Amarsinh Pandit - Sharad Pawar
Amarsinh Pandit - Sharad Pawar Sarkarnama
मराठवाडा

Amarsinh Pandit On Pawar : अमरसिंह पंडितांचे पवारांच्या 'त्या' टीकेला प्रत्युत्तर; म्हणाले, '' नाही लावणार तुमचा फोटो, पण...''

Dattatrya Deshmukh

Beed : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडच्या स्वाभिमान सभेत त्यांना राजकारणातून निवृत्त होण्याचा सल्ला देणार्यांचा खरपूस समाचार घेतला होता. तसेच त्यांनी उलटा सवाल करत "तुम्ही माझं वय झालं म्हणता तर तुम्ही माझं काय बघितलंय असा हल्लाबोलही केला होता. तसेच आपला फोटो वापराल तर कायदेशीर कारवाईचे संकेतही अजित पवार गटाला दिले होते. यावर आता अजित पवार गटाचे नेते अमरसिंह पंडित यांनी पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांची बीडमध्ये रविवारी सभा पार पडली. या सभेत बोलताना अमरसिंह पंडित यांनी पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, तुम्ही फोटो काढा म्हणता पण पंडितांच्या देवघरात तुमचा फोटो आहे, तो कसा काढणार. आमच्यावर तुमचे संस्कार आहेत ते कसे काढणार. मागच्या १८ वर्षात पहिल्यांदाच जिल्ह्यातील तुमच्या सभेला अनुपस्थित राहिल्याचे शल्य होते. तुमची जिल्ह्याशी नाळ जोडलेली आहे. दुष्काळी जिल्ह्याबद्दल काहीतरी बोलताल असे वाटले होते. पण, कोणीतरी कानात बोलले आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहानंतर तुम्ही थेट अमरसिंह पंडित यांचे नाव घेतले असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी बीड येथे झालेल्या १७ ऑगस्टच्या स्वाभिमानी सभेत ‘कोणाजवळ तरी आपले वय वाढल्याने भवितव्यासाठी दुसरीकडे जात असल्याचे अमरसिंह पंडित(Amarsinh Pandit) सांगितले. असे म्हणून त्यांनी आपले ‘वय बघितले पण माझे काय बघितले’ अशी टीका केली होती. या टीकेला अमरसिंह पंडित यांनी नाव न घेता रविवारी अजित पवार यांच्या सभेत उत्तर दिले.

पंडित पुढे म्हणाले, साहेब आम्ही तुमच्यावर मनापासून प्रेम केलं. पण मी तुम्हाला विश्वास देता यानंतर निवडणुकांमध्ये नाही लावणार फोटो पण तुमचे संस्कार आमच्या मनातून काढाल का? तुमच्याच संस्काराने आम्ही पुढची लढाई लढू,असं अमरसिंह पंडित म्हणाले.

तुम्ही आमचे विठ्ठल, तुमची प्रतिमा जन्मदात्यापेक्षाही मोठी आहे. मी तुम्हाला जे काही बोललो ते गेवराईच्या सभेत काळजीने समोर बोललो होतो. मागे बोलण्याचे आमचे संस्कार नाहीत. अधिक अमरसिंह पंडित म्हणाले, २५ वेळा सांगितले, आमच्या निष्ठा पवारांच्या चौकटीवर आहेत. दोन चौकटी करु नका. मात्र, राज्यात नवे समीकरण घडले. मात्र, गेवराईचा घळाटा आणि धोंडराईच्या १२ वाटा असे वडील पूर्वी म्हणायचे.

अजित पवारांनी मागच्या काळात गोदावरी खोऱ्यात बंधारे बांधले. त्यामुहे पाच हजार क्विंटल कापूस पिकणाऱ्या गेवराई तालुक्यात १७ लाख मेट्रीक टन ऊस पिकला. सिरसमार्गच्या एका बंधाऱ्यामुळे एका गावात १७ कोटी रुपयांची मोसंबी पिकली. नाशिक खोऱ्यातील पाणी देण्याची मागणी करत सिंदफना नदीवरील बंधारे बांधावे असे स्वप्न आम्ही पाहत असल्याचे अमरसिंह पंडित म्हणाले. आम्ही कुठपर्यंत ऊसतोडणी कामगारांचे लेकरं म्हणून वावरायचे असेही ते म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT