Balasaheb Thorat  Sarkarnama
मराठवाडा

Balasaheb Thorat : तीन तलवारी एका म्यानात, कशा राहतील? तिसऱ्याची धडपड बघा; थोरातांनी अजितदादांना डिवचलं

Pradeep Pendhare

Mumbai News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी महायुतीमधील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. "या तीन तलवारी आहेत. एका म्यानात कशा राहतील. एक मुख्यमंत्री आहे. दुसरा उपमुख्यमंत्री असलेला मुख्यमंत्री राहिलेला आहे. अन् तिसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री व्हायची ईच्छा आहे", असे म्हणत अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीला बाळासाहेब थोरातांनी चिमटा काढला.

काँग्रेसचे (Congress) राज्यातील प्रमुख पदाधिकारी जन जल्लोष यात्रा घेऊन राज्य दौऱ्यावर आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधीमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रमुख नेते राज्य दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्याचे नेतृत्व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला करत आहे. ही यात्रा अमरावती आणि यवतमाळ दौऱ्यावर असताना बाळासाहेब थोरातांनी महायुती सरकारवर आणि सत्तेचे केंद्रबिंदू असलेले मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

बाळासाहेब थोरात म्हणाले, "महायुती सरकार ज्यापद्धतीने बनले गेले, ते महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेले नाही. बिलकुल मान्य नाही. फोडाफोडी, खोक्यांचा वापर झाला. पळवापळवी महाराष्ट्राने पाहिली. ही खोक्यांच्या सहाय्याने झाली होती. सरकार बनवण्यासाठी गुवाहाटी, सुरतला गेले. भ्रष्टाचारी आमदारांना एकत्र आणण्याचे काम महायुतीने केले. आता ते मंत्री झाले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) देखील यात जाऊन बसले". या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री. एक मुख्यमंत्री आहेतच. दुसरा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री राहिलेला आहे. तिसऱ्याला मुख्यमंत्री व्हायचेय. त्याची धडपड लपलेली नाही. एकमेकात तीन तलवारी आहेत, एका म्यानात या तलवारी राहतच नाहीत, असे थोराता यांनी म्हटले.

लोकसभा निवडणुकीला अमरावतीची लढाई खूप कठीण होती. ती अमरावतीने जिंकली. देशातील महाराष्ट्र एकमेव खासदार आहे, प्रत्येक विभागात काँग्रेसने महिला खासदार दिली आहे. पाच महिला खासदार देणारा महाराष्ट्र एकमेव आहे. महाराष्ट्राने लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी महाराष्ट्रातून 14 खासदार पाठवले आहेत. पंतप्रधान आणि त्यांचे सरकार अंहकारी झाले होते. त्यांचा अंहकार महाराष्ट्राने उतरवला. ऐतिहासिक काम महाराष्ट्राने लोकसभा निवडणुकीत केले आहे. संविधान, लोकशाही वाचवली आहे. विधानसभेत आता मोठे यश मिळवायचे आहे. महाविकास आघाडी, तर आहेच. काँग्रेस म्हणून देखील दिमाखदार यश हवे आहे. त्याची काळजी घ्यायची आहे, असा कार्यकर्त्यांना बाळासाहेब थोरातांनी आवाहन केले.

निवडणुकीसाठी पैसा गोळा करण्याचा कार्यक्रम

हे सरकार बेकायदेशीर असल्याचे निरीक्षक नोंदवले गेले आहे. निवडणुकीच्या आयोगाने काय निर्णय दिले, त्यापेक्षा सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल, त्याकडे पाहिले पाहिजे. विधानसभेत विरोधक म्हणून सरकारला आम्ही अनेकदा धारेवर धरले. परंतु सरकारला एकाही प्रश्नाचे उत्तर देता आलेले नाही. निवडणुकीसाठी पैसे गोळा करण्याचे काम या सरकारने सुरू केल्याचा आरोप देखील बाळासाहेब थोरातांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT