Mla Sambhaji Patil Nilangekar News Sarkarnama
मराठवाडा

Sambhaji Patil Nilangekar News: लातूरच्या पाण्यासाठी एकत्र या; तुम्ही नेतृत्व करा, मी तुमच्या पाठीमागे येतो...

राम काळगे

Latur Water Issue News: लातूरचा दुष्काळ आणि पाणीटंचाई ही भौगोलिक स्थितीमुळे उद्भवलेली आहे. लातूरकरांसाठी पाणी हा जीवनमरणाचा प्रश्न आहे, ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असून, त्यात सर्वपक्षीयांनी मतभेद विसरून सहभागी होणे गरजेचे आहे. इतर कोणी नेतृत्व करणार असेल, तर आपण त्यांच्या मागे उभे राहण्यास तयार आहोत. पाणीप्रश्नासाठी एकत्रित यावे लागेल, असे आवाहन आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.

गणेश चतुर्थीच्या दिवशी निलंगा येथून सुरू झालेल्या जलसाक्षरता अभियानाचा मंगळवारी रात्री लातूरच्या हनुमान चौकात समारोप झाला. (Latur) पाण्याअभावी मराठवाडा आणि खास करून लातूरचा विकास खुंटलेला आहे, पाणी नसल्यामुळे या भागात उद्योग येत नाहीत. आता सरकारने समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय घेतला आहे.

परंतु हे पाणी गोदावरी पात्रात आले तर त्याचा लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यांना फायदा होणार नाही. त्यामुळे मांजरा व तेरणा खोऱ्यात हे पाणी येणे आवश्यक आहे. (Marathwada) यासाठी आपण जनरेटा उभारला पाहिजे, असे आवाहन या वेळी (Sambhaji Patil Nilangekar) निलंगेकरांनी केले. यापूर्वीही मराठवाड्याला राजकीय नेतृत्व मिळाले होते; परंतु खुर्ची टिकवण्यासाठी त्यांना इतरांसमोर झुकावे लागले, पण आम्ही झुकणारे नाही.

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पदरात पाडून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पश्चिम महाराष्ट्रातील नेते विकासासाठी मतभेद विसरून एकत्रित येतात. आपणही पाण्यासाठी एकत्रित येण्याची गरज आहे. इतर कोणी यासाठी पुढे येत असेल तर मी त्यांच्या मागे उभे राहण्यास तयार आहे. परंतु पाणीप्रश्नावर सोबत येणार नसाल, तर तुम्हालाही बाजूला करून हा प्रश्न सोडवून घेऊ, असेही निलंगेकर म्हणाले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना लातूरच्या पाणीप्रश्नाबाबत त्यांच्याशी चर्चा झाली होती. परंतु काही नतदृष्ट अधिकाऱ्यांनी ही योजना फायद्याची नसल्याचा शेरा फाइलवर मारला. परंतु पाणी हा नफा-तोट्याचा विषय नाही, कितीही पैसे लागले तरी लातूरसाठी पाणी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिले आहे.

याबाबतचा संपूर्ण तांत्रिक अभ्यास आपण केलेला असून, ही योजना नेतृत्वाला पटवून देऊ, असा विश्वासही निलंगेकर यांनी व्यक्त केला. लातूर ही गुणवंतांची खाण असून, राज्य व देशातील विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येतात. त्यामुळे आयआयटी व एम्ससह केंद्रीय विद्यापीठ लातूर येथे होणे आवश्यक आहे. या संदर्भातही आपण प्रयत्न करत असून, लातूरला केंद्रीय विद्यापीठ मिळवून घेऊच, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT