Mp.Pratap Patil Chikhlikar-Ashok Chavan
Mp.Pratap Patil Chikhlikar-Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Bjp : खासदार चिखलीकरांची चव्हाणांवर टीका, पण एका गोष्टीसाठी केले कौतुक..

सरकारनामा ब्युरो

मुंबई : नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि जिल्ह्यातील काॅंग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांच्यात विळा-भोपळ्याचे वैर आहे. (Nanded) संधी मिळेत तेव्हा हे दोन्ही नेते एकमेकांवर यथेच्छ तोंडसुख घेत असतात. मुंबईत पत्रकारांशी बोलतांना आज चिखलीकरांनी एका मुद्यावर मात्र अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे मनापासून कौतुक केले. नेमकं चव्हाणांनी काय असे केले, की त्यांच्या कट्टर विरोधकाने त्यांचे कौतुक करावे. तर हे कौतुक म्हणजे एकप्रकारे त्यांनी चव्हाण यांना लागवलेला टोलाच आहे.

उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादे धाराशीव असे नामांतर करण्याचा प्रस्ताव मंजुर करून घेतला. विशेष म्हणजे नेहमी या नामांतराच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या काॅंग्रेसने मात्र या निर्णयाला विरोध न करता मुक संमंतीच दिली. त्यामुळेच चिखलीकरांनी (Pratap Patil Chikhlikar) अशोक चव्हाण यांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

चिखलीकर म्हणाले, चव्हाण याचे मी एका कामासाठी कौतुक करीन, ते म्हणजे औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर त्यांनी केलं. उस्मानाबादचे धाराशीवही त्यांनी केले. याबाबत चव्हाण यांचे मी कौतुक करतो. पण ज्या लेंडी प्रकल्पाचा ते वारंवार उल्लेख करतात, तो आज ६०० कोटींवर जाऊन पोहचला आहे. तो त्यांना इतकी वर्ष सत्ता उपभोगून देखील पुर्ण का करता आला नाही?

५० वर्ष त्यांच्या घरात सत्ता होती, पण त्यांना नांदेडमध्ये एकही नॅशनल हायवे करता आला नाही. नांदेडचा आम्ही सर्वे केला तेव्हा निधी मिळवून देण्यासाठी चव्हाण यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत हे देखील स्पष्ट झाले आहे. लेंडी प्रकल्प रखडला, का रखडला याचे देखील चव्हाण यांनी उत्तर द्यायला हवे. प्रत्येक निवडणुकीत या प्रकल्पाचा उल्लेख चव्हाण करतात. आज या प्रकल्पाची किंमत ६०० कोटींवर गेली आहे.

नितीन गडकरी यांच्यामुळेच नांदेडमध्ये रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग व्हायला सुरूवात झाली. जे चव्हाणांना ५० वर्षात जमले नाही, ते आता होत आहे. तेव्हा लोकांना उपदेश करण्यापेक्षा आपण काय केले यावर चव्हाण यांनी आत्मचिंतन करावे, असा टोला देखील चिखलीकर यांनी लगावला. शिवसेनेतील एक मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षातून बाहेर पडला.

सरकार अल्पमतात आले ते केव्हाही पडेल हे माहीत असतांना चव्हाण यांनी डिपीडिसीची बैठक लावली. त्यामुळे त्यांनी मंजुर केलेल्या कामांची चौकशी व्हावी, अशी मागणी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत. निवडणुक डोळ्यासमोर ठेवून काम आम्ही करत नाही, नांदेडमध्ये यांनी काम कमी आणि खड्डे जास्त खोदले, अशी टीकाही चिखलीकर यांनी केली.

अशोक चव्हाण व त्यांचे जिल्ह्यातील समर्थक आमदार शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी गैरहजर होते, यावरून देखील चिखलीकरांनी चव्हाणांना टोला लगावला. अशोकराव हे विश्वास दर्शक ठरावाला एकटेच गैरहजर नव्हते तर नांदेडचे चारही आमदार उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो, यामागची कारणं देखील वेगळी होती, असेही चिखलीकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT