Minister Abdul Sattar-Eknath Shinde
Minister Abdul Sattar-Eknath Shinde Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : अब्दुल सत्तार म्हणतात, एकनाथ शिंदेमुळे शिवसेनेत, त्यांच्यासोबतच राहणार..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मी शिवसेनेत आलो होतो, त्यामुळे यापुढे देखील त्यांच्यासोबतच राहणार. ते जो निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन, अशा शब्दात राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शिंदे यांच्या भूमिकेचे समर्थन केले. मी हिंदुत्ववादी पक्षात प्रवेश करून निवडून आलेलो आहे, त्यामुळे माझ्या हिंदुत्ववादी भूमिकेबद्दल कुणी शंका घेऊ नये, असा टोला देखील सत्तार यांनी संजय राऊत व इतरांना लगावला.

राज्यातील सत्ता संघर्ष आणि त्याला कारणीभूत ठरलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेले ५० पेक्षा जास्त बंडखोर मंत्री, आमदार आता माध्यमांसमोर येऊ लागले आहेत. (Shivsena) राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील बंडानंतर पहिल्यांदा आपली भूमिका एका वृत्तवाहिनीशी बोलतांना स्पष्ट केली. शिवसेनेत आपली भिकाऱ्या सारखी अवस्था झाली होती. मुख्यमंत्री भेटत नव्हते, म्हणणे ऐकून घेत नव्हते असा आरोप देखील सत्तार यांनी केला.

महाराष्ट्रात कधी परतणार असे विचारले तेव्हा एकनाथ शिंदे सांगतिल तेव्हा, असेही ते म्हणाले. राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या पक्षात बंड होते, तेव्हा त्यामागे काहीतरी कारण असेल हे लक्षात घेतले पाहिजे. देशात आतापर्यंत कधीच घडले नाही ते महाराष्ट्रात शिवसेनेत घडले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही ५० आमदार आहोत, प्रत्येकाची स्वतःची आपली कहाणी, अनुभव आहे. ते जाहीरपणे सांगता येत नाहीत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही आमची गाऱ्हाणी घेऊन जायचो पण त्यांनी ती कधी ऐकूनच घेतली नाही. सत्ता, मुख्यमंत्रीपद असून देखील शिवसेनेच्या मंत्री, आमदारांची कामे होत नव्हती, आम्हाला भेटी दिल्या जात नव्हत्या. तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी सगळ्यांचे ऐकून घेत त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. जमेल तेवढा निधी दिला. आमदार, मंत्री असून देखील शिवसेनेतील नेते आम्हाला अपमानास्पद वागणूक देतात.

संजय राऊत खालच्या पातळीवर जाऊन बोलतात. मी राज्यमंत्री असतांना मला ते अशा पद्धतीने बोलत असतील तर मग इतरांचे काय ? असा सवाल देखील सत्तार यांनी उपस्थितीत केला. त्यामुळे आता आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहोत, ते सांगतील त्याच प्रमाणे पुढच्या गोष्टी होतील.

राज्यात आमच्या विरोधात आंदोलन, निदर्शने केली जात आहेत, आमची सुरक्षा काढू घेतली जात आहे. पण राज्य सरकारने सुरक्षा काढली तर आम्ही केंद्राकडे सुरक्षा मागू, तशीही मला सुरक्षेची गरज नाही. माझे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यासाठी सक्षम आहेत. राहिला प्रश्न महाराष्ट्रात येण्याचा तर एकनाथ शिंदे सांगतिल तेव्हा आम्ही महाराष्ट्रात येऊ, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT