Keshavrao Dhondge-Ajit Pawar News Mumbai
Keshavrao Dhondge-Ajit Pawar News Mumbai Sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar : गल्ली ते दिल्लीपर्यंत दरारा असणारे केशवराव खरे मन्याडचे वाघ..

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विधानसभेचे माजी सदस्य, माजी खासदार आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भाई केशवराव धोंडगे यांची राजकीय, सामाजिक कारकीर्द आणि त्यांचा गल्ली ते दिल्लीपर्यंत दरारा पाहता, त्यांना मन्यारचा वाघ का म्हणायचे हे पटते. (Nanded) आज त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव सभागृहात ठेवण्यात आला त्याला पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे. त्यांचे काम जवळून पाहण्याचे भाग्य मला लाभले, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केशवराव धोंडगे यांच्याबद्दलच्या आठवणी सभागृहात सांगितल्या.

अजित पवार म्हणाले, भल्याभल्यांची भंबेरी उडवणारी त्यांनी भाषणं असायची. सभागृहात केशवराव बोलायला उभे राहिले की, ते ऐकायला सभागृह, गॅलरी भरून जायची. अगदी शिपाई देखील त्यांचे भाषण ऐकायचे. (Marathwada) दुसऱ्या दिवशी त्यांच्या भाषणाचीच वृत्तपत्रांमध्ये हेडलाईन व्हायची. नवीन सदस्यांनी त्यांची भाषणं आवर्जून वाचावीत अशी आहेत . १९५७ ते ९५ दरम्यान, दहा निवडणुका ते लढले, ११ मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याचा त्यांना अनुभव आहे.

शेतकरी कामगार पक्षाकडून खटारा चिन्हावर ते पहिल्यांदा निवडून आले. १९६२ चा अपवाद वगळता ६७ ते ९५ पर्यंत ते कंधारचे प्रतिनिधित्व करत होते. संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करत त्यांनी नेहमीच सभागृहात आपली छाप पाडली. आणीबाणीच्या काळात आचार्य विनोबा भावे यांनी केलेले एक भाषण केशवरांना आवडले नाही. यावर त्यांनी टोकदार भाषेत नापसंती व्यक्त करणारे पत्र विनोबा भावे यांना लिहले होते याची आठवण देखील या निमित्ताने होते.

इंग्लडच्या राणीला त्यांनी नथ आणि साडी भेट दिली होती, तेव्हा त्यांनी मिश्किल टिप्पणी देखील केली होती, पण तेव्हा ते काय बोलले हे सांगणार नाही. औरंगाबाद येथे आकाशवाणीचे केंद्र, खंडपीठ आणि परभणी कृषी विद्यापीठासाठी त्यांनी पुढाकार घेतला. शंकरराव चव्हाण व धोंडगे यांचे शेवटपर्यंत मतभेद होते. पण अशोक चव्हाणांच्या पराभवानंतर धोंडगे यांना खूप दुःख झाले होते. असे व्हायला नको होते, अशा भावना व्यक्त करत त्यांनी दिलदारपणा दाखवला होता याची आठवण देखील या निमित्ताने अजित पवारांनी सभागृहात सांगितली.

धोंडगे माय पौर्णिमा साजरी करतात, आईला गुरू माणनारे त्यांचे विचार होते. त्यांच्यातील रुबाब, आवेश, कणखरपणा आजही कायम आहे. सत्य, न्यायासाठी काही करण्याची त्यांची तयारी आहे. मी शरीराने थकलो असलो तरी मनाने थकलेलो नाही अस ते नेहमी सांगतात. मन्यारचा वाघ त्यांना का म्हणतात? हे गल्ली ते दिल्लीतील त्यांचा दरारा पाहता लक्षात येते. सहावेळा आमदार एकदा खासदार अशी त्यांची कारकीर्द होती.

आग ओकणारी, म्हणींचा वापर करत सरकारला सळोकी पळो करून सोडणारी त्यांची भाषणं आजही डोळ्यासमोर येतात. त्यांनी ४० पुस्तक लिहली, दुष्काळ, रोजगार हमी योजना, भालकी सत्याग्रह, गुराखी संमेलन ही त्यांची कामे कायम लक्षात राहणारी आहेत. साम्यवाद, मार्कस्वादाची आजही गरज असल्याचे ते सांगतात. त्यांना माझ्या व राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने जन्मशताब्दी निमित्त मी शुभेच्छा देतो आणि दिर्घायुरारोग्य लाभो अशी प्रार्थना करतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT