Asaduddin Owasi-Imtiaz Jalil Sarkarnama
मराठवाडा

मुस्लीम आरक्षणाचे बिल आणा, अन्यथा रस्त्यावर उतरू; MIMचा इशारा

सरकारनामा ब्युरो

औरंगाबादः मुस्लिम समाजातील पन्नास जातींच्या शैक्षणिक आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश देऊन सुद्धा मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात आले नाही. मुस्लिम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक परिस्थितीचा डेटा उपलब्ध आहे. तरीही मागील आणि आताचे सरकार मुस्लिम आरक्षणावर बोलत नाही. आता मुस्लिम आरक्षणासाठी आम्ही राज्यभर रस्त्यावर उतरु, असा इशारा एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी खासदार इम्तियाज जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी, माजी आमदार वारीस पठाण आदी उपस्थित होते. `सिच्युएटींग डेव्हलपमेंट ऑफ मुस्लिम इन महाराष्ट्र`, परिषदेसाठी ते औरंगाबादेत आले होते. प्रसार माध्यमांशी बोलतांना ओवेसी म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजातील पन्नास जातींना शिक्षणात चार टक्के आरक्षणासाठी निर्देश दिले होते. मात्र शासनाकडून यावर कृती करण्यात आली नाही.

आरक्षण न देणे हा मुस्लिम समाजावरील अन्याय आहे. याच अन्यायाला आम्ही वाचा फोडत आहोत. आमचा कुणाच्या आरक्षणाला विरोध नाही. मात्र मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रगतीसाठी खुप महत्वाचा आहे. मागील सरकार आणि आताचे सरकार मराठाआरक्षणावर भरभरुन बोलतात मात्र ते मुस्लिम आरक्षणावर का बोलत नाहीत. किती मुस्लिमांकडे जमीनी आहे, त्यांच्या गरीबी, झोपडपट्टीत राहणाऱ्यांचे प्रमाण किती आहे.

या संबंधी सच्चर समिती, महेमुद उर्र रहेमान समिती, रंगनाथ मिश्रा आयोग, २०११ ची जनगनणा याचा सर्व डेटा उपलब्ध आहे. त्यामुळे आता पुढील अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने मुस्लिम आरक्षणाचे बील आणावे. मुस्लिम आरक्षण आणि वक्फच्या संपत्तीचे रक्षण करावे यासाठी आम्ही संपुर्ण राज्यभर आंदोलन करणार आहोत. यासाठी मुंबईत मोर्चा काढणार आहोत.

आरक्षणासाठी मुस्लिम समाजाने मराठा समाजाप्रमाणे एकजुट होणे आवश्‍यक आहे. आता जे सत्तेत आहे त्यांची आरक्षण देण्याची जबाबदारी असल्याचेही ओवेसी म्हणाले. मालेगाव, अमरावती आणि नांदेड जिल्ह्यात बंद दरम्यान हिंसाचार झाला होता. त्याचा आम्ही निषेध करतो. या हिंसेची चौकशी करायला हवी. सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहनही ओवेसी यांनी केले.

मराठा समाज आरक्षणासाठी एक होऊन लढला त्यांना आरक्षण मिळाले मात्र ते आक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले. आता मराठा समाज आरक्षणावर एवढा शांत कसा काय आहे. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांनी काही सांगितले आहे का ? त्यांनी रस्त्यावर उतरावे आम्ही त्यांना साथ देऊ, असे आवाहन देखील त्यांनी केले.

गरीबांच्या पोटावर पाय?

भाज्यांचा बाजार भरु शकतो तर मग मांसाहाराची बाजार का असू नये. जे श्रीमंत आहे ते हॉटेलमध्ये जाऊन मांसाहार करतील, मात्र गरीब तर हातगाड्या, रस्त्यावरील छोट्या खाद्यपदार्थाच्या दुकानात जात असतो. त्यांच्या पोटावर पाय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गोडसेचा पुतळा बसविला जातो मात्र त्यावर कुणीच बोलत नाही तर दुसरीकडे गरीबांकडून त्यांचा रोजगार हिरावला जातोय, अशी टीकाही ओवेसी यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT