Archana Patil- Omraje Nimbalkar Sarkarnama
मराठवाडा

Video Dharashiv Political: धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निवडीला आव्हान, खंडपीठात याचिका !

Jagdish Pansare

Dharashiv News : लोकसभा लातूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ.शिवाजी काळगे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राला आव्हान देत त्यांची निवड रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका वंचित बहुजन आघाडीचे पराभूत उमेदवार नरसिंग उदगीरकर यांनी दाखल केली.

त्यानंतर आता धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पराभूत उमेदवार अर्चना पाटील यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.

निवडणुकी दरम्यान, गैरप्रकार, मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमांचे झालेले उल्लंघन आदी मुद्दे याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत. अर्चना पाटील यांनी याचिका दाखल करून घेण्यासाठी केलेल्या अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धाराशिवमधून शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे दुसऱ्यांदा विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या अर्चना पाटील यांचा ओमराजे यांनी तीन लाख 29 हजार मतांनी पराभव केला होता. निवडणूक प्रचार आणि मतदानाच्या वेळी ओमराजे-पाटील समर्थकांमध्ये आरोप-प्रत्यारोप, वादावादीचे प्रकार घडले होते.

प्रत्यक्षात मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर ओमराजे निंबाळकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाने धाराशिवची जागा मागून घेतली होती. अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघात पुन्हा राणापाटील विरुद्ध ओमराजे असा पारंपारिक संघर्ष पहायला मिळाला.

2019 मध्ये स्वतः राणा पाटील लोकसभेच्या मैदानात उतरले होते. मात्र तेव्हाही ओमराजे निंबाळकर यांनी त्यांचा पराभव केला. यावेळी महायुती असल्यामुळे अर्चना पाटील निवडून येतील असा दावा केला जात होता. प्रत्यक्षात धाराशीवच्या मतदारांनी दुसऱ्यांदा ओमराजे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देत महायुतीला धक्का दिला.

निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांमध्ये धुसफूस सुरूच आहे. दरम्यान, अर्चना पाटील यांनी आता थेट खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या निवडीलाच आव्हान दिले आहे. ओमराजे निंबाळकर यांच्यासह 31 उमेदवाराना खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीत गैर प्रकार घडले असून निवडणूक प्रक्रिया योग्य प्रकारे पार पडली नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. तसेच मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक समस्या यावरून निवडणूक आयोगाच्या नियमाचे उल्लंघन झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. अर्चना पाटील यांच्या याचिकेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून खंडपीठ याचिका दाखल करून घेते का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT