Election Commission News : Dharashiv Politics Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Politics : क्षमतेपेक्षा अधिक उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता; EVM वर निवडणुका होणार का?

Shital Waghmare

Dharashiv News : ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एकेका मतदारसंघातून हजारो मराठा उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. राज्यातील अनेक मतदारसंघांत असे प्रयत्न आणि तयारी सुरू आहे. (Latest Marathi News)

या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून मार्गदर्शन करण्याची मागणी केली आहे. जास्त उमेदवारांनी अर्ज भरल्यास मतपत्रिका आणि मतपेट्यांचा वापर करावा लागेल. त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना कळवाव्यात, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, यासाठी राज्यात आंदोलन, संवाद मेळावे सुरू आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजकारण्याची कोंडी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील प्रत्येक मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने मराठा उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत. अर्जासोबत भराव्या लागणाऱ्या रकमेसाठी समाजाने मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार मराठवाड्यासह राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मराठा समाजाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांमधून दोन उमेदवार लोकसभेसाठी उभे करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. मनोज जरांगे यांनी धाराशिव जिल्ह्याचा दौरा काही दिवसांपूर्वी केला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे.

काय म्हटले आहे पत्रात ?

सद्यःस्थितीत महाराष्ट्रात मराठा समाजास इतर मागासवर्ग संवर्गातून आरक्षण देण्याच्या अनुषंगाने उपोषण, रास्ता रोको आयोजित केले जात आहेत. त्यातच मराठा समाजास इतर मागासवर्ग संवर्गातून आरक्षण दिले जात नसल्याने मराठा समाजातील नागरिक नाराजीने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये जास्तीत जास्त लोकसभा सदस्य पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास ईव्हीएम मशिनच्या क्षमतेपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्यास ईव्हीएम मशिनद्वारे निवडणूक घेणे अडचणीचे ठरणार आहे.

मतपत्रिका व मतपेट्यांचा (Voter) वापर करून निवडणूक घ्यावयाची झाल्यास त्यासाठी अपुरे मनुष्यबळ, मतपेट्या अनुपलब्धता अशा प्रकारच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्याशिवाय मतपत्रिकेवर उमेदवारांच्या संख्या वाढल्यास मतपतत्रिकाही मोठ्या आकाराची होणार आहे व त्याची घडी घातल्यानंतर मतपेटीमध्ये जास्त जागा व्यापली जाणार आहे. त्यामुळे मतपेट्यादेखील मोठ्या प्रमाणात लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मतपेट्यांची संख्या वाढल्यास मतदान केंद्रात नियुक्त करावयाचे मतदान अधिकारी/कर्मचारी यांच्या संख्येत तसेच सदर निवडणूक साहित्य मतदान केंद्रावर पाठविणे व स्टाॅक रूममध्ये जमा करण्यासाठी अतिरिक्त वाहनांची आवश्यक्ता भासणार आहे. त्याच प्रमाणे निवडणुका झाल्यास मतमोजणीपर्यंत मतपेट्या सुरक्षित ठेवण्यासाठी जागादेखील अपुरी पडणार आहे.

तरी अशा सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगाने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक (Election) 2024 ची निवडणूक प्रक्रिया अंमलबजावणी करण्यास येणाऱ्या अडचणी आपल्या निदर्शनास आणून देण्यात येत आहेत. तरी या अनुषंगाने कृपया मार्गदर्शन होण्यास विनंती केली आहे, अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला पाठवले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT