Bharat Jodo | Rahul Gandhi
Bharat Jodo | Rahul Gandhi 
मराठवाडा

कोणतीही शक्ती भारत जोडो यात्रा रोखू शकत नाही : राहुल गांधींचा एल्गार

सरकारनामा ब्युरो

नांदेड : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सोमवारी (7 नोव्हेंबर) महाराष्ट्रात पोहोचली आहे. दोन महिन्यांपूर्वी कन्याकुमारी येथून सुरू झालेला हा प्रवास कर्नाटकातून तेलंगणा आणि आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्राच्या भूमीवर पाऊल ठेवताच राहुल गांधी यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले, महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

राहुल यांचे महाराष्ट्रात जोरदार स्वागत

सोमवारी रात्री नांदेडमध्ये भारत जोडो यात्रेने प्रवेश केला. हजारो मशाली घेऊन राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते तेलंगणातून नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाले. तेलंगणातून महाराष्ट्रात दाखल होताच तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी नाना पटोले यांच्याकडे तिरंगा ध्वज सुपूर्द केला. यावेळी राहुल गांधी यांचे मराठा स्टाईलमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले.

राहुल यांनी सरकारवर निशाणा साधला

यावेळी राहुल गांधी यांनी देगलूरमध्ये हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित केले. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'च्या घोषणा देऊन त्यांनी भाषणाला सुरुवात केली. राहुल गांधी पुढे म्हणाले की, कोणतीही शक्ती आपली भारत जोडो यात्रा रोखू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात पदयात्रा सुरू होत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. आज देशात अनेक ज्वलंत समस्या आहेत. मात्र केंद्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही. हे सरकार फक्त चार-पाच भांडवलदारांसाठी काम करत आहे. नोटाबंदीमुळे देशातील छोटे उद्योग ठप्प झाले. 400 रुपयांचा गॅस सिलिंडर 1 हजार 100 रुपये आणि पेट्रोल, डिझेल 100 रुपये लिटर झाले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर चकार शब्द बोलत नाहीत.

शरद पवार-उद्धव ठाकरे सहभागी होणार का?

राहुल गांधी यांचे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मीडिया विभाग प्रमुख जयराम रमेश, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, प्रदेश प्रभारी एच. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली. महाराष्ट्रात काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरेही सहभागी होऊ शकतात, असंही बोललं जात आहे. याला अद्याप दुजोरा मिळालेला नसला तरी काँग्रेसच्या या भेटीला दोन्ही पक्षांनी पाठिंबा दिल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्रात असा असेल भारत जोडो यात्रेचा प्रवास

खरे तर महाराष्ट्रात राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा' 14 दिवसांत 385 किलोमीटरची पदयात्रा पूर्ण करणार आहे. 7 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत नांदेड जिल्ह्यात फिरणार आहे. त्यानंतर ही यात्रा हिंगोली जिल्ह्यात 11 ते 15 नोव्हेंबर आणि वाशिम जिल्ह्यात 15 ते 16 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. यानंतर 16 ते 18 नोव्हेंबर दरम्यान अकोला मार्गे, 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातून 'भारत जोडो यात्रा' मध्यप्रदेशकडे निघेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT