Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

BJP Leader Ashok Chavan : लोकसभेतील पराभवाने आधीच झोप उडाली, आता विधानसभेला पुनरावृत्तीची धास्ती..

Jagdish Pansare

Nanded BJP Politics News : लोकसभा निवडणुकीत राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात महायुतीचा झालेला पराभव भाजप नेत्यांना झोपू देत नाहीये. लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात अशोक चव्हाण पक्षात येऊनही झालेल्या पराभवाने खुद्द चव्हाण यांनाच धक्का बसला. आगामी विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती होते की काय? याची भिती चव्हाण यांना सतावत आहे.

नांदेड जिल्ह्यातील सगळ्या विधानसभा मतदारसंघांपेक्षा अशोक चव्हाण यांना चिंता आहे ती स्वतःच्या भोकर मतदारसंघाची. मुलगी श्रीजया हीची राजकारणातील एन्ट्री कोणत्याही परिस्थितीत फसता कामा नये, यासाठी अशोक चव्हाण (Ashok Chavan) झपाटून कामाला लागले आहे. लोकसभेला झाली तशी घोडचूक विधानसभेला करू नका, असे आवाहन ते पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यातून करताना दिसत आहेत.

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकारण झपाट्याने बदलेले, काँग्रेसमुक्त जिल्हा होईल, असे दावे केले जात होते. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीने हे दावे फोल ठरवले. अशोक चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर, खासदार गोपछेडे आणि महायुतीतील घटक पक्षांची ताकद सोबत असताना चिखलीकर यांचा झालेला पराभव भाजपपेक्षाही अशोक चव्हाण यांच्यासाठी धक्कादायक ठरला होता.

महाविकास आघाडीचे वंसतराव चव्हाण यांना नांदेडच्या (Nanded) जनतेने निवडून देत महायुतीला `जोर का झटका` दिला. या धक्क्यातून अजूनही भाजप नेते सावरलेले दिसत नाहीत. भोकरसह नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात अशोक चव्हाण यांनी बैठका, मेळावे घेत तयारी सुरू केली आहे. भोकरची जागा निवडून आणणे चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेचे ठरणार आहे. त्यामुळे त्यांचे सर्वाधिक लक्ष सध्या या मतदारसंघावर आहे.

मुलगी श्रीजया स्वतंत्रपणे जनसंपर्क वाढवण्यावर भर देत आहे, तर निवडणूक यंत्रणा कशी राबवायची याची रणनिती लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अशोक चव्हाण यांनी स्वतः हातात घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला होऊ द्यायची नाही, यासाठी अशोक चव्हाण जिल्ह्यात फिरत आहेत.

पक्षातील अंतर्गत वाद बाजूला सारा, लोकसभा निवडणूकीत जी घोडचूक केली, ती विधानसभेला होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन ते पदाधिकारी, कार्यकर्त्यांना करत आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाला कारणीभूत ठरला. हे लक्षात ठेवत आपण मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत, मी स्वत: मनोज जरांगे पाटील यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे.राज्य सरकारने इतर कोणाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिले आहे.

पण काहीजणांना अचानक लाॅटरी लागल्याने ते हवेत असल्याचा टोला अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे खासदार वंसतराव चव्हाण यांना नाव न घेता लगावला. भोकरच्या जनतेमुळे मला राजकीय वैभव मिळाले, माझी इथल्या जनतेशी घट्ट नाळ जुळलेली आहे, तेच ऋणानुबंध कायम असू द्या, अशी साद अशोक चव्हाण यांनी घातली. एकूणच लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या महायुती विशेषतः भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न अशोक चव्हाण करताना दिसत आहे. यातून मुलगी श्रीजया हिला भोकरमधून आमदार करण्यासोबतच जिल्ह्यात आपले अस्तित्व दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT