Bharat Jodo Rally In Maharashtra, News Nanded
Bharat Jodo Rally In Maharashtra, News Nanded Sarkarnama
मराठवाडा

Bharat jodo : राज्यभरातील काॅंग्रेसचे नेते नांदेडमध्ये, पण शेजारच्या लातूरचे देशमुख बंधु मात्र गायब..

सरकानामा ब्युरो

नांदेड : काॅंग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते कश्मिरपर्यंत निघालेल्या भारत जोडो यात्रेची देशातच नव्हे तर जगात चर्चा सुरू आहे. देगलूर मार्गे महाराष्ट्रात दाखल होऊन या यात्रेला तीन दिवस झाले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून काॅंग्रेसचे बडे नेते, पदाधिकारी नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत ते पदयात्रेत सहभागी होत आहेत. असे असतांना नांदेडच्या शेजारीच असलेल्या जिल्ह्यातील काॅंग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख, त्यांचे आमदार बंधु धीरज देशमुख हे मात्र अद्याप भारत जोडो कडे फिरकलेले नाहीत.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह बहुतांश नेते भारत जोडोत हिरारीने सहभागी झाले आहेत. (Amit Deshmukh) देशमुख बंधुंनी मात्र फक्त सोशल मिडियाच्या माध्यमातूनच आतापर्यंत यात सहभाग नोंदवल्याचे दिसून आले. पक्षाचे सर्वोच्च नेते, नव्याने निवडलेले अध्यक्ष यांची उपस्थितीत असतांना देशमुख बंधुंनी यात्रेकडे पाठ कशी फिरवली? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Rahul Gandhi) राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी गेल्या महिनाभरापासून सुरू आहे.

यासाठी राज्यातील प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांच्या बैठका, मेळावे पार पडले. माजी मंत्री व काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातील यात्रेच्या स्वागताची व पुढील मार्गाची सगळी तयारी आणि नियोजन केले. त्यानूसार आज तिसऱ्या दिवशी भारत जोडो यात्रेला आणि राहुल गांधीच्या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी यांच्या पदयात्रेत अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, नाना पटोले, माणिकराव ठाकरे, प्रणिती शिंदे, माजी मंत्री नसीम खान, भाई जगातप यांच्यासह युवक काॅंग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

मात्र महाराष्ट्रातील तीन दिवसांच्या या यात्रेत लातूरचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख व लातूर जिल्ह्यातील काॅंग्रेसचे पदाधिकारी फिरकले नाही. याबद्दल आता कुजबुज सुरू झाली आहे. काॅंग्रेस पक्षात चव्हाण विरुद्ध देशमुख असा अंतर्गत वाद आणि संघर्ष याची किनार तर या अनुपस्थितीमागे नाही ना? असे देखील बोलले जाते. नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेवर अशोक चव्हाण यांचा सर्वाधिक प्रभाव असल्यामुळे देशमुखांनी इथे येणे टाळल्याची चर्चा आहे.

विशेषत: सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी देगलूरच्या भाषणात अशोक चव्हाण यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे जाहीर कौतुक केले होते. त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील नेते व माजी मंत्री सतेज पाटील व विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते व विविध वैद्यकीय सेवा पुरविणारी पथकेही इथे कार्यरत असताना मराठवाड्यातीलच नांदेड शेजारच्या जिल्ह्यांतील पक्षाचे महत्वाचे राजकीय घराणे असलेले देशमुख बंधू इथे नसल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आश्चर्य वाटत आहे.

हिंगोली जिल्ह्यात जेव्हा यात्रा पोहचेल तेव्हा तिथे दोन्ही देशमुख हेजरी लावणारअसल्याचे सांगितले जाते. एकंदरित एकीकडे राहुल गांधी हे भारत जोडोचा संकल्प घेऊन देशभरात पायपीट करत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नेत्यांमध्ये असलेला बेबनाव या निमित्ताने चव्हाट्यावर आल्याचे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT