Ambadas Danve-Atul Save News Sarkarnama
मराठवाडा

Sambhajinagar Political News : मतदारसंघात दोनशे टॅंकरने पाणी अन् म्हणे जलसम्राट; दानवेंची टीका सावेंना झोंबणार...

Jagdish Pansare

Shivsena-BJP Politics : आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर शहरातील पाण्याचा प्रश्न कळीचा मुद्दा ठरणार आहे. (Water Issue News) राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या आणि आता कॅबिनेटपदी बढती मिळालेल्या अतुल सावे यांनी शहरासाठी मंजूर करून घेतलेल्या १८०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे श्रेय घेतले.

अंबादास दानवेंनी उडविली खिल्ली

परंतु स्वतःला जलसम्राट म्हणवून घेणाऱ्या अतुल सावे (Atul Save) यांच्या पूर्व मतदारसंघातच आजच्या घडीला दोनशे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जनतेला एका ड्रमभर पाण्यासाठी पन्नास रुपये मोजावे लागत आहेत, मग तुम्ही कसले जलसम्राट? तुम्हाला याचा अभिमान वाटतो का?अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अतुल सावे यांची खिल्ली उडवली.

शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या वतीने राज्यभरात सुरू असलेल्या `होऊ दे चर्चा` या उपक्रमांतर्गत पूर्व मतदारसंघात झालेल्या कार्यक्रमात दानवे यांनी अतुल सावे यांना चांगले सुनावले. (Marathwada) एकीकडे शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांसाठी मोठ्या योजना, मदत, अनुदानाच्या घोषणा करायच्या दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र काहीच नाही, अशी परिस्थिती. त्यासाठीच हा `होऊ द्या चर्चा` कार्यक्रम आम्ही राबवत आहोत.

अशी केली पोलखोल

सध्याच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या अतुल सावे यांचा जलसम्राट असा उल्लेख केला जातो. पण ज्यांच्या मतदारसंघात आणि शहरात लोकांना प्यायला पाणी मिळत नाही. ऑक्टोबर महिन्यातही २०० टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो, अशा मंत्र्याने स्वतःला जलसम्राट म्हणून घ्यावे का? हा खरा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे का ? असा सवालही अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. शहरातील पाणीपुरवठा योजना रखडली असून, लोकांना आठ ते दहा दिवसांनंतर पाणी मिळते. पाणीपुरवठा योजनेचे श्रेय घेण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेते, मंत्र्यांमध्ये चढाओढ सुरू आहे.

दुसरीकडे मात्र इतर घोषणांप्रमाणेच पाणीपुरवठा योजनादेखील कशी घोषणाच ठरत आहे, हे खुद्द कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या पूर्व मतदारसंघात टँकरने सुरू असलेल्या पाणीपुरवठ्यावरून स्पष्ट होते, असा टोलाही दानवे यांनी लगावला. अतुल सावे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लागलेल्या बॅनरवर त्यांच्या समर्थकांनी त्यांचा जलसम्राट असा उल्लेख केला होता. शहरातील पाणीपुरवठा योजना आपणच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजूर करून आणली होती, असा दावा करत सावेंनी जाहीरपणे श्रेय घेतले होते. यावर `होऊ द्या चर्चा`च्या माध्यमातून ठाकरे गटाने पोलखोल केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT