Bachchu Kadu Sarkarnama
मराठवाडा

Bachchu Kadu : बच्चू कडूंनी शिवसेनेत प्रवेश करताच 'प्रहार'मध्ये बंड; जिल्हाप्रमुखांचाच घणाघात!

Bachchu Kadu political controversy : बच्चू कडूंनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षात बंड उसळले. एका आमदारकीसाठी पक्ष दावणीला बांधल्याचा आरोप जिल्हाप्रमुखांनी केला.

Jagdish Pansare

Parbhani news : प्रहार जनशक्ती पक्षामध्ये काम करणारा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता हा स्वाभिमानाने जगणारा आहे. मात्र बच्चू कडू यांनी एका आमदारकीसाठी आमचा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या दावणीला बांधला आहे. पक्षासाठी राबणाऱ्या, अंगावर अनेक केसेस घेणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना उध्वस्त करून तुम्ही घेतलेला हा निर्णय आणि मिळालेली आमदारकी तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही, अशा शब्दात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधले यांनी तोफ डागली.

विधान परिषदेच्या रिक्त नऊ जागांसाठी काल बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी आपला पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन करत आमदारकी मिळवली. शेतकरी आणि दिव्यांगांच्या हितासाठी आपण हा निर्णय घेतला, असा दावा बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करताना केला होता.

मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशानंतर प्रहार जनशक्ती पक्षात एकच खळबळ उडाली आहे. परभणी येथील पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी व कोअर कमिटीतील सदस्यांची बैठक घेऊन बच्चू कडू यांच्या या निर्णयावर तोफ डागली. प्रहार ही एक संघटना होती, दहा वर्षांपूर्वी तिचे प्रहार जनशक्ती पक्ष या एका राजकीय पक्षांमध्ये रूपांतर झाले.

शेतकरी, कष्टकरी आणि दिव्यांगांसाठी रस्त्यावर उतरून झटणारी संघटना आणि त्याचे नेतृत्व करणारे बच्चू कडू यांना लोकांनी डोक्यावर घेतले. मात्र त्यांनी एका आमदारकीसाठी पक्ष एकनाथ शिंदे यांच्या दावणीला नेऊन बांधला. हा अधिकार बच्चू कडू यांना कोणी दिला? आमच्यासारख्या पक्षावर प्रेम करणाऱ्या आणि शेतकरी दिव्यांगांसाठी रस्त्यावर उतरून लढणाऱ्या कार्यकर्त्यांना उध्वस्त करण्याचा, त्यांना राजकीय आयुष्यातून उठवण्याचा अधिकार बच्चू कडू यांना नाही.

प्रहार जनशक्ती पक्षाचे विलीनीकरण शिवसेनेत करण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी मुंबईत जाऊन जाहीर केला. एवढा मोठा निर्णय घेताना त्यांनी राज्यातील एकाही जिल्हाप्रमुख किंवा महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही, असा आरोप बोधने यांनी केला आहे. या संदर्भात आपण राज्यातील पक्षाच्या सर्व जिल्हाप्रमुखांशी चर्चा केली, तेव्हा बच्चू कडू यांनी हा निर्णय स्वतःच्या मर्जीने आणि केवळ आमदारकीसाठी घेतल्याचा घणाघात बोधणे यांनी केला.

प्रहार जनशक्ती पक्षात काम करणारा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता हा राजकारणात पुढे जाण्याच्या उद्देशाने काम करत होता. आगामी काळात जिल्हा परिषद व इतर निवडणुकांमध्ये पदाधिकाऱ्यांना काम करण्याची संधी मिळणार होती. मात्र असे असताना या सगळ्या पदाधिकाऱ्यांची राजकीय वाट लावत बच्चू कडू यांनी केवळ स्वतःचा स्वार्थ पाहिला.

तुम्ही खुशाल एकनाथ शिंदे यांच्या पायाशी लोटांगण घ्या, पण तुमच्या स्वार्थासाठी अख्खा पक्ष आणि जीवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बळी कशासाठी देता? सत्तेसाठी आम्ही आमचा स्वाभिमान कधीही गहाण ठेवणार नाही, तुम्ही शिवसेनेत गेला आमदार झाला त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा.

हजारो पदाधिकारी कार्यकर्त्यांचा बळी देऊन मिळवलेली ही आमदारकी तुम्हालाच लखलाभ असो. आम्ही लवकरच आमचा नवा मार्ग निवडू, असे म्हणत शिवलिंग बोधने यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT