Mla Ambadas Danve-Mp Imtiaz Jalil, News.
Mla Ambadas Danve-Mp Imtiaz Jalil, News. Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : औरंगजेबाची कबर असलेल्या खुल्ताबादचे नावही बदलू, हिंदूंचा अंत पाहू नका..

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करण्यासाठी एमआएमच्या इम्तियाज जलील यांनी आंदोलन सुरू केले. त्या आंदोलनात औरंगजेबाचा फोटो झळकावत त्यांनी त्यांचे खरे दात दाखवून दिले आहे. औरंगजेब तुमचा कोण होता ? हे त्यांनी सांगावे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आता झाले आहे, पण यापुढे औरंगजेबाची कबर असलेल्या खुल्ताबादचे नाव देखील आम्हाला बदलावे लागेल, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी एमआयएमला इशारा दिला.

रझाकारी प्रवृत्तीच्या एमआयएमला (Aimim) वेळोवेळी आम्ही धडा शिकवलेला आहे, यापुढेही गरज पडली तर तो शिकवू, असेही दानवे यांनी म्हटले आहे. (Shivsena) गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद, उस्मानाबाद या दोन जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा गाजतोय. विशेषतः औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर केल्यानंतर एमआयएमने या नावाला तीव्र विरोध सुरू केला.

खासदार इम्तियाज जलील यांनी या नामांतर विरोधी कृती समितीच्या नावाखाली बेमुदत साखळी उपोषण कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले. या वेळी एका तरुणाने औरंगजेबाचे पोस्टर झळकवले आणि घोषणाबाजी केली. त्यामुळे या आंदोलनाला वेगळे वळणं लागले. इम्तियाज जलील यांनी आमचे आंदोलन बदनाम करण्यासाठी कुणीतरी औरंगजेबाचे पोस्टर घेवून तरुणांना आंदोलनात घुसवल्या आरोप केला.

परंतु या सगळ्या प्रकरणावर आता ठाकरे गटाचे आमदार तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी एक विधान करत खळबळ उडवून दिली आहे. औरंगजेबाचे पोस्टर आंदोलनात झळकावल्याने संतप्त झालेल्या दानवे यांनी औरंगजेबाची कबर असलेल्या खुल्ताबादचे नाव बदलण्याचा इशारा या निमित्ताने दिला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलतांना अंबादास दानवे म्हणाले, दिल्लीहून आलेल्या औरंगजेब सारख्या क्रूर राजाने हिंदूवर अत्याचार केले, देवळं पाडली त्या औरंगजेबाचे नाव या शहराला नको अशी भूमिका सर्वप्रथम हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ९ मे १९८८ ला घेतली आणि या शहराचे नाव संभाजीनगर केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारने या संदर्भातला निर्णय घेतला आणि आता राज्य आणि केंद्र सरकारने त्यावर शिक्कामोर्तब केले.

त्यानंतर या नावाला एमआयएमने विरोध सुरू केला आहे. मुळात औरंगजेब एमआयएमचा कोण लागतो? हा माझा सवाल आहे. आंदोलनात औरंगजेबाचा फोटो झळकावून या पक्षाने आपले खरे दात आणि जातीयवादी रुप दाखवून दिले आहे. या शहरात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही कायम प्रयत्न केले आहेत. परंतु एमआयएमच्या कालच्या कृतीने जातीय द्वेष भडकावण्याचे काम केले आहे.

शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर तर आम्ही केलेच, पण एमआयएमने असेच राजकारण सुरू ठेवले तर औरंगजेबाची कबर असलेल्या खुल्ताबादचे नाव देखील आम्हाला भविष्यात बदलावे लागेल. कारण औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवण्यासाठी कुणीही पर्यटक येत नाही. त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पर्यटक हे वेरुळच्या घृष्णेश्वराचे दर्शन घेण्यासाठी येत असतात, असेही दानवे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT