Aurangabad Thirty-Thirty Scam News
Aurangabad Thirty-Thirty Scam News Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad Scam : तीस-तीस घोटाळा असा झाला..

सरकारनामा ब्युरो

Marathwada News : मराठवाडा आणि औरंगाबादच्या औद्योगिक विकासात मैलाच दगड ठरलेल्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल काॅरिडाॅर अर्थात डीएमआयसीसाठी झालेल्या भूसंपादनातून या तीस-तीस घोटाळ्याची उत्पत्ती झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. (Aurangabad) डीएमआयसीसाठी शहरालगतच्या शेंद्रा, बिडकीन परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमीनींचे भूसंपादन झाले. त्यापोटी शेतकऱ्यांना सरकारकडून चौपट भाव देण्यात आला. त्यामुळे शेतकरी रातोरात कोट्याधीश झाले.

शेतकऱ्यांकडे आलेला हा भरमसाठ पैसा पाहून कन्नड तालुक्यातील संतोष राठोड नावाच्या तरुणाच्या डोक्यातून ३०-३० योजनेचा जन्म झाला. (Scam) डीएमआयसी मध्ये ज्या भागातील जमीनी गेल्या त्या बिडकीन व अन्य गावांत शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी राठोड आणि त्याच्या साथीदारांनी प्रवृत्त केले. (Marathwada) त्यासाठी जादा व्याजदर आणि परतव्याचे आमिष, महागड्या गाड्या गिफ्ट म्हणून देण्याची लालूच दाखवली गेली. या आमिषाला बिडकीन आणि परिसरातील अनेक शेतकरी पडले.

सुरुवातीला शेतकऱ्यांना महिन्याला ५ टक्क्यांनी गुंतवणुकीच्या रक्कमेवर परतावा देण्यात आला. शेतकऱ्यांना गुंतवलेल्या रक्कमेवर दरमहा ५ टक्के परतावा मिळू लागल्याने ही योजना अल्पवाधीत चर्चेत आली. जसजसे शेतकरी गुतंवणुकीसाठी पुढे येवू लागले, तससते आमिष आणि व्याजाचा दर वाढत गेला. राठोड आणि त्याच्या कंपूने शेतकरी जाळ्यात अडकत असल्याचे लक्षात येताच दरमहा तब्बल २५ टक्के परतावा द्यायला सुरुवात केली. हळूहळू गुंतवणूक वाढायला लागली आणि राठोडने आपल्या नातेवाईकांना सोबत घेत धंदा वाढवला.

'तीस-तीस' नावाचा ग्रुप बनवत अलिशान गाड्यांचा ताफा घेऊन ते गुंतवणूकदारांना परतव्याचे पैसे देण्यासाठी फिरू लागले. परताव्याची रक्कम अक्षरशा गोण्यांमध्ये भरून नेली जात होती. या भपक्याला अनेक शेतकरी बळी पडले आणि त्यांनी राठोड आणि त्यांच्या टोळीवर आंधळेपणाने विश्वास टाकला. तीस-तीसची ख्याती जशीजशी पसरली तशी गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील वाढली. बिडकीन व आसपासच्या ३० हून अधिक गावांतील शेतकरी या टोळीच्या जाळ्यात ओढले गेले. पण राठोड आणि त्यांच्या टोळीचा भांडाफोड लवकरच झाला.

आधी ५ टक्के परतावा देणाऱ्या आणि नंतर तो २५ टक्क्यांपर्यत नेणाऱ्या राठोड व त्यांच्या टोळीने नंतर परतवा देण्यास टाळाटाळ सुरू केली. नंतर राठोड आणि त्यांचे साथीदार गुंतवणूकदारांना टाळू लागले. परतावा, गुंतवलेली रक्कम परत मागणाऱ्यांचा तगादा वाढायला लागला तेव्हापासून या योजनेचे कार्यालय हळूहळू बंद झाले. राठोड आणि त्याचे साथीदारही फरार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मग शेतकरी आणि गुतंवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली.

सर्वप्रथम पैठण तालुक्यातील जांभळी गावातील गुंतवणूकदार महिलेने बिडकीन पोलिसांत याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर फसवणूक झालेल्यांनी पुढं यावं, असं आवाहनही पोलीसांनी केले होते. पुढे जसाजसा तपास पुढे जात होता, तशी धक्कादायक माहिती समोर येत होती. काही राजकीय नेत्यांनीसुद्धा यात पैसे गुंतवल्याचे समोर आले. हा घोटाळा साडेतीनशे कोटींच्यावर असल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT