Mahayuti News Sarkarnama
मराठवाडा

Beed Politics : अजितदादांची राष्ट्रवादी 4 जागांवरच ठाम; उरलेल्या 2 जागांवर भाजप-शिंदेसेनेची वाटणी कशी?

दत्त देशमुख

Beed News, 31 August : 'ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला आगामी विधानसभेची जागा', या फॉर्म्युल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने रणनीतीची सुरुवात केली आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितित धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) पुन्हा राष्ट्रवादीचे चार आमदार आणि महायुतीचे सहा आमदार विजयी होतील, असं सांगत पक्ष चार जागांवर ठाम असल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

यामुळे आता उर्वरित दोन जागांमध्ये भाजप (BJP), शिवसेनेची वाटणी कशी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पूर्वीच्या भाजप-शिवसेनेच्या युतीमध्ये आष्टी, गेवराई, माजलगाव, केज व परळी या पाच विधानसभा भाजपला तर बीडची विधानसभेची जागा शिवसेनेकडे होती. तर, आघाडीमध्ये पूर्वी परळी काँग्रेसला आणि बीडसह आष्टी, गेवराई, माजलगाव, केज हे मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असत.

मात्र, मागच्या निवडणुकीत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासाठी राष्ट्रवादीने परळीची जागा काँग्रेसकडून स्वत:कडे घेतली. सहाही जागांवर राष्ट्रवादी लढली. 2019 च्या निवडणुकीत परळीतून धनंजय मुंडे, माजलगावमधून प्रकाश सोळंके, बीडमधून संदीप क्षीरसागर व आष्टीतून बाळासाहेब आजबे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार जिल्ह्यात विजयी झाले.

तर, भाजपकडून केजमधून नमिता मुंदडा व गेवराईतून लक्ष्मण पवार विजयी झाले. आधी शिवसेनेत फुट व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत आल्याने जिल्ह्यातील राजकीय समिकरणे झपाट्याने बदलली आहेत. जिल्ह्यात एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप हे दोन पक्षच एकमेकांचे राजकीय विरोधक होते.

त्यामुळे आता इच्छुक आणि स्पर्धकांची संख्याही वाढली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बाजूने कायम राहीले. तर, राष्ट्रवादीकडे तीन आमदार आहेत. मात्र, 2019 ला ज्या पक्षाने जागा जिंकली त्या पक्षाला या विधानसभा निवडणुकीतही त्याच पक्षाला जागा असा फॉर्म्युला मांडत अगोदर राष्ट्रवादीने महायुतीतील शिवसेनेच्या वाट्याच्या जागेवर दावेदारी सुरु केली आहे.

जनसन्मान यात्रेच्या सभेत पुन्हा धनंजय मुंडे यांनी हाच फॉर्म्युला मांडत चार जागांवर दावा ठोकला. त्यामुळे उर्वरित दोन जागांत भाजप (BJP) आणि शिवसेनेला वाटण्या करायच्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एखाद्या जिल्ह्यात एकही जागा लढविणार नाहीत असे होईल का हा पहिला प्रश्न आहे. शिंदेंनी हे मान्य केले तर सध्या राज्यात सर्वाधिक आमदार असलेला भाजप दोन जागांवर समाधान मानणार का? असा प्रश्‍न आहे. या सर्व प्रश्‍नांचे कोडे आगामी काळात महायुती राहणार का, राहीली तरी जागा वाटप कसे होणार? यानंतरच सुटणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT