Uddhav Thackeray, Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Congress Politics : जालन्यात काँग्रेसवर नामुष्की; मित्रपक्षाला संधी देणार

Jagdish Pansare

Jalna Political News :

लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. तरीही काँग्रेसकडे जालना मतदारसंघासाठी उमेदवार सापडत नाही. त्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघ मित्रपक्षाला सोडण्याची तयारी काँग्रेसनेत्यांनी दर्शवली आहे.

जालना लोकसभा मतदारसंघ 1996 पासून भाजपकडे आहे. भाजपचे उत्तमसिंह पवार दोनवेळा विजयी झाल्यानंतर सलग पाचवेळा रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) याच मतदारसंघातून संसदेत जात आहेत. म्हणजेच जालना मतदारसंघात (Jalna Loksabha Constituency) काँग्रेसने सलग सात पराभव पचवले आहेत.

ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन जालन्याची जागा ठाकरे गटाला सोडून त्याबदल्यात हिंगोली लोकसभा मतदारसंघ (Hingoli LokSabha Constituency) घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. जालना मतदारसंघावर भाजपची जबरदस्त पकड असल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार सलग सातवेळा पराभूत झाले आहेत.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) काँग्रेसच्या डॉ. कल्याण काळे यांनी भाजपच्या रावसाहेब दानवेंना कडवी झुंज दिली होती. त्यावेळी अवघ्या साडेआठ हजार मतांनी काळेंचा पराभव झाला. जालना मतदारसंघात काँग्रेसचा पारंपरिक मतदार मोठ्या प्रमाणात असला तरी 1996 पासून भाजपचा विजय होत आहे, हे वास्तव आहे.

1991 ते 96 मध्ये अंकुशराव टोपे यांनी ही जागा काँग्रेसकडे खेचून आणली होती. शिवाय 2009 चा अपवाद वगळला तर सर्वच निवडणुकीत भाजप उमेदवाराचा लाखाच्या मताधिक्याने विजय झाला आहे. त्यामुळे जालन्यात काँग्रेसची मानसिकता पराभूततेची झाली आहे. म्हणून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली आणि जालना मतदारसंघात अदलाबदलीच्या प्रयोगाची चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसनेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी हिंगोली मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी लावून धरली आहे. हिंगोलीत काँग्रेसचे संघटन मजबूत असल्याचा दावा करीत महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडे असलेली ही जागा आम्हाला द्या, असा आग्रह चव्हाण यांच्याकडून केला जात आहे.

हिंगोलीच्या बदल्यात ठाकरे गटाला जालन्याची जागा सोडण्याची तयारी काँग्रेसने दाखवली आहे. आता ठाकरे गट याला तयार होतो का? तयार झाला तर रावसाहेब दानवेंच्याविरोधात त्यांचा उमेदवार कोण असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

शिवसेनेचे अंबड-घनसावंगीचे माजी आमदार शिवाजी चोथे यांच्या नावाची चर्चा सध्या होत आहे. दुसरीकडे रावसाहेब दानवे यांनी मात्र सलग सहाव्या विजयाला गवसणी घालण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे.

(Edited by Avinash Chandane)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT