Chandrakant Khaire- Devendra Fadanvis
Chandrakant Khaire- Devendra Fadanvis Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : फडणवीसांच्या टीकेने खैरेंची गल्ली ते दिल्ली चर्चा..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : मुंबईत काल झालेल्या हिंदी भाषी महासंक्लप सभेत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी घणाघाती भाषण केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बीकेसीतील सभेनंतर `जवाब मिलेगा ठोकके मिलेगा`, असा इशारा फडणवीसांनी दिला होता, तो त्यांनी खराही करून दाखवला. या सगळ्या भाषणात औरंगाबादचे संभाजीनगर करण्याच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घुमजावचा समाचार घेतांना फडणवीसांनी शिवसेनेचे माजी खासदार तथा मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khiare) यांचा उल्लेख केला.

खैरे यांना उद्देशून `खैरे आता व्हा बहिरे`, भाजपचे सरकार आल्याशिवाय आता विसरा संभाजीनगर, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. (Aurangabad) मुंबईतील उत्तर भाषिकांच्या समोर केलेल्या भाषणात फडणवीसांनी खैरेंचा उल्लेख केला आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत खैरे पुन्हा चर्चेत आले. प्रसार माध्यमांनी फडणवीसांच्या टीकेवर खैरेंची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गर्दी केली.

खैरेंनी देखील मग आपल्या स्टाईलमध्ये फडणवीसांच्या टीकेला उत्तर देतांना जुन् संदर्भ देत आपण संभाजीगरसाठी फडणवीसांकडे कसा पाठपुरावा केला, केंद्रात कसा पत्रव्यवहार केला याचे दाखले दिले. त्यामुळे कालपासून खैरे राज्यपातळीवर चर्चेत राहिले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर खैरे आता संपले असं त्याच्या विरोधकांकडून नेहमी सांगितले जात होते. पराभवामुळे खचलेल्या खैरेंकडून सुरुवातीच्या काळात काही चुका देखील झाल्या.

पैकी राज्यसभेवर संधी न मिळाल्याने चिडलेल्या खैरेंनी पहिल्यांदा ठाकरे कुटुंबावर राग व्यक्त करत काही विधाने केली होती. त्याचा फटाक देखील त्यांना सहन करावा लागला होता. कित्येक महिने ठाकरेंनी त्यांना फोन किंवा कुठलाही संपर्क केला नव्हता असे देखील बोलले जाते. परंतु या सगळ्यातून बोहर येत खैरेंनी पुन्हा नव्या जोमाने पक्ष कार्याला स्वतःला वाहून घेतले. स्वतःला मुख्य प्रवाहात ठेवण्यात ते यशस्वी झाले.

त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या आढळराव, आडसूळ अशा नेत्यासारखे ते बाजूला फेकले गेले नाहीत. मराठवाड्याचे नेते पद असल्यामुळे देखील ते कायम सक्रीय राहिले. पक्षाच्या ध्येय, धोरणांवर बोलत राहिले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आलेल्या प्रत्येक आदेशाची अंमलबजावणी करण्यात त्यांनी धन्यात मानली. मातोश्रीवर वजन घटले असे म्हणणाऱ्यांना देखील खैरेंनी आपली उपद्रव शक्ती दाखवली.

अजूनही खैरेंना पक्षांतर्गत विरोधाला तोंड द्यावे लागत असले तरी त्यांनी मातोश्रीवर असलेली आपली निष्ठा ढळू दिलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील खैरे यांचे महत्व माहित असल्याचेच फडणवीसांच्या टीकेवरून दिसून आले आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या प्रवासातील खैरे हे मुख्य पात्र आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कुठलाही सरकारी, खाजगी कार्यक्रम असो, कितीही मोठा नेता, मंत्री असो खैरे कायम आपल्या भाषणातून संभाजीनगर असा उल्लेख आवर्जून करतात.

शिवाय दिल्ली असो की मग राज्य प्रत्येकाला भेटल्यावर भगवी शाल त्यांच्या गळ्यात घालण्याची परंपरा देखील खैरेंनी राखली आहे. फडणवीसांच्या उल्लेखाने खैरेंची राज्यभरात चर्चा होण्याचे हे देखील एक कारण असावे. एकंदरित फडणवीसांनी खैरे यांच्यावर मुंबईच्या जाहीर सभेत केलेली टीका त्यांच्या पथ्यावरच पडली असे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT