Minister Vikhe Patil Visit Agricultural Festival, News
Minister Vikhe Patil Visit Agricultural Festival, News Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : सत्तारांच्या मैत्रीखातर विखे पाटलांची कृषी महोत्सवाला भेट..

सरकारनामा ब्युरो

Marathwada Political : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पहिल्यांदाच राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन मराठवाड्यात आणि तेही त्यांच्या सिल्लोड मतदारसंघात केले. पश्चिम, उत्तर महाराष्ट्राची मक्तेदारी मोडून काढली म्हणून सत्तारांचे स्वागतही झाले. पण कृषी आणि वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सिल्लोड महोत्सवाची सांगड घालणे (Abdul Sattar) सत्तारांना चांगलेच महागात पडले.

पाच दिवसांच्या या महोत्सवासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोट्यावधींची वसुली केल्याच्या आरोपाने शेतकऱ्यांसाठीच्या चांगल्या उपक्रमाला गालबोट लागले. (Marathwada) उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली तरी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी महावसुलीच्या आरोपांमुळे या कृषी प्रदर्शनाकडे (Agricultural Festival)पाठ फिरवल्याचे दिसून आले. उद्या या कृषी प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.

तत्पुर्वी अब्दुल सत्तार यांचे काॅंग्रेसच्या काळातील जुने मित्र आणि सध्याच्या मंत्रीमंडळातील सहकारी महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज कृषी महोत्सवाला भेट दिली. उद्या समारोपाला उद्योगमंत्री उदय सामंत येणार असल्याची माहिती आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात कृषी महोत्सवासाठीच्या महावसुलीचा मुद्दा गाजला. विधान सभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि परिषदेचे अंबादास दानवे यांनी देखील या संदर्भात सभागृहात गंभीर आरोप केले. त्यामुळे हा महोत्सव राज्याचा नाही तर सत्तारांचा झाल्याचे चित्र आहे.

शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांच्यासह सरकारमधील अनेक मंत्री निमंत्रण असूनही महोत्सवाकडे फिरकले नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक येणार असल्याचे सत्तार सांगत होते. मात्र त्यांनीही कृषी प्रदर्शनाला अद्याप भेट दिलेली नाही. उद्या समारोप असल्याने आता आणखी कुणी मंत्री येण्याची शक्यता नाही. त्यामुळे राज्यस्तरीय व शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या या प्रदर्शनाचा उद्देश कितपत साध्य झाला हा संशोधनाचा विषय आहे.

विखे यांनी सत्तारांच्या मैत्रीखातर महोत्सवाला भेट दिली, उद्या उद्योगमंत्री येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात राज्यातील चारही कृषि विद्यापीठांसह कृषी विभागाने सादर केलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल, असे मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय व आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शेती केली पाहिजे असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT