Chhatrapati Sambhajinagar News : काँग्रेसच्या सृजन संघटन अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्हा काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल झाले. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकी दरम्यान, जिल्हाध्यक्ष पदी किरणपाटील डोणगावंकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. याचे चांगले परिणाम पक्षाला दिसून आले होते. कन्नड-खुलताबाद या दोन नगरपालिकेत नगराध्यक्षपदासह काँग्रेसने सत्ता मिळवली. त्यामुळे हा बदल पक्षाच्या फायद्याचा ठरला.
काँग्रेसने शहराध्यक्ष पदाचा नुकताच खांदेपालट केला. शेख युसूफ यांची उचलबांगडी करून अॅड. सय्यद अक्रम या जुन्याच चेहऱ्याला पसंती दर्शवण्यात आली आहे. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले अपयश त्यांच्या गच्छंतीला कारणीभूत असल्याचे बोलले जाते. तर निरीक्षकांनी केलेल्या सर्व्हे आणि आढावा यादीमध्ये आपले नाव आघाडीवर होते, मग नव्या शहराध्यक्षांच्या निवडीसाठी निकष बदलले का? असा नाराजीचा सूर युसूफ शेख समर्थकांकडून आळवला जात आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा दीपाली मिसाळ यांनी सोमवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांनी हा राजीनामा अलका लांबा आणि संध्या सव्वालाखे यांच्याकडे पाठवला आहे. अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना अपेक्षित मानसन्मान मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सहा-सात महिन्यांपूर्वी त्यांची दुसर्यांदा शहर महिला काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. यापूर्वी त्यांनी सुमारे 28 महिने या पदावर त्यांनी काम केले होते.
आधीच शहर आणि जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था बिकट आहे. त्यात सृजन संघटन मोहिमेनंतर झालेल्या नव्या नियुक्त्याही वादात अडकल्या आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी अतिशय सुमार राहिली. महापालिकेत पक्षाला कसेबसे खाते उघडता आले. तर गेल्यावेळी अडीच वर्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद आणि सत्तेत असलेल्या काँग्रेसची गाडी 9 जागांवरच अडली. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाची ताकद अजूनही काही प्रमाणात दिसून येते.
महापालिकेत पक्षाला केवळ एक जागा जिंकता आली, याचे खापर माजी शहराध्यक्ष युसूफ शेख यांच्यावर फोडण्यात आले. परंतु वंचित सोबत युती होऊ शकली नाही, याचा फटका आपल्याला बसल्याचे शेख यांचे म्हणणे आहे. वंचितसोबतची युती का होऊ शकली नाही? याला जबाबदार कोण? याबद्दल मात्र ते उघडपणे बोलायला तयार नाहीत. जालन्याचे काँग्रेसचे खासदार डाॅ. कल्याण काळे यांच्यामुळे महापालिकेत वंचितसोबत युती होऊ शकली नाही, अशी चर्चा काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये आहे.
वंचितसोबत युती झाली असती तर आज महापालिकेत चित्र वेगळे असते, असा दावाही काँग्रेसकडून केला जात आहे. एकंदरित काँग्रेसच्या सृजन संघटन मोहिमेनंतर पक्षात करण्यात आलेले बदल कार्यकर्त्यांना फारसे रूचलेले दिसत नाहीत. पक्षाच्या नव्या धोरणानुसार, ज्या नेत्यांनी सलग 5 वर्षे अध्यक्षपद सांभाळले आहे त्यांना पुन्हा संधी न देता नवीन चेहऱ्यांना वाव दिला जात आहे. यामुळे स्थानिक पातळीवर काही जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुप्त नाराजी असली, तरी कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठी करत आहेत.
गेल्या काही वर्षांत शहरात काँग्रेसला आमदार किंवा खासदार निवडून आणता आलेला नाही. त्यामुळे पक्षाची विखुरलेली ताकद एकत्र करणे आणि गटबाजी संपवून सर्व नेत्यांना सोबत घेऊन चालणे हे नवनियुक्त शहराध्यक्षांसमोर मोठे आव्हान असेल. शहराची राजकीय गणिते पाहता काँग्रेसने पुन्हा एकदा अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला शहराध्यक्षपदाची संधी दिली आहे. यापूर्वी शेख युसूफ यांच्याकडे ही जबाबदारी होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.