Union Cabinet Expansion: भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांना भाजपात प्रवेश करून अडीच वर्ष उलटून गेली आहेत. काँग्रेसची साथ सोडून भाजपात दाखल झाल्यानंतर पक्षाने त्यांना तातडीने राज्यसभेवर घेत त्यांचे पुनर्वसन केले. मात्र तरीही अशोक चव्हाण यांच्या सारख्या अनुभवी आणि माजी मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचे अद्यापही पूर्णपणे पुनर्वसन झाले नसल्याची खंत त्यांच्या समर्थकांमध्ये आहे.
सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वारे जोरात वाहू लागले आहे. याच अनुषंगाने नांदेडमध्ये माध्यमांनी अशोक चव्हाण यांना नांदेडला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार का? असा सवाल केला. यावर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? हे कोणालाच सांगता येणार नाही. पण नांदेडला यात संधी मिळाली तर निश्चितच आनंद होईल, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. या निमित्ताने अशोक चव्हाण मनातलं बोलले अशा प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटत आहे.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. अशोक चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. परंतु जिल्ह्यातील आमदार, माजी खासदार तसेच विद्यमान खासदारांच्या जवळच्या नातेवाईक, वारसांना बँकेवर बिनविरोध संचालक करण्यात आले.
तर सर्वसामान्य इच्छुकांना मात्र निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. २३ पैकी ११ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये खासदार अशोक चव्हाण समर्थक, माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांच्या सुनबाई मीनल पाटील खतगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे स्वत: आणि त्यांची कन्या प्रणिता देवरे, भाजपाचे आमदार तुषार राठोड, भीमराव केराम तसेच नायगावचे आमदार राजेश पवार यांच्या पत्नी पुनम पवार या नांदेड जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर बिनविरोध निवडून आले आहेत.
नेत्यांनी आपल्या सग्या सोयर्यांना निवडून आणण्यासाठी बिनविरोधच घाट घातला. मात्र सामान्य उमेदवारांना वाऱ्यावर सोडल्याची भावना इच्छुकांमध्ये निर्माण झाली. यातून बारा ठिकाणी अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी मात्र बिनविरोध निवडून आलेले संचालक हे त्या त्या तालुक्यातील माघार घेतलेल्या उमेदवारांच्या संमतीने आणि इच्छेने निवडून आलेले आहेत.
यात कुठेही सोयरे किंवा नात्यांचा प्रश्न येतो कुठे? जनमताच्या निर्णयानुसारच बिनविरोध संचालकांच्या विरोधातील उमेदवारांनी माघार घेतली आहे त्यामुळे होणारी टीका योग्य नाही, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. याशिवाय राज्य व देश पातळीवरील घटना घडामोडी संदर्भात अशोक चव्हाण यांना बोलते केले असता त्यांनी यावरही आपली भूमिका स्पष्ट केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा जेष्ठ खासदार शरद पवार हे एनडीएचा भाग होण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न केला असता अशोक चव्हाण यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानाचा संदर्भ देत शरद पवार एनडीएमध्ये आले तर त्यांचे स्वागतच होईल असे म्हटले आहे. दिल्लीत शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात व सध्याच्या शिक्षण पद्धतीत बदलाची मागणी करत सोनम वांगचुक हे जंतर-मंतरवर उपोषणाला बसले आहेत. यावरही अशोक चव्हाण यांनी भाष्य करताना त्यांची भूमिका योग्य असली तरी त्यांनी उपोषण न करता चर्चेची तयारी दाखवावी. कुठल्याही प्रश्नाचा तोडगा हा चर्चेतूनच निघू शकतो, अर्थात लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.