Shivsena Mla Ambadas Danve
Shivsena Mla Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : भाजप कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करत अससल्याचा शिवसेनेचा आरोप

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शहरातील पाणी प्रश्‍नावरून राजकारण पेटले आहे. सोमवारी (ता. नऊ) शिवसेनेच्या (Shivsena) शिष्टमंडळाने महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांची भेट घेऊन किमान दोन दिवसाआड नळाला पाणी येईल, असे नियोजन करण्याची मागणी केली. भाजप (Bjp) शहरात कृत्रीम पाणी टंचाई निर्माण करत आहे, असा आरोप यावेळी शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला.

भाजपने यापूर्वीच आघाडी सरकारमुळे शहराची नवी पाणी पुरवठा योजना रखडल्याचा आरोप केला होता. त्यामुळे महापालिका (Municipal Corporation) निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाण्यावरून राजकारण पेटण्याची चिन्ह आहेत. शहराच्या पाणीप्रश्‍नावरून भाजपतर्फे वारंवार आंदोलने केली जात आहेत. (Aurangabad) मात्र अद्याप नागरिकांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी महापालिकेत धाव घेत पांडेय यांची भेट घेतली.

यावेळी दानवे म्हणाले, नाथसागरात मुबलक पाणी असताना पाच दिवसाआड देखील नळाला पाणी येत नाही. अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही. नियोजन कुठे बिघडले याचा शोध घ्या आणि नियोजन करा. पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलने केली जात आहेत. त्यामुळे टाक्यावर पोलिस बंदोबस्त लावण्यात यावा. भाजप कृत्रीम पाणी टंचाई करत असल्याचे पुरावे आहेत.

पुंडलीकनगरची टाकी भरून घेत सिडकोत टंचाई निर्माण केली जाते व तिथे आंदोलन केले जाते. तर कधी सिडकोत पाणी साठवून पुंडलीनरला आंदोलन केले जाते, असा आरोप दानवे यांनी केला. विकास कामे बंद असल्याने महापालिकेची संपूर्ण यंत्रणा पाणी पुरवठ्यासाठी लावण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

प्रत्येक टाकीला मिटर लावण्यात यावेत, गळत्या थांबविल्यास किमान दोन एमएलडी पाणी वाढेल. तीन वर्षे हीच योजना कशी टिकेल याचे नियोजन करा, पाणीपट्टी कमी करा, अशी मागणी माजी सभापती राजू वैद्य यांनी केली. ज्या भागात पाण्याचा अपव्यय होतो, तेथील पाणी कमी करा, अशी सूचना माजी महापौर कला ओझा यांनी केली. सावंगी तलावातून पाणी घेण्यासंदर्भात निर्णय घ्या, या तलावात ड्रेनेज लाइनचे पाणी सोडणाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांनी केली.

छावणी भागात पाण्याची एकही तक्रार नाही, त्यांचा आदर्श घ्या, असा टोला माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी लगावला. शहराचे तीन भाग करून पाणी पुरवठ्याचे नियोजन करा, अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम केल्यास पाणी टंचाई जाणवणार नाही, असे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी सांगितले. शहरात येणाऱ्या पाण्याचे ऑडिट करण्यात यावे, प्लंबर, लाइनमनमुळे बेकायदा नळांची सख्या वाढत आहे, मुख्य पाइपलाइनवरील कनेक्शन बंद करण्यात यावेत, अशी मागणी माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली.

पाणीपट्टी कमी करण्यावरून शिवसेनेच्या शिष्टमंडळात मतभेद दिसून आले. राजू वैद्य यांनी पाणीपट्टी कमी करण्याचा विषय मांडला. पण अंबादास दानवे यांनी त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. त्यावर वैद्य यांनी लोक आमच्या अंगावर येतात, बोलू द्या, असे सांगत पाणीपट्टी कमी करण्याची मागणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT