Jalna Congress-BJP News Sarkarnama
मराठवाडा

Jalna Congress News : काँग्रसेचे जिल्हाध्यक्ष म्हणतात, जालना `दानवे मुक्त` करणार

Tushar Patil

Jalna District Assembly Election 2024 : लोकसभेच्या जालना मतदारसंघातून भाजपच्या रावसाहेब दानवे यांचा पराभव होणार, हे आम्हाला समजले होते. दोन वेळा आमदार, सलग पाच वेळा खासदार राहिलेल्या भाजपच्या रावसाहेब दानवे यांनी जिल्ह्यात केवळ कागदावर दिसणारा विकास केला. कोट्यावधीच्या रस्त्याची कामे केल्याचा दावा करणाऱ्या रावसाहेब दानवे यांनी यातून गुत्तेदारीच केली, असा आरोप जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केला.

सकाळ `थेट भेट` मध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख विरोधक असलेले रावसाहेब दानवे, भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघाचे विद्यमान आमदार संतोष दानवे यांच्यावर टीका केली. (Congress) येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भोकरदनमधून संतोष दानवे यांचा पराभव करून आम्ही जालना जिल्हा `दानवे मुक्त` करणार, अशा दावा देशमुख यांनी यावेळी केला. चाळीस वर्ष राजकारणात असलेले, केंद्रात मंत्री झालेले रावसाहेब दानवे यांनी जिल्ह्याचा काहीच विकास केला नाही.

केवळ आकड्यातूनच त्यांच्या विकास दिसतो. शेतकरी, रोजगार, जिल्ह्याचा पाणीप्रश्न याकडे त्यांनी कधी गांभीर्याने पाहिलेच नाही. जिल्ह्यात हजारो कोटीचे रस्ते केल्याचा दावा दानवे करतात, पण यातून त्यांनी गुत्तेदारीच वाढवली. लोकसभा निवडणुकीत याचाच फटका त्यांना बसला. निवडणुकीच्या आधीपासूनच जालना जिल्ह्यात रावसाहेब दानवे यांच्या विरोधात एक सुप्त लाट होती. प्रत्येक गावात, तालुक्यात गेल्यावर आम्हाला हे समजत होते. त्यामुळे जालना लोकसभेची जागा काँग्रेस यावेळी जिंकणार याचा पुर्ण विश्वास होता.

मी स्वतः लोकसभा लढवण्यास इच्छूक होतो. कल्याण काळे आणि आम्ही दोघांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी संपर्क केला. ज्याला उमेदवारी मिळेल त्याला निवडून आणायचे असा निर्धार केला होता. कल्याण काळे यांनी 2009 मध्ये रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी कडवी झुंज दिली होती. लोकसभा निवडणूक लढवण्याचा त्याचा अनुभव पाहता समन्वयाने त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला आणि लोकांनी जालन्यात परिवर्तन घडवले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही परिवर्तनाचे वारे कायम राहतील.

भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे हे करतात. दोन टर्म ते आमदार आहेत, मात्र जनतेशी संपर्क न ठेवणारा आमदार अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांच्याबद्दलही मतदारसंघात प्रचंड नाराजी आहे, ती येणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल. मी स्वतः विधानसभा लढवण्यास इच्छूक आहे. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाते. ही जागा काँग्रेसला सोडावी, असा आमचा आग्रह आहे.

तसे प्रयत्न देखील वरिष्ठ पातळीवरुन केले जातायेत. ही जागा काँग्रेसला सुटली तर मी लढणार. जर जागा राष्ट्रवादीकडेच राहीली तरी महाविकास आघाडी म्हणून आम्ही ती निवडून आणण्यासाठी सामुहिक प्रयत्न करणार आहोत. मला विश्वास आहे, यावेळी संतोष दानवे यांचा पराभव करून आम्ही जालना जिल्हा `दानवे मुक्त` करू, याचा पुनरुच्चार राजाभाऊ देशमुख यांनी केला. जालना जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागांवर काँग्रेसने दावा केला असल्याचे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT