Mla  Dhiraj Deshmukh On Budget News
Mla Dhiraj Deshmukh On Budget News Sarkarnama
मराठवाडा

Dhiraj Deshmukh On Budget : मराठवाडा रेल्वे कोच कारखाना कधी सुरू होणार ? वॉटर ग्रीडलाही महत्व द्या...

सरकारनामा ब्युरो

Vidhan Sabha : पाणी नसेल तर मराठवाड्याचा (Marathwada) विकास होणार नाही, म्हणून समृध्दी महामार्ग, बुलेट ट्रेन, मेट्रो या कामांना राज्य सरकार ज्या पद्धतीने महत्व देते, त्याच पद्धतीचे महत्व मराठवाडा वॉटर ग्रीड या योजनेला राज्य सरकारने दिले पाहिजे. मराठवाड्यात 'समृध्दी' येण्यासाठी या योजनेला 'इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट'चा दर्जा द्या, अशी मागणी करतानाच लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच कारखाना कधी सुरू करणार? असा सवाल आमदार धिरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांनी बुधवारी केला.

अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होवून धिरज देशमुख यांनी मराठवाड्यातील पाणी, शेती, उद्योग, वीज या महत्वाच्या विषयांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. मराठवाडा वॉटर ग्रीड या योजनेची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. (Latur) यासाठी याआधीचेही सरकार सकारात्मक होते. सध्याचेही सरकार सकारात्मक आहे. पण, यासाठीचा भार सध्याचे सरकार कसा उचलणार आहे, हे कळले पाहिजे, असा प्रश्न धिरज देशमुख यांनी उपस्थित केला.

मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला 'इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट'चा दर्जा दिला तर या योजनेला गती मिळेल. आवश्यक आर्थिक तरतूद सरकारला करता येईल. जागतिक बँकेकडून कर्ज पुरवठा उपलब्ध करून देता येईल. राईट टू एज्यूकेशन, राईट टू इन्फर्मेशन प्रमाणे राईट टू वॉटर या विषयावर आता चर्चा झाली पाहिजे. त्यातून असे प्रकल्प वेळेवर मार्गी लागतील. मुंबई, पुणे, ठाणे नाशिक अशा विकसित शहरांभोवती नवे उद्योग उभे राहत आहेत.

पण, राज्याचा जो भाग मागे आहे, मागासलेला आहे तेथे नवे उद्योग कसे उभे राहतील हे सरकारने सांगितले पाहिजे. त्यासाठी सरकारने धोरण आखावे, अशी मागणी देखील देशमुख यांनी केली. मराठवाडा, विदर्भ, कोकण अशा भागातील सकारात्मक बाबी लक्षात घेवून तेथे कोणकोणते उद्योग उभे राहू शकतात? हे पहावे. मराठवाड्यात पाणी नसेल तर तेथे सौर उर्जेचे उद्योग उभे राहू शकतात. अशा प्रकारचे उद्योग त्या त्या भागात उभे राहिले तर स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळू शकेल, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी त्यांना पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. याबरोबरच मराठवाड्यात सोलार प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणात उभे राहू शकतात. त्यातून शेतकरी हा 'ऊर्जा उत्पादक शेतकरी' बनू शकतो. यासाठी शेतकरी बांधवांना त्यांच्या जमिनीवर सोलार पार्क उभे करण्याची योजना सुरू सरकारने सुरू करावी. त्यासाठी आवश्यक मदत द्यावी.

'मराठवाडा रेल्वे कोच कारखाना' लातूरमध्ये उभा राहून अनेक वर्षे झाले. पण, तो अद्याप प्रत्यक्षात सुरू झाला नाही. तो तातडीने सुरू व्हावा, अशी मागणीही धिरज देशमुख यांनी केली. येथे 'वंदे भारत एक्सप्रेस'च्या डब्यांची निर्मिती होणार आहे, असे केंद्राने जाहीर केले आहे. ती लवकर व्हावी. जेणेकरून स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल. लातूर आणि मराठवाड्यातील ८० टक्के तरुणांना येथे रोजगार मिळाला पाहिजे, याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT