Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi Sarkatrnama
मराठवाडा

बिनविरोध नेत्यांच्या भूमिकेमुळे महाआघाडीच्या उमेदवारांची धाकधूक वाढली; भाजपने लावला जोर!

सरकारनामा ब्यूरो

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदानाला आता पाच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. आतापर्यंत एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत रंगत वाढली आहे. भारतीय जनता पक्षाची (bjp) यंत्रणाही जोमाने कामाला लागली आहे. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) मतदान आपल्याकडे खेचण्याकडे त्यांनी प्राधान्य दिले आहे. या सर्वच घडामोडीमुळे मतदारांचीही चांदी होत आहे. (BJP's mechanism for Osmanabad District Bank elections started working)

उस्मानाबाद जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष एकटा पडला आहे. त्यातूनच पहिल्या टप्प्यातच महाविकास आघाडीच्या पाच जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत, त्यामुळे भाजपने निवडणुकीतून अंग काढून घेतल्याची चर्चा रंगली होती. मात्र, भाजपने आता चांगले लक्ष घातले आहे, त्यामुळे मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी चुरस वाढत आहे. त्यातच बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची भूमिका स्पष्ट होत नसल्याने निवडणुकीतील महाआघाडीच्या उमेदवारांची धाकधूक चांगलीच वाढली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदारांची संख्या ही मर्यादित असल्याने यश समीप दिसत असले तरी त्यामध्ये येणाऱ्या अडथळ्याची शर्यत असते. हे अडथळे पार करताना उमेदवारांची मोठी दमछाक होते. त्याचा प्रत्यय आता दोन्ही पॅनेलमधील उमेदवारांना येत आहे. महाविकास आघाडीच्या तगड्या आव्हानापुढे सुरुवातीला भाजपने निवडणूक सोडून दिल्याचेदेखील म्हटले जात होते. पण, आता भाजपने स्वतःला झोकून दिल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडी एकसंध राहिल्यास ही निवडणूक जिंकणे आघाडीला सहज शक्य आहे. पण, तीन पक्षाच्या नेत्यामध्ये अंतर्गत कुरघोडी व संबंधाचा थेट परिणाम होणार हे उघड होते. अगदी याच संधीचा फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

महाविकास आघाडीची टीम मोठी असून, त्यांचे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदार आहेत. त्यांच्यापर्यंत उमेदवार पोचल्यास व कुठेही फूट न पडल्यास भाजपला मोठा फटका बसणार आहे. निवडणुकीत पाच जागा बिनविरोध निघाल्याने गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. बिनविरोध आलेल्या उमेदवारांची भूमिका लक्षात येत नसल्याने संशय निर्माण झाला आहे. भाजप त्याचा चांगला फायदा उठविण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतिशय रंगतदार स्थितीत पोचलेल्या निवडणुकीच्या मतदानाला अजून पाच दिवसांचा कालावधी असल्याने हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे.

अनेक मतदारांचा दोन्ही बाजूच्या उमेदवारांना शब्द!

जेवढी अंतर्गत फूट टाळता येईल, तेवढी महाविकास आघाडी सशक्त राहणार आहे; अन्यथा पडलेली फूट भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत मतदारांचा भाव अधिक वाढणार असून अनेकांनी तर दोन्ही बाजूच्या उमेदवारांना शब्द दिला असल्याने अशाही मतदारांची संख्या कमी नसल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT