Ramdas Athwale Sarkarnama
मराठवाडा

Ramdas Athawale News : वाद करण्यात अन् मिटवण्यात आम्ही पटाईत; शिवसेना-भाजप वादावर आठवलेंची मिश्किल टिपण्णी

सरकारनामा ब्यूरो

Athawale on Shivsena-BJP Dispute : दोन दिवसांपूर्वी 'राष्ट्रात मोदी अन् महाराष्ट्रात शिंदे' या अशयाची जाहिरात राज्यातील सर्व आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये झळकली होती. त्यावरून राज्यातील भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जाहिरातीत देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आले. या दोन जाहिरातींमुळे राज्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले होते. महाविकास आघाडीसह भाजपच्या काही नेत्यांनीही शिवसेनेवर टीका केली. (Latest Marathi News)

पहिल्या जाहिरातीनंतर भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. 'कुठे ५० अन कुठे १०५ आमदार' असे पोस्टर ठिकठिकाणी लागले होते. देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थही कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी केली. 'बेडूक कितीही फुगला तरी बैल होत नाही', असे वक्तव्यही भाजप (BJP) नेत्यांनी केली. त्यामुळे युतीत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीने स्थान देत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.

दरम्यान, कोल्हापूर येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला फडणवीस यांनी जाणे टाळले. त्यानंतर पालघर येथील कार्यक्रमात शिंदे-फडणवीस यांनी उपस्थिती लावली. तेथे आमच्यात जाहिरातीवरून वितुष्ट येणार नाही, आमची मैत्री २० वर्षांपासून आहे. ती कधीही तुटणार नाही, असे दोघांनीही सांगून वादावर पडदा टाकला. दरम्यान, युतीतील रिपाइंचे रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी जाहिरात वादावर मिश्किल टिपण्णी केली आहे. ते लातूर येथे बोलत होते.

आठवले म्हणाले, "जाहिरातीनंतर १०५ आमदारांचा मुद्दा उपस्थित करून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सहानुभूती मिळाली. त्यामुळे महाविकास आघाडीने आम्हाला जास्त डिवचण्याचे कारण नाही. युतीतील भाजप-शिवसेना-आरपीआय हे पक्ष खंबीर आहोत. वाद करण्यात आम्ही अॅक्टिव्ह आहोत. तसेच वाद मिटवण्यातही अॅक्टिव्ह आहोत. आम्ही एका दिवसातच वाद मिटवला. पहिल्या जाहिरातीनंतर दुसरी जाहिरात दिली. दुसऱ्या जाहिरातीनंतर वाद संपला. वाद जास्त वेळ ठेवायचा अशी आमची भूमिका आहे."

यावेळी रामदास आठवले यांनी काँग्रेसलाही (Congress) चिमटा घेतला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राज्यात राज्यात कर्नाटक पॅटर्न राबवण्याचा वारंवार उच्चार करताना दिसत आहे. यामुळेच आठवले यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, "कर्नाटक राज्यात काँग्रेला बहुमत मिळाले. सध्या तेथे काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेसने जास्त हुरळून जाऊ नये."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT