Latur news: पावसाळ्याचे तीन महिने संपले आहेत. पण, अद्याप मराठवाड्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाला नाही. पिकांनी माना टाकल्या आहेत. चिंतातुर शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. या परिस्थितीची अत्यंत संवेदनशीलतेने दखल घेऊन मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग तातडीने राबवा, अशी मागणी माजी आमदार धीरज देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
गेल्या तीन महिन्यात मराठवाड्यातील अनेक भागांत पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे पिके संकटात सापडली आहेत. सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमीच राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर, धीरज देशमुख यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे महाराष्ट्रात अत्यंत कमी पाऊस झालेल्या भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्याची विनंती केली आहे.
मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. अशा वेळी केवळ पावसाची वाट पाहत बसण्यापेक्षा सरकारने उपलब्ध असलेल्या वैज्ञानिक आणि तांत्रिक पर्यायांचा तातडीने वापर करण्याची गरज आहे.
यामुळे हमखास पाऊस पडेल, असा दावा नाही. मात्र शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात नक्कीच काहीसा दिलासा मिळू शकतो. पावसाळ्याच्या उर्वरित दिवसांत योग्य हवामान आणि ढगांची परिस्थिती जिथे उपलब्ध आहे, तिथे हा प्रयोग राबवला गेला पाहिजे, ही काळाची गरज आहे. शेतकरी संकटात असल्यामुळे उपलब्ध असलेला प्रत्येक वैज्ञानिक पर्याय वापरला गेला पाहिजे. शेतकऱ्यांच्या बाजूने आपण ठामपणे उभे आहोत, हे सिद्ध करण्याची ही वेळ आहे, असे धीरज देशमुख यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.