Ambadas Danve-Sandipan Bhumre-Sanjay Shirsat News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : मुख्यमंत्र्यांसमोरच भुमरे-शिरसाट-दानवे यांच्यात कानगोष्टी! काजू खात तिघांमध्ये हास्यविनोदही रगंला..

Ambadas Danve, Sanjay Shirsat & Sandipan Bhumre sharing laughter and unity over cashews. : समोर पन्नास प्लेट ठेवलेल्या नव्हत्या, त्यामुळे एकाच प्लेटमध्ये ठेवलेले काजू आम्ही खाल्ले तर बिघडले कुठे? याचा अर्थ आम्ही एकत्र आहोत, असा होत नाही.

Jagdish Pansare

Marathwada Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. याचा कार्यक्रमात व्यासपीठावर खासदार संदीपान भुमरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट हे एकाच सोफ्यावर शेजारी बसले होते. ऐरवी एकमेकांचे वस्त्रहरण करणारे हे तीन नेते एकाच प्लेटमधील काजू खात हास्यविनोदही करत होते. कानामध्ये कुजबुज आणि त्यावर हसत एकमेकांना दाद देतानाचे हे चित्र पहायल्यानंतर हे खरचं विरोधक आहेत, की याची मिलिभगत? असा प्रश्न उपस्थितांना पडला.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी शिवसेनेत फूट पडल्यापासून खासदार संदीपान भुमरे, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर अनेकदा सडकून टीका केली आहे. एवढेच नाही नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात दानवे यांनी सभागृहात संजय शिरसाट यांच्यावर राजकीय दबाव आणत हाॅटेल खरेदीचा प्रयत्न, एमआयडीसीतील भूखंड यासह अनेक विषय मांडले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत कारवाईचा आग्रही धरला. दुसरीकडे खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यावरही त्यांच्या दारूच्या दुकानांवरून टीकेची झोड उठवत लक्ष्य केले होते.

शिवसेनेत फूट पडल्यापासून गेली २०-२५ वर्ष सोबत काम केलेल्या आणि आता एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दानवे-शिरसाट आणि भुमरे यांच्यात मुख्यमंत्र्यांसमोर चांगलीच गट्टी जमल्याचे दिसून आले. हे चित्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या असल्या तरी सगळं करून नामानिराळं राहण्याची कला अवगत असलेल्या या नेत्यांनी सोयीस्कररित्या आम्ही एकमेकांचे विरोधकच आहोत. विकासकामासाठी मात्र एकत्र असल्याचे सांगत वेळ मारून नेली. अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना या एकत्र काजू खाण्या संदर्भात जेव्हा विचारले तेव्हा, त्यांचा चेहरा चांगलाच पडला होता.

समोर पन्नास प्लेट ठेवलेल्या नव्हत्या, त्यामुळे एकाच प्लेटमध्ये ठेवलेले काजू आम्ही खाल्ले तर बिघडले कुठे? याचा अर्थ आम्ही एकत्र आहोत, असा होत नाही. शिवाय ते काजू मला गोड लागले नाही, असे म्हणत चेहऱ्यावरची नाराजी लपवण्याचा प्रयत्न केला. तर खासदार संदीपान भुमरे यांनी मात्र काजू त्यांना गोड लागले नसते, तर त्यांनी ते खाल्लेच नसते, असा टोला लगावला. भविष्यातही त्यांना आमचे काजू गोडच लागतील, असे म्हणत त्यांची टर्म संपत असल्याकडे भुमरे यांनी लक्ष वेधले. संजय शिरसाट यांनी मात्र यावर भाष्य करणेच टाळले.

अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्‍यांच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेता म्हणून हजेरी तर लावली, पण सरकारने शहरवासियांची फसवणूक केल्याची टीकाही केली. हा कार्यक्रम फक्त जलशुद्धीकरण केंद्राच्या उद्घाटनाचा होता, एवढे एमएलडी पाणी येणार किंवा आले हे सांगणे म्हणजे शुद्ध फसवणूक आहे. पाण्याचे वेळापत्रक किती दिवसांनी कमी होणार हे सरकारने आणि प्रशासनाने सांगितले पाहिजे. अजून वर्षभर ही योजना पूर्ण होत नाही, असा दावा अंबादास दानवे यांनी यावेळी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT