Bharat Jodo yatra
Bharat Jodo yatra  Sarkarnma
मराठवाडा

Bharat Jodo Yatra : "जेव्हा-जेव्हा यात्रा निघाल्या तेव्हा इतिहास घडलायं..."

सरकारनामा ब्यूरो

अर्धापूर : कांग्रेसचे राष्ट्रीय नेते व खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर काढलेल्या भारत जोडो यात्रेमुळे देशांत एक सकारात्मक विचार निर्माण झाला आहे. देशात जेव्हा जेव्हा अशा यात्रा निघतात तेव्हा तेव्हा एक नवीन इतिहास निर्माण झाला आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नव्हे, तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली असून, ही यात्रा एकमेकांना जोडणारी आहे. शेगाव येथील होणारी सभा ऐतिहासिक होईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

भारत जोडो यात्रेच्या पाचव्या दिवशी यात्रा अर्धापूर तालुक्यात आली. यात्रेत खासदार राहुल गांधी यांच्या सोबत नाना पटोले यांच्यासह राज्यातील व देशातील कांग्रेसचे ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पार्डी येथे सकाळच्या सत्रात माध्यमांशी संवाद साधला. यात्राविषयी माहिती दिली.

"महात्मा गांधी यांनी काढलेल्या दांडी यात्रेमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले तर आचार्य विनोबा भावे यांनी काढलेल्या भूदान यात्रेमुळे लाखों भूमीहिनांना जमीन मिळाली आहे. जेव्हा आशा सकारात्मक यात्रा निघतात तेव्हा इतिहास निर्माण होते. खासदार राहुल गांधी यांनी देशात एक सकारात्मक विचार निर्माण केले आहे. तर इतर पक्षांच्या नेत्यांनी काढलेल्या रथयात्रांमुळे मन दुभंगण्याचे काम झाले आहे. हे दुभंगलेले मन एकत्र करण्यासाठी ही भारत जोडो यात्रा आहे.

देश जेव्हा जेव्हा संकटात येतो तेव्हा कांग्रेस संकटात धावून जाते. कोरोनाच्या संकटात देश असताना मोदी सरकारने पांच राज्यात निवडणूका घेतल्या, पवित्र गंगा नदीत प्रेत वाहून गेली पण सरकारने काहीच केले नाही. या उलट दोन राज्यांत निवडणूक असताना राहुल गांधी सामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी पायी निघाले आहेत. यात्रा सर्वांचीच असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष सोबत आहे. लाखोंच्या संख्येने आबालवृद्ध सहभागी होत आहेत, आपल्या व्यथा सांगत आहेत, ही यात्रा एकमेकांना जोडणारी यात्रा आहे.

शेगाव येथील होणाऱ्या सभेविषयी म्हणाले की, ही सभा ऐतिहासिक होणार असून, या सभेत बेरेच काही बोलणार आहे. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, यांसह विविध प्रश्नांवर जनता बोलत आहे. देशात एक सकारात्मक उर्जा निर्माण झाली असून, ती उर्जा भारताला जोडणारी ठरेल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT