Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve : माझा मराठवाडा दौरा भाजप कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी...

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News, 23 June : लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात आम्हाला यश मिळाले नाही. भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जीवापाड मेहनत घेतली, पण राज्यातील राजकीय वातावरण आणि इतर कारणामुळे आम्हाला यश मिळाले नाही. साहजिकच या पराभवामुळे कार्यकर्ते निराश होते.

पण राजकारणात पराभवाने खचून जायचं नसते आणि विजयाने हुरळून जायचे नसते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा जोमाने काम करा आणि राज्यात महायुतीची सत्ता आणा हे सांगण्यासाठी आणि भाजप कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी माझा मराठवाडा दौरा असल्याचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी `सरकारनामा`शी बोलतांना सांगितलं.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात मोठा फटका बसला. पक्षाचे मोठे नेते, मंत्री पराभूत झाल्यानंतर पक्ष आता हळूहळू सावरू लागला आहे. जालना, बीड, लातूर, नांदेड या मतदारंसघात भाजपला (BJP) पराभव पचवावा लागला. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, प्रताप पाटील चिखलीकर, सुधाकर शृंगारे यांचा पराभव भाजप कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला. या पराभवाच्या धक्यातून सावरण्यासाठी, त्यांनी धीर देण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठवाडा संवाद दौऱ्याचे नियोजन केले होते.

त्यानूसार शनिवारी (ता. 22 जून) रोजी दानवे (Raosaheb Danve) यांनी नांदेड, लातूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. तर रविवारी धाराशिवचा दौरा करून ते सायंकाळी मुंबईला जाणार आहेत. मराठवाड्यात भाजपला आलेल्या अपयशानंतर प्रत्येक जिल्ह्यातून स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मला फोन येत होते. कोणीतरी यावे, आमच्याशी बोलावे, धीर द्यावा, अशी त्यांची अपेक्षा होती. जालना लोकसभा मतदारसंघात माझा पराभव झाल्यानंतर मी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार मानण्यासाठी आपला दौरा होता असं त्यांनी सांगितलं.

त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवण्याच्या हेतूने मी मराठवाडा दौरा करण्याचे ठरवले. जालना, नांदेड, लातूर, धाराशिवचा दौरा आटोपून बीडमध्ये आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवावर चर्चा करतांना आगामी लोकसभा निवडणुकीत नव्या उमेदीने, जोमाने कामाला लागा आणि महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सत्ता आणा, असे आवाहन या संवाद बैठकीतून दानवे यांनी केले.

दरम्यान, मुंबईहून परत आल्यानंतर परभणी, हिंगोली जिल्ह्याचा दौरा करून भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचंही दानवेंनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून प्रत्येक कार्यकर्ता सावरला पाहिजे, विधानसभा निवडणुकीत त्याने पुन्हा उभारी घेऊन काम केले पाहिजे, ही अपेक्षा प्रत्येकाकडून व्यक्त केली. शिवाय माझ्या दौऱ्याने भाजप कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT