Ambadas Danve On Budget
Ambadas Danve On Budget  Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve On Budget : मराठवाडा, विदर्भाला 'हे' सरकार महाराष्ट्राचा भाग मानत नाही...

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : राज्यातील महायुती सरकारचा या काळातील शेवटचा अर्थसंकल्प काल राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. विरोध या अर्थसंकल्पावर तुटून पडले आहे, तर सत्ताधाऱ्यांनी ही सर्वसामान्य, शेतकरी, महिला, तरुण, विद्यार्थी अशा सर्व वर्गांना दिलासा देणारा, राज्याला विकासाच्या दिशेने वेगाने नेणारा अर्थसंकल्प असल्याचा दावा केला आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र हा अर्थसंकल्प नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची पुनरावृत्ती विधानसभेला होऊ नये यासाठी केलेल्या घोषणांचा पाऊस असल्याची टीका केली आहे. मराठवाडा, आणि विदर्भाला महाराष्ट्राचा भाग हे सरकार मानत नाही, हे ही या अर्थसंकल्पातून स्पष्ट होते, असा आरोपही दानवे यांनी केला.

घोषणांच्या पावसात महाराष्ट्र भिजला, अन् योजनांचा महापूर नदीत वाहून गेला, अशा शब्दात दानवे यांनी अर्थसंकल्पावर भाष्य केले. महाराष्ट्रासाठी (Maharashtra) केलेल्या घोषणांचा पाऊस झाला खरा, पण यातील किती योजना अंमलात येतील यावर शंका आहे. या अर्थसंकल्पात शुद्ध 'पोलिटिकल हिप्नॉटिझम' चा प्रकार जास्ती आहे.

आजचे अर्थसंकल्पीय भाषण ऐकून मला पक्का विश्वास बसला आहे की हे सरकार मराठवाड्याला, विदर्भाला महाराष्ट्राचा भाग मानत नाही. पर्यटन, पायभूत सुविधा, वैद्यकीय सेवा आदी गोष्टींतून मराठवाडा,विदर्भ या सरकारने बाद ठरवला आहे. 'सुसूत्रता' आणायच्या नावाखाली स्थापन केलेल्या समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवून जबर कर लादण्याचा सरकारचा छुपा मनसुबा आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेने ओळखून घ्यावे.

अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) विधानसभेत तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात राज्य शासनाने अनेक मोठमोठ्या घोषणा केलेल्या आहेत. शेती व शेतकऱ्यांसाठी भरीव अशी कोणतेही तरतूद यामध्ये केलेली नाही.

तसेच मराठवाड्याच्या विकासासाठी कसहीली तरतूद न केल्याने मराठवाडा विरोधी हे सरकार असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे. राज्यावर कर्ज वाढवायला लावणारा हा अर्थसंकल्प असून शाश्वत असे कोणतेही काम यातून घडणार नाही. लोकसभेत झालेल्या पराभवाची पुनरावृत्ती विधानसभेमध्ये होऊ नये यासाठी केलेला हा सर्व खटाटोप आहे, असे म्हणत दानवे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT