात यावी.

एकाच आठवड्यात गंगापूर तालुक्यातील अंबळनेर येथील दहा वर्षीय मुलगा आणि वैजापूर तालुक्यातील घोडेगाव येथील महाविद्यालयीन तरुणाला चिखलमय व खराब रस्त्यामुळे रुग्णालयात पोहोचण्यास उशिर झाल्याने आपला जीव गमवावा लागला. आता अजुन किती जणांना चिखलमय व खराब रस्त्यांमुळे आपला जीव गमवावा लागेल ? आपणास नम्र विनंती की, औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी त्वरीत विशेष पॅकेजची घोषणा करुन प्रथम प्राधान्याने रस्त्यांचे कामे सुरु करण्याचे आदेश निर्गमित करावेत अशी मागणी देखील इम्तियाज जलील यांनी निवेदनात केली आहे.

औरंगाबाद शहरामध्ये आमखास मैदानावर एक सुसज्ज भव्य स्टेडियम तयार करण्यासाठी केंद्र सरकारच्या क्रिडा विभागाकडून निधी उपलब्ध असुन सुध्दा आज तगायत स्टेडिमयम निर्माण करण्याचे काम प्रलंबितच आहे. सैन्यदल, पोलीस विभाग व इतर क्षेत्रात उत्कृष्ट कामगीरी बजावणारे सर्व जवान, अधिकारी व खेळाडू हे याच मैदानावर सराव केलेले आहेत. आमखास मैदानाच्या जागेचे विविध तीन शासकीय विभाग / संस्थांनी अधिकार अभिलेख पत्रक (पीआर कार्ड) मध्ये त्यांच्या नावाची नोंद केलेली आहे.

गरीब होतकरु व गुणवंत खेळाडूचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन आमखास मैदानावर सुसज्ज स्टेडियम तयार करण्यासाठी त्वरीत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत. तसेच औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे आतोनात आर्थिक नुकसान झालेले आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी नियोजन शुन्य प्रशासकीय कारभार, तरतुदी व सुविधेंमुळे अधिकच अडचणीत सापडले आहेत. शेतकरी बांधवांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची त्वरीत स्थळपाहणी व पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT