Osmanabad District Grampanchayat News
Osmanabad District Grampanchayat News Sarkarnama
मराठवाडा

Grampanchayat Election : राणापाटलांमुळे भाजपची ताकद वाढली, शिवसेनेत वाटेकरी वाढल्याने नुकसान..

सयाजी शेळके

Osmanabad News : जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला ग्रामपंचायतीत बळकटी मिळाली असली तरी महाविकास आघाडीचा करिष्मा जिल्ह्यात कायम असल्याचे चित्र ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला मिळाले. Grampanchayat Election भाजपच्या गटाला ८० ग्रामपंचायतीत तर शिवसेना ४९, राष्ट्रवादी ४२ आणि काँग्रेसच्या गटाला ४० ग्रामपंचायतीत यश मिळाल्याचा दावा त्या-त्या पक्षाकडून केला जात आहे.

दरम्यान बाळासाहेबांच्या शिवसेनेनेही जिल्ह्यात यश मिळविले असले तरी शिवसेनेची घौडदौड रोखण्यात त्यांना फारसे यश आलेले नाही.(Ranajagjeetsingh Patil) जिल्ह्यात झालेल्या १६६ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुका या प्रामुख्याने स्थानिक आघाड्या करूनच लढविल्या गेल्या. (Shivsena) जिल्ह्यात भाजपची फारसी ताकद नव्हती.

मात्र तुळजापूर तालुक्यात भाजपला बऱ्यापैकी यश मिळाले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर तुळजापूर तालुक्यात भाजपची ताकद वाढील्याचे दिसत आहे. दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदही तुळजापूर तालुक्याकडे आहे. असे असताही तालुक्यासह जिल्ह्यात काँग्रेसची पिछेहाट झाली असल्याचे दिसून येते. तालुक्यात राष्ट्रवादीलाही काही ग्रामपंचायतीत यश मिळाले आहे. कळंब, उमरगा तसेच लोहारा तालुक्यात भाजपला बऱ्यापैकी यश मिळाले.

राज्यासह देशात भाजपची सत्ता असताना गेली अनेक वर्षे भाजपला जिल्ह्यात फारसे यश मिळत नव्हते. दरम्यान विधानसभा निवडणुकीत तुळजापूरमध्ये राणाजगजितसिंह पाटील यांच्या रुपाने प्रथम आमदारकी मिळाली. त्यानंतर प्रथमच जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या आहेत. तुळजापूर तालुक्यासह एकूण ८० ग्रामपंचायतीमध्ये यश मिळविल्याचा दावा भाजपने केला आहे. दरम्यान जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर येण्याचा मान भाजपच्या गटाला पहिल्यांदाच मिळाला हे मात्र निश्‍चित आहे.

जिल्ह्यात खासदार तसेच आमदार असतानाही सेनेची काही प्रमाणात पिछेहाट झाल्याचे दिसते. तर राष्ट्रवादीचेही बळ काही प्रमाणात कमी झाले आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनाही आपले स्वतःचे गड राखता आलेले नाहीत. असे असले तरी तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीने जिल्ह्यात भाजपलाही मागे टाकले आहे. शिंदे गटामुळे काही ग्रामपंचायतीत सेना बॅकफूटवर गेली आहे. खासमवाडी (ता. कळंब) या मोठ्या ग्रामपंचायतीत शिंदे गटाने सत्ता मिळविली आहे.

याशिवाय जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातही जास्तीच्या ग्रामपंचायती शिंदे गटाकडे गेल्याने सेनेची ताकद काही प्रमाणात विभागल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडी झाली तरच भाजपची घौडदौड रोखता येणार असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात दावे-प्रतिदावे केले असले तरी ग्रामपंचायत निवडणुका स्थानिक आघाड्या करूनच लढल्या जातात. त्यामुळे विविध पक्षाच्या नेत्यांचे दावे म्हणजे हवेत फुसका बार असल्याची प्रतिक्रिया ग्रामीण भागातून उमटत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT