Raosaheb Danve-Rajesh Tope News Sarkarnama
मराठवाडा

Jalna- Jalgoan Railway News : दानवे एक-दोन नंबरच्या विश्वासातले; टोपेंकडून कौतुक...

Prasad Shivaji Joshi

Raosaheb Danve News : शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार तथा माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे तोंडभरून कौतुक केले. (Jalna Railway News) ते एक व दोन नंबरच्या म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या विश्वासातले असल्याचे कौतुकोद्गार काढले. त्यामुळे मराठवाडा व राज्यातील रेल्वे प्रश्न तेच मार्गी लावू शकतात, असा विश्वासही टोपेंनी व्यक्त केला. टोपेंचे हे अचाकन उफाळून आलेले दानवे प्रेम पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

तर जालना ते जळगाव या रेल्वेमार्गासाठी रेल्वे बोर्ड, नीती आयोग आणि अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. (Jalna) तसेच राज्य सरकारनेही या मार्गासाठी पन्नास टक्के निधी खर्च करण्याचे मान्य केले आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी राज्य सरकारकडून फक्त एका पत्राची आवश्यकता आहे. ते पत्र लवकर मिळाले की तातडीने कामाला सुरुवात होईल, असे म्हणत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी राज्य सरकारवर खापर फोडले.

रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण झाल्यानंतर रविवार, दि. १५ रोजी जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही जनशताब्दी एक्स्प्रेस विद्युत इंजिनवर धावली. या रेल्वेस हिरवी झेंडी दाखवल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी जालना-जळगाव रेल्वेमार्ग रखडण्याला राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका केली. या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राजेश टोपे, (Rajesh Tope) आमदार नारायण कुचे उपस्थित होते.

मंत्री झाल्यानंतर मराठवाड्यातील रेल्वेसंदर्भातील मागण्या पूर्ण करण्यासाठी मी सर्वताेपरी प्रयत्न केले. मनमाड ते संभाजीनगर या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी निधी मंजूर होऊन डिसेंबरमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन मे २०२४ च्यापूर्वी हे काम पूर्ण होईल. दुहेरीकरणाचे काम परभणीपर्यंत पूर्ण करण्यासाठी १००० कोटींपेक्षा जास्त निधी आवश्यक आहे. मंत्र्यांच्या अधिकारात १००० कोटींपर्यंत कामे मंजूर करता येतात.

त्यापुढील रकमेच्या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी नीती आयोगाकडे जाते व ही वेळखाऊ प्रक्रिया असल्याने पहिल्या टप्प्यात मनमाड ते संभाजीनगरपर्यंत काम प्राध्यान्याने करण्यात आले. संभाजीनगरच्या पुढील दुहेरीकरणासाठी सर्वेक्षणाकरिता निधी उपलब्ध करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राजेश टोपे यांनी दानवे यांच्या कार्यकाळात मोठा बदल झाल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले.

जालना येथील रेल्वे स्टेशनचा विकास, पीट लाइनचे काम यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. संभाजीनगरच्या पुढील रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण अतिशय आवश्यक आहे. खासदार दानवे हे नंबर १ आणि २ च्या विश्वासातले आहेत, त्यामुळे मराठवाड्यातील रेल्वेसंदर्भातील प्रश्न ते नक्कीच मार्गी लावू शकतात, असेही टोपे म्हणाले. दरम्यान, मराठवाड्यातील रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण झाल्यामुळे जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ही जनशताब्दी एक्स्प्रेस पहिल्यांदाच विद्युत इंजिनवर धावली.

या रेल्वेस हिरवी झेंडी दाखवण्याच्या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राजेश टोपे हे आवर्जून उपस्थित होते. तसेच भाजपचे आमदार नारायण कुचेही उपस्थित होते. मात्र, भाजपचे परतूरचे आमदार बबन लोणीकर व त्यांचे पुत्र भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर या दोघांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे टाळले. त्यामुळे दानवे आणि लोणीकर यांच्यातील बेबनाव पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT